खुबलढा किल्ला – थळ : मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील एक दुर्ग
या परिस्थितीत, उंदेरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सिद्दीला दोन्ही बाजूंनी कचाट्यात पकडण्यासाठी, शिवाजी महाराजांनी समुद्रकिनाऱ्यावरील मोक्याच्या जागी एक भुईकोट बांधला – तो म्हणजे थळचा भुईकोट.
महाराष्ट्र राज्यास दुर्गांचे राज्य म्हणून ओळखले जाते. इथले दुर्ग किल्ले मराठ्यांच्या शौर्य, रणनीती आणि आरमारी पराक्रमाचे जिवंत साक्षीदार आहेत. विशेषतः कोकणातील समुद्रकिनारी वसलेले दुर्ग हे मराठ्यांच्या आरमारी वैभवाची आठवण करून देतात. या लेखात आपण महाराष्ट्रातील एक अशाच भुईकोटाची माहिती घेणार आहोत व या दुर्गाचे नाव आहे थळ येथील खुबलढा किल्ला. हा किल्ला, ज्याला थळचा कोट किंवा भुईकोट म्हणूनही ओळखले जाते, मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील एक महत्वाचा भाग आहे.
महाराष्ट्रातील दुर्गांचे विविध प्रकार आणि भुईकोटांचे महत्व
महाराष्ट्रातील दुर्ग हे भौगोलिक आणि सामरिक गरजेनुसार विविध प्रकारांत विभागले जातात. दुर्गांचे जे विविध प्रसिद्ध प्रकार आहेत त्यामध्ये डोंगरी दुर्ग, वन दुर्ग, जल दुर्ग, स्थल दुर्ग आदी दुर्गांचा समावेश होतो. महाराष्ट्रात या चारही प्रकारातील दुर्ग विपुल प्रमाणात आहेत.
दुर्गांच्या या प्रकारांमध्ये स्थलदुर्ग हे भुईकोट या नावाने सुद्धा ओळखले जातात. शनिवार वाडा, पाचाडचा कोट हे भुईकोटच आहेत. भुईकोट हे सहसा जमिनीवर बांधले जातात व त्यांच्या चारही बाजूंना तटबंदी केली जाते. हे तटबंदी शत्रूंच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी मजबूत असतात आणि सामान्यतः गावांमध्ये किंवा मोक्याच्या ठिकाणी बांधले जातात.
महाराष्ट्रात एकेकाळी भुईकोट विपुल होते मात्र हे कोट सहसा एखाद्या गावात असल्याने जसजसा गावांचा विस्तार होऊ लागला हे कोट विस्मरणात जाऊ लागले त्यामुळे सध्यस्थितीत महाराष्ट्रात तुलनेने फार कमी भुईकोट पाहावयास मिळतात व ते सुद्धा आता नामशेष होऊ लागले आहेत. शहरीकरण आणि विकासामुळे अनेक भुईकोट नष्ट झाले, पण काही अजूनही त्यांचा वारसा जपत उभे आहेत. यापैकी एक उल्लेखनीय उदाहरण आहे थळचा कोट, जो आता खुबलढा किल्ला म्हणून ओळखला जातो.
थळ गाव आणि खुबलढा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा
महाराष्ट्रातील असंख्य भुईकोटांपैकी एक म्हणजे थळचा कोट. थळ हे गावं रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात असून समुद्रकिनारी वसलेले आहे व येथील आर.सी.एफ. प्रकल्पामुळे प्रसिद्ध आहे मात्र या गावास एक संपन्न इतिहास सुद्धा आहे. थळ हे कोकणातील एक सुंदर गाव आहे, जिथे समुद्राच्या लाटा आणि ऐतिहासिक वास्तू एकत्र येतात. आज आर.सी.एफ. प्रकल्पामुळे औद्योगिकदृष्ट्या ओळखले जाते, पण मराठ्यांच्या काळात ते एक प्रमुख लष्करी केंद्र होते.
मराठेकाळात थळ हे एक मोठे लष्करी केंद्र असून मराठे सैन्याचा एक मोठा तळ या ठिकाणी होता व यावरूनच या गावास थळ हे नाव मिळाले असे म्हटले जाते. त्याकाळी थळ ला एवढे महत्व असण्याचे कारण हे की थळ च्या अगदी समोर उंदेरी आणि खांदेरी हे दोन जलदुर्ग असून या जलदुर्गांना त्याकाळी मोठे महत्व होते.
अरबी समुद्रावरील वर्चस्वासाठी मराठ्यांनी जलदुर्गांची रचना केली. अरबी समुद्रावर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्यात कुलाबा, पदमदुर्ग, खांदेरी आदी जलदुर्ग उभारले होते व आणि सिद्दीने जंजिरा, उंदेरी हे जलदुर्ग बांधले होते व खांदेरी व उंदेरी हे जलदुर्ग अनुक्रमे मराठ्यांच्या व सिद्दीच्या ताब्यात असल्याने या परिसरात उभय सैन्यांमध्ये अनेकदा चकमकी होत असत व यामध्ये मुंबईकर इंग्रजांची सिद्दीला कधी छुपी तर कधी उघड मदत होत असे.
