म्हसळा - निसर्गाच्या सानिध्यातले गाव

सातवाहन काळ (इ.स.पू. २३० ते इ.स. २२०) मध्ये म्हसळा हे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. टॉलेमीच्या नोंदीनुसार, मुसोपल्ली (म्हसळा) हे समुद्रमार्गे युरोप आणि आशियाई देशांशी व्यापार करणारे केंद्र होते. राजपुरी खाडी येथील सामरिक स्थानामुळे सातवाहन राजवंशाने येथे व्यापारी आणि लष्करी चौक्या स्थापन केल्या होत्या. या काळात म्हसळा हे कोकणातील एक प्रमुख आर्थिक केंद्र होते.

म्हसळा - निसर्गाच्या सानिध्यातले गाव
म्हसळा

रायगड जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेले म्हसळा हे सध्याचे तालुक्याचे ठिकाण आपल्या निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात अशा राजपुरी खाडीच्या दक्षिण मुखास असलेले म्हसळा हे एकेकाळी नावाजलेले बंदरव्यापारी केंद्र होते. म्हसळ्याहून पश्चिमेकडे २५ कि.मी. अंतरावर अरबी समुद्र असून श्रीवर्धनदिवेआगर ही इतिहासप्रसिद्ध गावे याच ठिकाणी आहेत. किंबहुना मुंबईपुण्याहून श्रीवर्धन-दिवेआगर अथवा हरिहरेश्वर येथे जाण्यासाठी म्हसळामार्गेच जावे लागते. या लेखात आपण म्हसळा गावाची माहिती, इतिहास, निसर्गरम्यता, आणि पर्यटनस्थळे यांचा सखोल आढावा घेऊ.

म्हसळा गावाचे नाव आणि प्राचीन इतिहास

या गावास म्हसळा हे नाव कसे पडले याबाबत अनेक प्रवाद आहेत, मात्र सर्वात प्रमुख प्रवादानुसार या गावाचे प्राचीन नाव महेश्वर असून येथे पूर्वी असलेल्या महेश्वर नामक शिवमंदिरावरून हे नाव या गावास मिळाल्याचे सांगितले जाते. अर्थात, हे महेश्वराचे मंदिर आता काळाच्या उदरात गुप्त झाले आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात, म्हणजे सातवाहन काळात, युरोपातील ग्रीक भूगोलतज्ञ टॉलेमी याने आपल्या भारतभेटीच्या वेळी म्हसळ्याची ‘मुसोपल्ली’ अशी नोंद केली होती. या वरून सातवाहन काळात गावास ‘महेशपल्ली’ असेही नाव प्रचलित असावे, अशी शक्यता वाटते.

म्हसळा या गावाचे अनेक संदर्भ निजामशाही काळापासून मिळतात. निजामशाही, आदिलशाही, मराठे, आणि सिद्दी यांच्या काळात म्हसळ्याचा उल्लेख म्हशेळे, म्हैसळे अशा पद्धतीने केलेला आढळतो. कालांतराने या शब्दांचे अपभ्रंश होऊन म्हसळे हा शब्द निर्माण झाला असावा. या गावातील काही नागरिकांची आडनावे म्हासलाई, म्हशिलकर अशीही आहेत, त्यावरूनही गावाच्या प्राचीन नावाची ओळख पटू शकते.

म्हसळ्याचा ऐतिहासिक वारसा

सातवाहन काळ

सातवाहन काळ (इ.स.पू. २३० ते इ.स. २२०) मध्ये म्हसळा हे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. टॉलेमीच्या नोंदीनुसार, मुसोपल्ली (म्हसळा) हे समुद्रमार्गे युरोप आणि आशियाई देशांशी व्यापार करणारे केंद्र होते. राजपुरी खाडी येथील सामरिक स्थानामुळे सातवाहन राजवंशाने येथे व्यापारी आणि लष्करी चौक्या स्थापन केल्या होत्या. या काळात म्हसळा हे कोकणातील एक प्रमुख आर्थिक केंद्र होते.

