आर्किमिडीज - प्राचीन काळातील प्रसिद्ध वैज्ञानिक

आर्किमिडीज याने भल्यामोठ्या आरशांच्या साहाय्याने सूर्याची किरणे परावर्तित करून ती आरमारातील जहाजांवर पाडली आणि त्यातून निर्माण झालेल्या उष्णतेने ती जहाजे जाळून खाक केली. याचवेळी त्याने दगडांचा मारा करणारी यंत्रे तयार केली व त्या यंत्रांचा वापर करून त्या जहाजांवर दगडांची वृष्टी करण्यात आली आणि त्या जहाजांचे तुकडे करण्यात आले.

आर्किमिडीज - प्राचीन काळातील प्रसिद्ध वैज्ञानिक
आर्किमिडीज

शालेय अभ्यासक्रमात आपल्या सर्वांनाच आर्किमिडीज सिद्धांत अथवा आर्किमिडीजची तत्वे हा विषय आला असेल. आर्किमिडीज हा प्राचीन काळात होऊन गेलेला एक मोठा गणितज्ञ, भौतिक वैज्ञानिक, खगोल वैज्ञानिक, अभियंता आणि संशोधक असून त्याने त्या काळात मांडलेले सिद्धांत आजही विज्ञान शास्त्रात वापरले जातात हे महत्वाचे.

आर्किमिडीज याचा जन्म इसवी सन पूर्व २८७ साली इटली देशातील साराक्यूज येथे झाला आणि इटली देशाच्या राजाचा तो नातेवाईक होता. अगदी सुरुवातीपासुनच तो राजाच्या दरबारी असताना त्याला नवे नवे शोध लावण्याची आवड निर्माण झाली होती व राजाही त्यास प्रोत्साहन देत असे.

असे म्हणतात की एका दिवशी राजाने एका कारागिरास नवीन मुकुट करण्यासाठी शुद्ध सोने दिले मात्र कारागिराने मुकुट बनवताना त्यात भेसळ करून त्यातील काही शुद्ध सोने काढून त्याऐवजी तेवढ्याच वजनाचे तांबे मिसळून मुकुट तयार केला. कारागीर जेव्हा राजाकडे मुकुट घेऊन आला त्यावेळी मुकुटाचे वजन तर बरोबर भरले मात्र मुकुटात काहीतरी गडबड आहे असा राजास संशय आला मात्र हे कसे शोधावे हे राजास समजेना त्यावेळी त्याने आर्किमिडीज यास मुकुटात झालेल्या भेसळीचा शोध लावण्यास सांगितले. 

आर्किमिडीजने मग सोने आणि तांबे या धातूच्या भरीव गोळ्या केला मात्र दोन्ही धातूंच्या एकाच वजनाच्या दोन भरीव गोळ्या या आकाराने सारख्या होऊ शकत नाहीत आणि त्या गोळ्या त्याने पाण्याने काठोकाठ भरलेल्या भांड्यांत टाकल्यावर त्यांच्या आकारमानाने प्रमाणे कमी जास्त पाणी बाहेर पडले यानंतर त्याने मुकुटाच्या वजनाएवढे सोने आणि दुसऱ्या बाजूला कारागिराने केलेला मुकुट पाण्याने भरलेल्या भांड्यांत टाकला आणि बाहेर आलेल्या पाण्यानुसार त्याने मुकुटात किती प्रमाणात भेसळ झाली आहे हे अचूक सांगितले. आर्किमिडीज याने काही आश्चर्यकारी आरसे तयार केले होते व त्यामध्ये ग्रहांच्या आणि उपग्रहांच्या गती दिसत असत. 

इसवी सन पूर्व २१२ साली रोमन सरदार मार्सेलस याने साराक्यूज वर जमीन व पाणी दोन्ही ठिकाणांहून वेढा घातला आणि हा वेढा तब्बल तीन वर्षे होता मात्र दोन्ही बाजुंनी कुणीही माघार घेण्यास तयार नव्हते. याच काळात रोमन लोकांचे एक मोठे आरमार समुद्रात येऊन थांबले होते ते जर रोमन सरदारास मिळाले असते तर साराक्यूज च्या राजाचा पराभव अटळ होता मात्र या आरमाराचा नाश कसा करावा हे राजाच्या लक्षात येईना मात्र त्याच्याकडे एक हुकुमी एक्का होता व तो म्हणजे आर्किमिडीज.   

आर्किमिडीज याने भल्यामोठ्या आरशांच्या साहाय्याने सूर्याची किरणे परावर्तित करून ती आरमारातील जहाजांवर पाडली आणि त्यातून निर्माण झालेल्या उष्णतेने ती जहाजे जाळून खाक केली. याचवेळी त्याने दगडांचा मारा करणारी यंत्रे तयार केली व त्या यंत्रांचा वापर करून त्या जहाजांवर दगडांची वृष्टी करण्यात आली आणि त्या जहाजांचे तुकडे करण्यात आले.

या युद्धात मात्र रोमन सैन्याचे बळ मोठे असल्याने त्यांचा विजय झाला आणि मार्सेलस याने शहराचा ताबा घेतला. मार्सेलस क्रूर असला तरी ज्ञानी व हुशार लोकांना राजाश्रय देणारा असल्याने त्याने आपल्या सैन्यास स्पष्ट सांगितले की शहरातील सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका व येथील कलाकृती सुद्धा नष्ट करू नका मात्र सैन्याने त्याचे न ऐकता शहरात मोठी जाळपोळ आणि लुटालूट सुरु केली. 

रोमन सैन्य घराघरात घुसून लोकांना ठार मारू लागले आणि झालेल्या पराभवानंतर आर्किमिडीज आपल्या घरात एक नवा व कठीण सिद्धांत सोडवत बसत होता आणि या कार्यात तो एवढा मग्न झाला होता की शहरात मोठा विध्वंस सुरु आहे हे त्याच्या लक्षातही नव्हते. आर्किमिडीज च्या घरात शिरल्यावर तो आपल्या कामात मग्न असलेला पाहून एक सैनिक त्यास म्हणाला की, चल तुला रोमन सरदार मार्सेलस ने बोलावले आहे मात्र आपल्या हातातील कागद त्याने सैनिकास दाखवला आणि म्हणाला की थोडा धीर धर, हा सिद्धांत पूर्ण सोडवला की मी लगेच येतो मात्र हे त्या सैनिकास सहन झाले नाही आणि त्याने आपल्या तलवारीने आर्किमिडीजचे मुंडके छाटले.

मार्सेलस यास जेव्हा आर्किमिडीज च्या निर्घृण हत्येची खबर मिळाली त्यावेळी तो अत्यंत संतप्त झाला आणि त्याने ज्या माणसाने आर्किमिडीजला ठार मारले त्यास शासन केले आणि आर्किमिडीज चे नातेवाईक शोधून त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करून दिली. अशा प्रकारे इसवी सन पूर्व २१२ साली प्राचीन काळातील एका प्रख्यात वैज्ञानिकाची अखेर झाली मात्र त्याने निर्माण केलेले सिद्धांत व शोध आधुनिक युगात मार्गदर्शक ठरले.