कोहिनुर हिरा - जगातील सर्वात मौल्यवान हिरा

कोहिनुर हा फारसी शब्द असून त्याची फोड कोह-ई-नूर अशी होते. कोहिनुरचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा असून त्याचा आकार लिंबाहुन मोठा आहे. याशिवाय यास तेजाचल असेही म्हणले जात असे.

कोहिनुर हिरा - जगातील सर्वात मौल्यवान हिरा
कोहिनुर हिरा

भारतातून परकीयांनी लुटून नेलेल्या असंख्य मौल्यवान वस्तूंपैकी एक म्हणजे प्रसिद्ध हिरा कोहिनुर. काही गोष्टींची किमंत पैशांत करता येत नाही व या गोष्टी फक्त सत्तेच्या व मनगटाच्या जोरावर एकाकडून दुसऱ्याकडे जात असतात. कोहिनुर हिरा सुद्धा अशाच गोष्टींपैकी एक. या लेखामध्ये आपण कोहिनुर हिऱ्याच्या ऐतिहासिक प्रवासाचा आणि त्याच्या सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक महत्त्वाचा सविस्तर आढावा घेऊ.

कोहिनुर हिऱ्याचा परिचय

कोहिनुर हा फारसी शब्द असून त्याची फोड कोह-ई-नूर अशी होते. कोहिनुरचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा असून त्याचा आकार लिंबाहुन मोठा आहे. याशिवाय यास तेजाचल असेही म्हणले जात असे. १८०२ साली कोहिनुर हिऱ्याचे मूल्य दोन कोटी रुपये एवढे ठरवण्यात आले होते. याचे वजन १०५.६० कॅरेट म्हणजेच २१.६ ग्राम असून याचा वर्ण महाश्वेत आहे. या हिऱ्याबाबत अशी दंतकथा आहे की हा पूर्वी पांडवांकडे होता. मात्र संदर्भिक इतिहासाच्या आधारावर कोहिनुर हा हिरा १५५० साली गोवळकोंडा येथील एका खाणीत सापडला होता. गोवळकोंडा येथील खाणीतून त्याच्यावर प्रक्रिया करून हा मौल्यवान हिरा थेट दिल्लीच्या बादशहाच्या तख्तावर जडवण्यात आला. कोहिनुर हिऱ्याचे हे प्रारंभिक स्थान मुघल साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक होते.

नादीरशहाची लूट आणि हिऱ्याचा प्रवास

पुढे १७३९ साली मुघल साम्राज्य खिळखिळे झाले असताना इराणच्या नादीरशहाने दिल्लीवर हल्ला करून प्रचंड लूट केली त्यामध्ये मयूर सिंहासनाचा समावेशही होता. सिंहासनासोबत कोहिनूरही नादीरशहाकडे गेला. नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यात बंडाळी माजून प्रचंड लूट झाली आणि यावेळी हा हिरा अफगाणिस्तानचा सुलतान अहमदशाह अब्दालीच्या हाती पडला आणि त्याच्यानंतर हिऱ्याचा अमल शाहशुजा यांच्याकडे आला. १८०९ मध्ये शाहशुजाच्या विरोधकांनी त्यास पदच्युत केले व यानंतर तो आपले स्थान वाचवण्यासाठी इतर सत्तांची मदत घेण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी लाहोर येथे एक महापराक्रमी राजा राज्य करीत होता ज्याचे नाव होते महाराज रणजितसिंह. शाहशुजाने रणजितसिंग यांच्याकडे मदतीची मागणी केली. रणजितसिंह यानेही मागणी मान्य करून शाहशुजास आपल्या दरबारी बोलावून घेतले.

रणजितसिंह आणि कोहिनुर

रणजितसिंहास शाहशुजा याच्याकडे असलेल्या कोहिनुर हिऱ्याची माहिती होतीच. शाहशुजा दरबारी आल्यावर मदतीच्या बदल्यात रणजितसिंहाने त्याच्याकडे कोहिनूरची मागणी केली मात्र शाहशुजाने आढेवेढे घेतले. यानंतर निर्बल अशा शाहशुजावर रणजित सिंहाने पहारे बसवले. कालांतराने रणजित सिंह शाहशुजास भेटला व त्यास समेट पत्र दिले ज्यामध्ये कोठा कमलक, जंगस्वाल, खलनूर इत्यादी प्रांत मी तुला व तुझ्या वंशजांना देत असून तुझी गादी परत मिळवण्यासाठी जी सैन्याची अथवा द्रव्यही मदत लागेल ती मी करेन असे सांगून समेट केला व यानंतर दोघांनी आपल्या पागोट्यांची अदलाबदल केली यावेळी शाहशुजाने कोहिनुर रणजित सिंग यांच्याकडे सोपवला. हा हिरा रणजितसिंग यास इतका प्रिय होता की यास त्याने कोंदणात बसवून आपल्या उजव्या दंडास बांधले होते. कोहिनुर हा रणजितसिंहाच्या साम्राज्याच्या वैभवाचा प्रतीक बनला.

इंग्रजांचा ताबा आणि कोहिनुरचा प्रवास

पुढे काही कारणाने ही समेट मोडली व रणजितसिंह याने शाहशुजास प्रतिबंधात ठेवले. १८१६ साली शाहशुजा वेषांतर करून लाहोर येथून पळून इंग्रजांच्या आश्रयास गेला. रणजित सिंग जेव्हा मृत्युपंथास ठेपला होता त्यावेळी त्याने कोहिनुर हिरा माझ्या मृत्यूपश्चात पुरीच्या जगन्नाथ देवास द्यावा असे आपल्या मृत्युपत्रात लिहिले होते मात्र त्याच्या मृत्यूनंतरही हा हिरा लाहोर येथील राज खजिन्यातच राहिला. १८३९ साली रणजितसिंग याचा मृत्यू झाला आणि १८४९ साली इंग्रजानी लाहोरवर विजय प्राप्त केल्यावर रणजितसिंग याचा पुत्र दिलीपसिंग याने हा हिरा इंग्रजास दिला. इंग्रजांकडून हा हिरा त्यांच्या राणीस म्हणजे व्हिक्टोरिया हिस भेट देण्यात आला व यानंतर तिच्या मुकुटात कोहिनुर विराजमान झाला. यानंतर आजतागायत हा हिरा इंग्लंड येथील राणीच्या म्हणजे एलिझाबेथच्या मुकुटात स्थानापन्न आहे.

कोहिनुरचा वारसा आणि अपेक्षा

कोहिनुर हिरा हा सर्वात शक्तिशाली व्यक्तीकडे असतो असा त्याचा इतिहास आहे, आज त्याचे स्थान इंग्लंडमध्ये आहे. भारतात निर्माण झालेला हा मौल्यवान हिरा पुन्हा एकदा भारतात विराजमान झाला तर समस्त भारतीयांसाठी ही आनंदाची गोष्ट असेल. कोहिनुर हिऱ्याचा प्रवास हा भारताच्या इतिहासातील लुटीच्या आणि साम्राज्यवादी कालखंडाचा द्योतक आहे. त्याच्या परत येण्याची अपेक्षा आजही भारतीयांच्या मनात आहे, आणि ती पूर्ण झाल्यास हा हिरा पुन्हा भारताच्या वैभवाचा प्रतीक बनेल.