रायगड किल्ल्याचे हिरकणी टोक व बुरुज

हिरकणी टोकावर जाण्यासाठी राजवाड्याच्या पश्चिमेकडून रस्ता असून काही अंतर चालून गेल्यावर पाण्याचे एक टाके दिसून येते. या टाक्याच्या पुढे उजव्या बाजूस पाण्याची आणखी दोन टाकी दृष्टीस पडतात.

रायगड किल्ल्याचे हिरकणी टोक व बुरुज
रायगड किल्ल्याचे हिरकणी टोक व बुरुज

दुर्गदुर्गेश्वर रायगडास जी प्रसिद्ध अशी चार टोकं आहेत त्यापैकी एक म्हणजे हिरकणी टोक. हिरकणी टोक हे रायगड किल्ल्याच्या पश्चिम दिशेस असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ८०० मीटर आहे.

रायगड किल्ल्याच्या पायथ्यावरुन किल्ल्याच्या माथ्यावर नजर टाकल्यास उजव्या बाजूस हिरकणी व डाव्या बाजूस टकमक ही दोन टोकं प्रथम दृष्टीक्षेपात येतात.

हिरकणी टोकावर जाण्यासाठी राजवाड्याच्या पश्चिमेकडून रस्ता असून काही अंतर चालून गेल्यावर पाण्याचे एक टाके दिसून येते. या टाक्याच्या पुढे उजव्या बाजूस पाण्याची आणखी दोन टाकी दृष्टीस पडतात.

हिरकणीच्या टोकावर पोहोचण्यासाठी राजवाड्याच्या पश्चिमेकडील तीन टप्पे उतरावे लागतात व यातील दुसरा टप्पा थोडा अवघड असल्याने तो उतरण्यासाठी कातळ खोदून २७ पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती.

हिरकणी टोकाच्या डाव्या बाजूस एक भक्कम असा बुरुज आहे त्यास हिरकणी बुरुज असे नाव आहे.

हिरकणी बुरुजाच्या अंतर्भागात हनुमानाचे एक शिल्प कोरलेले दिसून येते. हिरकणी बुरुजावरून किल्ल्याच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर दिशेकडील मोठा आसमंत दृष्टीस पडतो आणि खाली पाहिल्यास पाचाड, रायगड वाडी, हिरकणी वाडी आणि खुबलढा बुरुज आदी ठिकाणे दृष्टीस पडतात.

या टोकास हिरकणी असे नाव मिळण्यामागे एक प्रख्यात कथा सांगितली जाते. शिवकाळात रायगडावर दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात असे. यावेळी पायथ्याच्या गावातील अनेक गवळी दूध घेऊन किल्ल्यावर येत असत व यामध्ये पायथ्याच्या एका वाडीतील हिरकणी सुद्धा असायची. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडावर दूध विकून परत येताना संध्याकाळ झाल्याने गडाचे दरवाजे नियमानुसार बंद झाले. 

किल्ल्यावरील दरवाजा एकदा बंद झाला की तो थेट दुसऱ्या दिवशी पहाटेस उघडत असे मात्र हिरकणी चे लहानगे मुलं तिच्या गावातील घरी असल्याने मुलाच्या मायेने व्याकुळ झालेल्या हिरकणीने गडाच्या पश्चिमेकडील एका कड्यावरून कातळारोहण करून गड उतरली व आपल्या घरी सुखरूप पोहोचली.

रायगड किल्ल्यास अनेक बाजूनी नैसर्गिक संरक्षण आहे व ज्याठिकाणी गरजेचे आहेत अशाच ठिकाणी बुरुज अथवा तटबंदी केली आहे त्यामुळे ज्या टोकावरून हिरकणी खाली उतरली त्या ठिकाणी तटबंदी अथवा बुरुज नव्हता.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही बातमी गडावर पोहोचली त्यावेळी महाराजांनी याबाबतची माहिती घेतली आणि हिरकणी व तिच्या पतीस गडावर बोलावणे पाठवून त्यांना अलंकार भूषणे देऊन त्यांचा सत्कार केला आणि हे टोक वाटते तेवढे सुरक्षित नसल्याने या ठिकाणी बुरुज व तटबंदी करवून घेतली आणि हिरकणीच्या धाडसाची आठवण म्हणून या टोकास हिरकणी असे नाव दिले.

रायगड किल्ल्यावरील हे हिरकणी टोक व हिरकणी बुरुज आजही हिरकणीने आपल्या संतानाच्या प्रेमापोटी केलेल्या पराक्रमाची गाथा सांगत भक्कमपणे उभे आहे व प्रत्येकाने हे ठिकाण एकदातरी पाहायलाच हवे.