निजामशाही आणि सिद्दी काळ

म्हसळा हे शहर अतिशय टुमदार असून येथे हिंदूमुस्लिम या दोन्ही धर्मांचे लोक बहुसंख्य आहेत. पूर्वी हा प्रांत सिद्दी या घराण्याच्या अखत्यारीत होता व सिद्दीच्या राज्यातल्या बारा महालांपैकी एक होता. भारतास स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा परिसर सिद्दी नवाबांच्या ताब्यात होता व या सर्व परिसरास हबसाण असे म्हटले जात असे. अतिशय दुर्गम अशा या प्रदेशावर शिवाजी महाराजांनी सन १६४८ साली चाल करून येथील काही किल्ले व गावे ताब्यात घेतली होती. मात्र, संधी मिळाली की सिद्दी परत दंडाराजपुरी खाडीतून हल्ला करून हा मुलुख मराठ्यांच्या हातून काबीज करत असे, त्यामुळे बराच काळ येथे सिद्दींची सत्ता अबाधित होती. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावरही हा भाग जंजिरेकर नवाबांच्या ताब्यात होता, कारण त्यांना स्वतंत्र राहायचे होते. मात्र, स्थानिक जनता, विशेषतः म्हसळेकरांनी, क्रांतिसूर्य नाना पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली जंजिरा मुक्ती संग्रामात भाग घेऊन म्हसळा प्रांत प्रजापरिषदेच्या ताब्यात घेतला. कालांतराने जनरेट्याला मान देऊन जंजिरेकर नवाबांनी ३१ जानेवारी १९४८ रोजी जंजिरा संस्थान भारतात विलीन केले.

मराठा काळ

मराठा साम्राज्याच्या काळात म्हसळा हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये येथील काही किल्ले ताब्यात घेतले, ज्यामुळे मराठा नौदलाला राजपुरी खाडीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. सिद्दींशी सततच्या संघर्षांमुळे म्हसळा हा मराठा-सिद्दी युद्धांचा केंद्रबिंदू बनला. आंग्रे काळात, कान्होजी आंग्रे यांनी म्हसळा आणि परिसरातील खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गावाचा वापर केला. मराठा साम्राज्याच्या पतनानंतर, ब्रिटिशांनी या भागावर नियंत्रण मिळवले, आणि म्हसळा हा कुलाबा जिल्ह्याचा भाग बनला.

म्हसळ्याचे भौगोलिक स्थान आणि निसर्गरम्यता

म्हसळ्याची लोकसंख्या दहा हजाराच्या वर असून विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात व विविध आळ्यांमध्ये या जाती विभागल्या गेल्या आहेत. म्हसळ्याचा बराचसा भाग हा डोंगराळ असून तीन बाजूंनी डोंगरएका बाजूने खाडीने वेढला गेला असल्याने गावात बाराही महिने अतिशय आल्हाददायक वातावरण असते व येथील तीनही ऋतू खऱ्या अर्थाने मन उल्हासित करणारे असतात. पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात थंड हवामान आणि सकाळी धुके पाहायला मिळते, तर उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

राजपुरी खाडी आणि अरबी समुद्राच्या जवळ असल्याने म्हसळा हे निसर्गप्रेमींसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. श्रीवर्धन, दिवेआगर, आणि हरिहरेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांमुळे म्हसळा हा पर्यटकांचा प्रवास मार्ग बनला आहे.

धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा

गावात ग्रामदैवत धाविर, गणपती, निगडेश्वर महादेव आदी प्रमुख मंदिरे व एक मशिद असून ग्रामदैवत धाविर देवाची दर चैत्र पौर्णिमेस खूप मोठी जत्रा भरते. यावेळेस नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व म्हसळेकर एकत्र येऊन जत्रेचा आनंद लुटतात. येथील लखमेश्वर महादेव मंदिर अतिशय रम्य असून येथे स्वामी समर्थकाळभैरव यांची मंदिरे सुद्धा आहेत. (रायगड जिल्हा गॅझेटिअर मध्ये मंदिराचा उल्लेख निगडेश्वर असा आला आहे.) लखमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी येथील व परिसरातील जुन्या मूर्त्या मंदिराचे प्राचीनत्व दर्शवितात. विशेषतः येथील नंदीची रचना विलक्षण असून एवढा धष्टपुष्ट नंदी क्वचित दुसरीकडे पाहायला मिळतो.

चिरेगणी: निसर्गरम्य शक्तीस्थळ

म्हसळ्याच्या आसमंतात अतिशय निसर्गरम्य पर्यटनस्थळे असून स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहेत, यातील एक म्हणजे म्हसळ्याच्या दक्षिणेस डोंगरात असलेले चिरेगणी हे शक्तीस्थळ. चिरेगणी ही देवता म्हसळेकरांचे श्रद्धास्थान असून अतिशय जागृत असल्याचे बोलले जाते. चिरेगणी देवीबद्दल जी अख्यायिका सांगितली जाते, त्यानुसार ही देवी ग्रामदैवत धाविर देव यांची पत्नी असून अतिशय शांतताप्रिय होती. मात्र, एकेकाळी मंदिर परिसरातल्या गजबजाटास त्रासून ही देवी म्हसळ्याच्या दक्षिणेकडील दुर्गम डोंगरातल्या एका झऱ्याजवळ कायमस्वरूपी स्थायिक झाली व झऱ्याचे स्थळ म्हणून या परिसरास चिरेगणी हे नाव मिळाले व देवीसुद्धा याच नावाने प्रसिद्ध झाली. नावाप्रमाणे हा परिसर अतिशय गूढनिसर्गरम्य असून डोंगरकपारीत बाराही महिने जिवंत झरा वाहत असतो. या झऱ्याचे अमृततुल्य पाणी टाक्या बांधून आडवले असून जलवाहिनीद्वारे हे पाणी अगदी उन्हाळ्यातही म्हसळेकरांची तहान भागवत असते. या परिसरात अनेक हिंस्त्र श्वापदांचे वास्तव्य असून पूर्वी येथे ढाण्या वाघाचा वावर असे, मात्र आता हा वाघ रायगड जिल्ह्यात दुर्मिळ झाला असला तरी अजूनही बिबटेरानडुक्कर यांसारखे अनेक प्राणी येथे पाणी पिण्यास येत असतात. म्हसळेकरांसाठी चिरेगणी हे स्थळ कौटुंबिक सहलीचेसहभोजनाचे सुद्धा स्थळ असून भक्तांनी येथे भक्तनिवासाचीभोजनगृहाची सोय सुद्धा केली आहे. मात्र, येथे आपण स्वतःच सर्व सामान आणून चुलीवर जेवण शिजवावे लागते.

