मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी

रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मंदिरात काही अद्भुत विरगळी पहावयास मिळतात. विरगळ म्हणजे विरांचे स्मारक व ही स्मारके सध्याची नसून चालुक्य, शिलाहार तथा यादवकाळातील असायची. विरगळ हा शब्द विरकल्ल या कन्नड शब्दापासून तयार झाला असल्याचे सांगितले जाते व या विरगळींचा काळ चालुक्य काळ ते मराठेकाळाची सुरुवात असा आहे.

मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी
मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी

रायगड जिल्हा हा विविधतेने नटलेला जिल्हा असून येथे दर आठवड्यास लाखो पर्यटकांनी गजबजणारी पर्यटनस्थळेही आहेत व दुर्गम भागातील अपरिचित व पर्यटकांना पारखी अशी स्थळेही आहेत. रायगड जिल्ह्याची भौगोलिक विविधता पाहता येथे डोंगर, दर्या व अरण्यांनी व्यापलेला असा खूप मोठा प्रदेश आहे व या प्रदेशातली अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे अजून प्रसिद्धीच्या झोतात यावयाची आहेत. मात्र यासाठी रुळलेल्या वाटा सोडून थोडं आडवाटेचा प्रवास करायला हवा तरच ही रहस्यमयी स्थळे पाहता येतील. या लेखात आपण मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी आणि त्यांचा प्राचीन इतिहास याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

मेढे-चौल रस्त्याचे ऐतिहासिक महत्त्व

जिल्ह्यातील काही प्रमुख मार्ग वगळले तरी दुर्गम भागातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची साखळी आहे. यातील काही मार्ग अतिशय पुरातन असून सातवाहन पूर्व काळापासून वहिवाटीत आहेत व असे रस्ते इतिहासप्रेमींसाठी जणू पर्वणीच असतात. असाच एक प्राचीन रस्ता म्हणजे चौल या प्राचीन व्यापारी शहरापासून मेढा-नागोठणे मार्गे मावळात जाणारा रस्ता. हा रस्ता सध्याच्या नागोठणे-रोहा राज्यमार्गावरील मेढा या गावातून पूर्वेस वळतो. याच प्राचीन काळातल्या प्रमुख रस्त्याच्या संरक्षणासाठी मेढा येथील एका मोक्याच्या ठिकाणी अवचितगड या अभेद्य दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती. हा रस्ता कुंडलिका खाडीच्या पूर्वेकडून समांतर दिशेने जातो व वावेखार, यशवंतखार, कुडे, सुडकोली, मालाडे, रामराज सारखी गावे या रस्त्याला लागतात. या रस्त्यात जागोजागी दिसणारे जलाशयाचे साठे पूर्वी या रस्त्यांवरील प्रवाशांची तहान भागवत असत.

यशवंतखार हून एक वळण घेतल्यावर खऱ्या अर्थी कुंडलिका नदी संपून खाडीस सुरुवात होते. डोंगर-दऱ्यांमधून प्रवास करताना अधूनमधून या विस्तीर्ण खाडीचे दर्शन मंत्रमुग्ध करते. हीच खाडी पुढे रेवदंड्याची खाडी बनते. या रस्त्यास चौलकडे जाणारे काही उपमार्ग आहेत, मात्र मूळ रस्ता रामराजहून बोरघर, बापळे, वासखार, वावे असा आहे. याच रस्त्यावर बापळे नावाचे गाव आहे, या ठिकाणी रस्ता अतिशय निर्जन होतो, मात्र याच परिसरात काही ऐतिहासिक ठेवे आहेत, याचा थांगपत्ता तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत एक मंदिर आपल्या पहाण्यात येते.