खुबलढा किल्ल्याची रचना आणि आरमारी महत्व
सिद्दीच्या उंदेरी येथील कारवाया रोखण्यासाठी आणि त्याला कचाट्यात पकडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी उंदेरीच्या समोर समुद्रकिनाऱ्यावर मोक्याची एक जागा पाहून एक भुईकोट उभारला व हा भुईकोट म्हणजेच थळचा भुईकोट. हा कोट नैसर्गिक उंचवट्यावर बांधला गेला, ज्यामुळे तो उंदेरीवर करडी नजर ठेवू शकत होता. थळचा भुईकोट आणि खांदेरी जलदुर्ग या दोहोंच्या मध्ये उंदेरी असल्याने दोन्ही बाजुंनी सिद्दीला कचाट्यात आणणे शक्य झाले.
इ.स. १६५९ मध्ये खांदेरी किल्ल्याच्या बांधकामादरम्यान थळचा कोटाने रसदपुरवठा आणि संरक्षणाची जबाबदारी सांभाळली. मराठ्यांकडून खांदेरीचा किल्ला हा १६७८ साली बांधला गेल्यावर सिद्दीने उंदेरीचे बेट ताब्यात घेऊन तिथे किल्ला बांधला. याच कालावधीत थळ येथे मराठ्यांचा लष्करी तळ उभारून मराठ्यांनी थळच्या कोटातून उंदेरीवर तोफा डागल्या. या तोफांचा मारा सिद्दीला निष्प्रभ करण्यासाठी भावी ठरला. सिद्दिनेही उंदेरीतून मराठ्यांच्या थळ येथील तोफांना उत्तर देण्यास सुरुवात केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा तत्कालीन आरमारप्रमुख दौलतखान यास उंदेरीवर हल्ला करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
थळ कोटाचा अजून एक ऐतिहासिक उल्लेख १७५३ सालच्या एका लढाईत आढळतो. १७५३ साली सिद्दी इब्राहिम याने आबाजी घाडगे नामक सरदाराला आंग्रे यांच्यावर हल्ला करण्यासाठी धाडले आणि त्याने थळ येथे येऊन तेथील गढी काबीज केली. या गढीस त्याकाळी चौबुरुजी असेही म्हणत कारण या गढीला चार बुरुज होते.
मानाजी आंग्रे यांना ही माहिती मिळताच त्यांनी आपले सैन्य घेतले आणि थळ गाठले आणि येथे एक मोठी लढाई झाली मात्र पहिल्या लढाईत आबाजी घाडगे यांचा जय झाला आणि मानाजी आंग्रे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. मानाजींनी हार मानली नाही. यानंतर मानाजी आंग्रे यांनी परत सैन्याची जमवाजमव केली आणि पेशव्यांची कुमक मागवून पुन्हा थळच्या गढीवर हल्ला केला आणि या लढाईत आबाजी घाडगे यांचा दारुण पराभव झाला. ही लढाई थळ कोटाच्या एका बुरुजाजवळ झाली त्या बुरुजास यानंतर खुबलढा या नावाने ओळखले गेले आणि सध्या थळ कोटास खुबलढा याच नावाने ओळखले जाते.
खुबलढा किल्ल्याची भौगोलिक रचना आणि वैशिष्ट्ये
थळचा कोट हा अरबी समुद्रात आत शिरलेल्या एका भूशिरावर असून त्याची लांबी चाळीस मीटर व रुंदी त्रेचाळीस मीटर आहे व या कोटास चार बुरुज असून दक्षिणेकडे कोटाचे प्रवेशद्वार आहे. हा कोट एका नैसर्गिक उंचवट्यावर बांधला गेला असल्याने तो समुद्र आणि जमिनीवरून शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी आदर्श होता. कोटाच्या दक्षिणेकडे थळ गावं असून कोटाच्या पूर्वेकडे आणि उत्तरेस खाडी आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे व पश्चिम दिशेने एक निमुळती वाट थेट अरबी समुद्रात शिरली आहे. ही निमुळती वाट सैन्य आणि रसद पुरवठ्यासाठी वापरली जायची.
खुबलढा किल्ला: आजचे पर्यटन आणि संवर्धन
थळचा कोट अनेक वर्षे उपेक्षित होता मात्र गेल्या काही वर्षात या किल्ल्यास भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आज पर्यटक, ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमी येथे येऊन समुद्रकिनाऱ्यावरचा हा दुर्ग अनुभवतात. अलिबागपासून केवळ १० किमी अंतरावर असल्याने तो सहज पोहोचण्याजोगा आहे. मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील एक महत्वाचा किल्ला म्हणून थळच्या किल्ल्याचे महत्व आजही अबाधित आहे.
मराठ्यांच्या आरमारी वैभवाची जिवंत आठवण
खुबलढा किल्ला हा फक्त एक भुईकोट नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी आणि मराठ्यांच्या आरमारी शौर्याचा प्रतीक आहे. उंदेरी आणि खांदेरी यांच्यातील या लष्करी बिंदूने अरबी समुद्रावरील वर्चस्व कसे निश्चित केले, हे त्याच्या इतिहासातून दिसते. आजही हा किल्ला पर्यटकांना आकर्षित करतो आणि मराठा वारसा जपण्याचे महत्व अधोरेखित करतो.