अमृतेश्वर शिवमंदिर

म्हसळ्याच्या पूर्वेस असलेल्या देवघर येथे असलेले अमृतेश्वर शिवमंदिर सुद्धा भक्तांचे श्रद्धास्थान आहे. चालुक्यकालीन या शिवमंदिराचा येथून जवळच असलेल्या व नुकत्याच उत्खननाने प्रकाशझोतात आलेल्या चांदोरे येथील मंदिरांबरोबर गहरा संबंध आहे, हे येथील मूर्त्या, विरगळी, व सतीशिळा पाहिल्यावर लक्षात येते. अमृतेश्वर मंदिर हे चालुक्यकालीन स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे, आणि येथील कोरीव काम आणि प्राचीन मूर्त्या यांचा अभ्यास इतिहासप्रेमींसाठी आकर्षक आहे.

म्हसळ्याला पोहोचण्याचे मार्ग

म्हसळ्यास येण्यासाठी अनेक मार्ग असले तरी माणगाव-साईमार्गे म्हसळा हा प्रमुख रस्ता आहे. मोर्बा सोडले की हा रस्ता दऱ्या डोंगरातून जातो व अगदी म्हसळा येईपर्यंत ही डोंगरातली आडवळणी वाट आपली साथ सोडत नाही. याच रस्त्यावर म्हसळ्याकडे उतरणारा जो घाट आहे, त्या घाटाच्या पायथ्याला घोणसे नावाचे गाव आहे, आणि या गावावरून या घाटासही घोणसे घाटच म्हणतात. एकेकाळी हा घाट अतिशय भयंकर असून येथील उग्र वळणांचा अंदाज न येऊन शेकडो वाहनांचे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले होते, त्यामुळे हा घाट एक भयकथाच बनली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी याच घाटात पर्यायी रस्ता तयार करण्यात आल्याने आता अपघातांची संख्या खूपच कमी झाली आहे.

पर्यटन आणि निसर्गरम्य स्थळे

म्हसळा हे निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, आणि धार्मिक पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. राजपुरी खाडी, चिरेगणी, आणि अमृतेश्वर मंदिर यांसारखी स्थळे म्हसळ्याच्या सौंदर्यात भर घालतात. याशिवाय, श्रीवर्धन, दिवेआगर, आणि हरिहरेश्वर यांसारख्या जवळच्या पर्यटनस्थळांमुळे म्हसळा हे पर्यटकांचे हब बनले आहे. घोणसे घाट आणि त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.

पर्यटकांसाठी टिप्स:

  • सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च, कारण हवामान आल्हाददायक असते.

  • काय घ्यावे: पाण्याची बाटली, कॅमेरा, आणि आरामदायी शूज.

  • कसे पोहोचावे: माणगाव-साई मार्गे किंवा मुंबई-पुणे येथून नागोठणे-म्हसळा मार्गे स्वतःच्या वाहनाने किंवा स्थानिक वाहतुकीने.

म्हसळा हे रायगड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक गाव आहे, जे सातवाहन काळापासून व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. निजामशाही, मराठा, आणि सिद्दी यांच्या काळात म्हसळा हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते. राजपुरी खाडी, चिरेगणी, अमृतेश्वर मंदिर, आणि धाविर देव यांसारख्या स्थळांमुळे म्हसळा हे पर्यटनस्थळ म्हणूनही लोकप्रिय आहे. घोणसे घाट आणि त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव देतो. तेव्हा, न चुकता कधीतरी निसर्गाच्या सान्निध्यातल्या या टुमदार गावास भेट देण्याचा बेत कराच. श्रीवर्धन-दिवेआगर-हरिहरेश्वर सोबत म्हसळ्यासही भेट दिल्यास हा प्रवास एक वेगळाच आनंद देऊन जाईल.