धनत्रयोदशी - दीपोत्सवाची सुरुवात

धनत्रयोदशीस उत्तरेस धनतेरस या नावानेही ओळखले जाते. धनत्रयोदशीस हे नाव कसे मिळाले याची माहिती उपलब्ध नसली तरी या दिवशी त्रयोदशी असल्याने व या दिवशी धनाची आराधना केली जात असल्याने तसेच हा दिवस दीपमहोत्सवाची सुरुवात असल्याने यास धनत्रयोदशी असे नाव मिळाले असावे.

धनत्रयोदशी - दीपोत्सवाची सुरुवात

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. या सणाचे महत्व म्हणजे हा सण वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज, बलिप्रतिपदा या सणांचा एक मोठा महोत्सव असल्याने या काळात संबध भारतभर चैतन्याचे व आनंदाचे वातावरण असते. दीपावली सणातील असाच एक महत्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी. हा सण अश्विन वद्य १३ या दिवशी असून दीपावली ची खरी सुरुवात येथून होते.

धनत्रयोदशीस उत्तरेस धनतेरस या नावानेही ओळखले जाते. धनत्रयोदशीस हे नाव कसे मिळाले याची माहिती उपलब्ध नसली तरी या दिवशी त्रयोदशी असल्याने व या दिवशी धनाची आराधना केली जात असल्याने तसेच हा दिवस दीपमहोत्सवाची सुरुवात असल्याने यास धनत्रयोदशी असे नाव मिळाले असावे कारण या सणासंबंधी जी कथा आहे तिचा व धनत्रयोदशी या नावाचा फारसा संबंध येत नाही मात्र या लेखात आपण या सणाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

फार पूर्वी यमाने आपल्या दूतास एक प्रश्न केला की, मी जेव्हा तुम्हाला एखाद्याचे प्राणहरण करण्यास पाठवतो व ज्यावेळी तुम्ही यमपाश घालून त्यांचे प्राणहरण करीत असता त्यावेळी तुम्हाला कुणाची दया आली होती का? यावेळी दूताने उत्तर दिलें की एकदा हंस या नावाचा राजा अरण्यात शिकारीसाठी गेला होता व शिकारीच्या शोधात असता तो आपल्या राजधानीपासून खूप लांब गेला आणि संध्याकाळ झाली त्यावेळी राजधानी दूर राहिल्याने शेजारी असलेल्या राज्यातील हैम नामक राजाच्या राजवाड्यात विश्रांतीसाठी थांबला.

याच काळात हैम राजास पुत्ररत्नाचा लाभ झाला असल्याने तो खुप आनंदात होता व हंस राजा त्याच्याकडे आल्यावर हैम राजाने त्याचे उत्तम स्वागत करून खूप मोठे आदरातिथ्य केले. या दिवशी षष्टीदेवीचा उत्सव होता व त्या रात्री देवीने हैम राजास दृष्टांत दिला व म्हणाली की तुझ्या मुलाचे लग्न होताच चौथ्या दिवशी त्याचा सर्पदंशाने मृत्यू होईल. राजास हे ऐकून अतिशय दुःख झाले आणि ही गोष्ट हंसराजास सांगितली. हंसराजास सुद्धा हे ऐकून खूप वाईट वाटले आणि त्याने हैमराजाच्या मुलाचा अपमृत्यु टाळण्यासाठी उपाय करण्याचा निश्चय केला आणि यमुना नदीच्या डोहात मध्यभागी मोठा राजवाडा बांधून त्यात मुलाच्या राहण्याची व्यवस्था केली.

कालांतराने मुलगा मोठा झाला आणि हंस आणि हैम या दोघांनी या मुलाचा विवाह एका सुस्वरूप राजकन्येशी करून दिला मात्र होणारी गोष्ट चुकत नसते या उक्तीप्रमाणे हा समारंभ काही दिवस सुरु असताना बरोबर चौथ्या दिवशी अचानक एक साप समारंभस्थळी आला आणि त्याने मुलास दंश केला आणि त्यास मरण आले. यावेळी त्याचे प्राण हरण करण्यास यमाच्या दूतांना तेथे यावे लागले आणि हा प्रसंग पाहून त्यांना अतिशय दुःख झाले कारण अशा विवाहासारख्या एका शुभप्रसंगी अशी अशुभ घटना घडलेली पाहून आम्हाला खूप दुःख झाले असे दूताने यमास सांगितले.

यानंतर दूत यमास म्हणले की हैमराजाच्या मुलावर जो प्रसंग कोसळला तो इतर कुणावर कोसळू नये यासाठी आपण काही उपाय सुचवला तर खूप बरे होईल. यावर यमाने दूतांना सांगीतले की, अश्विन कृष्ण १३ पासून पुढील पाच दिवस प्रत्यही प्रदोषकाली सर्व ठिकाणी जो दीपोत्सव साजरा करील त्यास तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यु येणार नाही व अश्विन कृष्ण १३ हा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. यावरून हे लक्षात येते की या दिवसाचे महत्व हे दीपावलीचा प्रथम दिवस म्हणून आहे.