बाबा पद्मनजी - मराठी भाषेतले आद्य कादंबरीकार

बाबा पद्मनजी यांचे वडिल पद्मनजी माणिकजी हे प्रख्यात इंजिनिअर असून खंडाळा घाटाचे बांधकाम करण्यात त्यांचा सहभाग होता. नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या वडिलांच्या सारख्या बदल्या होत असल्याने बेळगावी बाबांचा जन्म झाला.

बाबा पद्मनजी - मराठी भाषेतले आद्य कादंबरीकार
बाबा पद्मनजी

मराठी भाषेतील उपेक्षित मानकर्‍यांपैकी एक म्हणजे आद्य मराठी कांदबरीकार बाबा पद्मनजी. १८५७ साली प्रकाशित झालेली 'यमुना पर्यटन' ही कादंबरी मराठीतली पहिली कांदबरी म्हणून ओळखली जाते. यमुनापर्यटन ही खऱ्या अर्थी एक बोधप्रद कादंबरी आहे. या कांदबरीनंतर मराठीतले कांदबरीयुग सुरु झाले व पुढे अनेक प्रख्यात लेखकांनी या साहित्य प्रकारात नवीन मापदंड निर्माण केले. एवढे असूनही बाबा पद्मनजी मात्र उपेक्षितच राहीले.

बाबा पद्मनजी यांनी लिहीलेले आत्मचरित्र 'अरुणोदय' सुद्धा वाचण्यासारखे आहे. १९ व्या शतकातील समाजस्थिती जाणुन घेण्यासाठी हे आत्मचरित्र उपयोगी ठरेल. बाबा पद्मनजी हे मुळचे त्वष्टा कांसार व त्यांचे उपनाव मुळे असे होते मात्र त्यांचे घराणे सुरत येथे राहत असल्याने त्यांना सुरतकर हे ग्रामवाचक आडनाव मिळाले होते. 

बाबा पद्मनजी यांचे वडिल पद्मनजी माणिकजी हे प्रख्यात इंजिनिअर असून खंडाळा घाटाचे बांधकाम करण्यात त्यांचा सहभाग होता. नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या वडिलांच्या सारख्या बदल्या होत असल्याने बेळगावी बाबांचा जन्म झाला.

पुढे वडील मुंबई व तेथून एडन व परत मुंबईस स्थलांतरीत झाले. घराण्यात अर्थातच धार्मिक परंपरागत वातावरण असल्याने सुरुवातीस हिंदू धर्माचा पगडा असलेले बाबा पद्मनजी हळू हळू ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाले व याआधी व नंतर ज्या नाट्यपुर्ण घडामोडी घडल्या त्या त्यांच्या आत्मचरित्रात वाचावयास मिळतात.

बाबा पद्मनजी यांची ओढ ख्रिस्ती धर्माकडे जाण्यास'प्रभारकर' कर्ते भाऊ महाजन व लोकहितवादी यांची याच वृत्तपत्रातिल मालिका कारण झाली. शेवटी सन १८५४ साली त्यांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला.

बाबा हे १६ वर्षे पुण्याच्या फ्री चर्च मिशनच्या शाळेत शिक्षक होते. सन १८६० मध्ये त्यांनी थॉमस कँडीच्या इंग्रजी-मराठी कोशाचा संक्षेप शब्दरत्नावलित केला. 

यापुर्वी पुण्याच्या मिशनमध्ये त्यांना 'पालक' ही दिक्षा मिळाली. १८७३ साली त्यांनी आपल्या नोकरीचा राजिनामा देऊन पुर्णवेळ लेखन कार्यास वाहून घेतले.

यानंतर बायबल सोसायटी व ट्रॅक्ट सोसायटी इत्यादी संस्थांचे संपादकत्व त्यांच्याकडे आले. वयाच्या ७१ व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले.

आपल्याकडे एखाद्या विषयाचे सातत्य धरुन न लावल्यास तो विषय स्मृतीतून लवकरच नाहीसा होता व तसाच प्रकार बाबा पद्मनजींच्या बाबतीत झाला. मराठी साहित्याची भरभराट झाली मात्र मराठीतला आद्य कांदबरीकार उपेक्षित मानकरी झाला.