मेढे-चौल रस्त्यावरील विरगळी

रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मंदिरात काही अद्भुत विरगळी पहावयास मिळतात. विरगळ म्हणजे विरांचे स्मारक व ही स्मारके सध्याची नसून चालुक्य, शिलाहार तथा यादवकाळातील असायची. विरगळ हा शब्द विरकल्ल या कन्नड शब्दापासून तयार झाला असल्याचे सांगितले जाते व या विरगळींचा काळ चालुक्य काळ ते मराठेकाळाची सुरुवात असा आहे. कालांतराने ही पद्धत कमी होत गेली. विरगळ, गद्धेगळ, सतीशिळा हे शब्द इतिहास अभ्यासकांना नवीन नसले तरी इतरांसाठी नवीन आहेत. या विरगळी म्हणजे कोरीव शिळा असून यावर त्या काळातल्या युद्धाचे प्रसंग कोरले जात असत. प्रामुख्याने या विरगळी ज्या स्थळी असत, त्याच परिसरात हे संनग्राम झालेले असायचे, त्यामुळे त्या समरांगणी धारातिर्थी पडलेल्या विरांच्या स्मरणार्थ युद्धाचा प्रसंग कोरण्याचा प्रयत्न विरगळींच्या माध्यमातून केला जात असे. अशा विरगळी महाराष्ट्राच्या अनेक भागात सापडत असल्या तरी मेढे-चौल रस्त्यावरील विरगळी वेगळी व अद्भुत आहे.

विरगळींचे स्वरूप आणि रचना

ही विरगळी तीन स्वरूपांत पहायला मिळत असली तरी मूळात दोनच विरगळी असाव्यात व यातील एका विरगळीचे दोन भाग होऊन एकूण तीन झाल्या असाव्यात, असा अंदाज आहे. या विरगळींची कालनििश्चिती करणे कठीण आहे, कारण येथे कोणताही लेख नसल्याने किंवा प्राचीन काळी कुठल्या युद्धाने येथे आकार घेतला याचे पुरावे नसल्याने या चालुक्यकालीन आहेत, शिलाहारकालीन आहेत की यादवकालीन हा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. येथील एका विरगळीवर एकूण तीन प्रसंग कोरले असून, पहिल्या भूमीत गाडल्या गेलेल्या समशेरी व दुसऱ्या तथा तिसऱ्या मध्ये या युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांच्या व्युहाचे वर्णन असावे. एका भल्या मोठ्या दोरखंडास धरून हे सैनिक चाल करीत आहेत, असे प्रथमदर्शनी पाहिल्यावर वाटते, मात्र हजारो वर्षांच्या स्थित्यंतरांमुळे पाषाणाची झीज झाल्याने ठाम मत बांधता येत नाही.

दुसऱ्या विरगळीचेही तीन भाग असून, या तीनही भागात एकूण सहा समशेरी उलट्या जमिनीत गाडल्या गेल्याचे दिसून येते. तिसरी विरगळ भग्न असून यावरही अशीच एक अद्भुत आकृती आहे, मात्र भग्न असल्याने याही आकृतीचा थांग लागत नाही. या सर्वाचा सांकेतिक अर्थ काय, ते तज्ञांकडूनच जाणून घेता येईल. या विरगळी प्राचीन काळी याच परिसरात झालेल्या एका दुर्धर संग्रामाचे प्रतिनिधित्व करतात. चौल हे सातवाहन काळी मोठी बाजारपेठ असल्याने तसेच चौल मार्गे मावळात जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने याच ठिकाणी त्या काळातल्या काही प्रमुख सत्तांमध्ये दुर्धर रणसंग्राम झाला असावा व त्यांच्याच स्मरणार्थ या विरगळींची निर्मिती येथे करण्यात आली असावी.

ऐतिहासिक संदर्भ: सातवाहन, शिलाहार आणि यादव काळ

चौल हे सातवाहन काळात (इ.स.पू. २३० ते इ.स. २२०) एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. सातवाहन राजवंशाने कोकणातील व्यापारावर नियंत्रण ठेवले होते, आणि चौल हे समुद्रमार्गे परदेशी व्यापाऱ्यांशी संपर्क साधणारे प्रमुख बंदर होते. मेढे-चौल रस्ता हा सातवाहन काळापासून व्यापारी आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. याच रस्त्याच्या संरक्षणासाठी अवचितगड सारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली. शिलाहार राजवंश (इ.स. ८०० ते इ.स. १२६५) काळातही चौल हे राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. शिलाहारांनी कोकणातील समुद्री व्यापारावर नियंत्रण ठेवले आणि याच काळात अनेक मंदिरे आणि स्मारके बांधली गेली. यादव काळ (इ.स. ११८७ ते इ.स. १३१७) मध्येही हा प्रदेश लष्करी आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा राहिला.

हा भाग खाडी किनारी असल्यामुळे फार पूर्वीपासून समुद्रमार्गे परकीयांचे हल्ले होत असत, आणि या भूभागाचे रक्षण करण्यासाठी येथील स्थानिक सत्ता प्राणांची बाजी लावीत असत. तेव्हा असेच एखादे परकीय आक्रमण थोपवताना हे अज्ञात वीर धारातिर्थी पडले असावेत. दुर्दैवाने प्राचीन काळातील लिखित पुराव्यांचे प्रमाण कमी असल्याने या अज्ञात वीरांची नावे मिळणे दुरापास्तच असते, मात्र त्यांनी या भूभागासाठी वेळोवेळी दिलेल्या बलिदानांमुळे आपण स्वातंत्र्य उपभोगू शकलो, हे विसरता कामा नये.

विरगळींचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व

विरगळी या केवळ शिळा नसून प्राचीन इतिहासाचे साक्षीदार आहेत. या स्मारकांवर कोरलेल्या आकृती आणि प्रसंग त्या काळातील युद्ध रणनीती, सैनिकांचे शौर्य, आणि सांस्कृतिक मूल्ये यांचा अंदाज देतात. मेढे-चौल रस्त्यावरील विरगळी या चालुक्य, शिलाहार आणि यादव काळातील युद्धांचे स्मरण करतात. या स्मारकांमुळे त्या काळातील लष्करी रणनीती आणि समाज व्यवस्था यांचा अभ्यास करणे शक्य होते. विरगळींची निर्मिती ही त्या काळातील शिल्पकला आणि स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट नमुने दर्शवते.

रायगड जिल्ह्यात अशा अनेक विरगळी, गद्धेगळी, सतीशिळा जागोजागी आढळतात, आणि या फक्त शिळा नसून त्या काळातील इतिहास आहे. जर या सर्व स्थळांची खानेसुमारी करून कोश तयार केला, तर प्राचीन रायगड जिल्ह्याचा सुसंगत इतिहास तयार होण्यास मदत होऊ शकते. या विरांच्या स्मरणार्थ का होईना, या आडवाटेवरून एकदा तरी प्रवास करावाच.

मेढे-चौल रस्त्यावरील प्रवास आणि पर्यटन

मेढे-चौल रस्ता हा केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर निसर्ग सौंदर्य आणि साहसिक पर्यटन यासाठीही महत्त्वाचा आहे. कुंडलिका खाडीचे नयनरम्य दृश्य, डोंगर-दऱ्यांमधील प्रवास, आणि जलाशयांचे साठे यामुळे हा रस्ता पर्यटकांसाठी आकर्षक आहे. बापळे गावातील मंदिर आणि त्यातील विरगळी इतिहासप्रेमींसाठी एक खजिना आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना अवचितगड, रेवदंडा, आणि चौल येथील प्राचीन अवशेष पाहण्याची संधी मिळते.

पर्यटकांसाठी टिप्स:

  • सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च, कारण हवामान आल्हाददायक असते.

  • काय घ्यावे: पाण्याची बाटली, कॅमेरा, आणि आरामदायी शूज.

  • कसे पोहोचावे: नागोठणे-रोहा राज्यमार्गावरून मेढा गावातून हा रस्ता सुरू होतो. स्वतःच्या वाहनाने किंवा स्थानिक वाहतुकीने पोहोचता येते.

मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी या रायगड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. सातवाहन, शिलाहार आणि यादव काळातील युद्धांचे स्मरण करणाऱ्या या स्मारकांमुळे त्या काळातील शौर्य आणि बलिदान यांची आठवण येते. चौल हे प्राचीन व्यापारी केंद्र आणि मेढे-चौल रस्ता यांनी या भूभागाला सामरिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले होते. या विरगळी त्या सर्व अज्ञात वीरांना नकळत मुजरा घालण्यास भाग पाडतात व भविष्यातील कार्यासाठी स्फूर्ती देतात. रायगड जिल्ह्यातील या आडवाटेतील ठेव्याला भेट देऊन इतिहासाचा हा अनमोल वारसा अनुभवण्याची संधी सोडू नका.