छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ - एक अजरामर साहित्यकृती

संभाजी महाराजांनी साहित्यरचना करताना आपले टोपणनाव नृपशंभू हे ठेवले होते. नृप म्हणजे राजा व शंभू म्हणजे संभाजी. संभाजी महाराजांच्या साहित्यिक योगदानाने त्यांच्या विद्वत्तेची आणि सांस्कृतिक समृद्धीची ओळख होते.

छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ - एक अजरामर साहित्यकृती
छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यकृती

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इतिहासात आपल्या असामान्य कर्तृत्वाने नाव कोरणारे नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वारसा त्यांनी जपलाच मात्र आपल्या कारकिर्दीत स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण केली.

संभाजी महाराजांची राजकीय कारकीर्द

संभाजी महाराजांची राजकीय कारकीर्द एकूण नऊ वर्षांची असली तरीही अगदी लहान वयात त्यांच्यावर राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ आली. वयाच्या ८ व्या वर्षी पुरंदरच्या तहानंतर संभाजी महाराजांना मुघलांकडून पंचहजारी मनसबदारी मिळाली होती. आग्रा येथे शिवाजी महाराज गेले असता त्याच्या सोबत स्वराज्याचे भविष्य अर्थात संभाजी महाराजही होतेच. खरं तर ही खूप मोठी जोखीम होती मात्र शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने जाणते राजे असल्याने संभाजी महाराज लहान असले तरीही त्यांची त्या वयातील प्रगल्भता पाहून त्यांना आपल्या सोबत आग्रा येथे नेले. आग्रा येथे औरंगजेबाकडून शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना नजरकैद करण्यात आले व त्यांच्यावर कडा पहारा बसवण्यात आला. मात्र चातुर्याने शिवाजी महाराजांनी लहानग्या संभाजी राजांसहित आपली तेथून सुटका करून घेतली. या प्रसंगात संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दाखवलेली प्रगल्भता आणि धैर्य यामुळे स्वराज्याच्या भविष्याची आशा अधिक दृढ झाली. मुघलांच्या नजरकैदेतून सुटका करून घेण्याचा हा प्रसंग संभाजी महाराजांच्या धैर्याचा आणि शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा परिचय देतो.

नजरकैदेतून सुटका आणि प्रगल्भता

सुटकेच्या प्रयत्ना दरम्यान फक्त ८ वर्षांचे असूनही संभाजी महाराजांनी प्रगल्भता दाखवली म्हणूनच हे शक्य झाले कारण सुटकेचे प्रयत्न कुणालाही समजणे धोक्याचे होते अशावेळी आपण आपल्या वडिलांसहित कैदेत आहोत व सुटकेसाठी वडील प्रयत्न करत आहेत ही समज निश्चितच त्यांच्यात होती म्हणूनच या भयकंर प्रसंगातून निभावता आले. अगदी सुटका झाल्यावरही संभाजी महाराज काही काळ त्याच परिसरात महाराजांच्या विश्वासू लोकांसोबत मथुरा येथे राहिले व शिवाजी महाराज स्वराज्यात दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी शत्रूला चकवा देत ते सुद्धा स्वराज्यात दाखल झाले. या घटनेने संभाजी महाराजांच्या लहान वयातील बुद्धिमत्ता आणि धैर्याची प्रचिती येते. मुघलांच्या कडक पहाऱ्यातून सुटका करून स्वराज्यात परतणे हा त्यांच्या शौर्याचा आणि सामरिक समजुतीचा परिचय देतो. संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच बिकट परिस्थितीचा सामना केला, ज्यामुळे त्यांचे नेतृत्व आणि स्वराज्याप्रती निष्ठा अधिक दृढ झाली.

संभाजी महाराजांचे साहित्यिक योगदान

लहानपणापासून बिकट परिस्थितीचा सामना करण्याची सवय संभाजी महाराजांना होती मात्र याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या अनेक गुणांपैकी एक गुण म्हणजे ते एक लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी एक नव्हे तर चार साहित्य रचना केल्या ज्या संस्कृत व ब्रजभाषेत होत्या. बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, सातसतक अशा या रचना होत. संभाजी महाराजांनी साहित्यरचना करताना आपले टोपणनाव नृपशंभू हे ठेवले होते. नृप म्हणजे राजा व शंभू म्हणजे संभाजी. संभाजी महाराजांच्या साहित्यिक योगदानाने त्यांच्या विद्वत्तेची आणि सांस्कृतिक समृद्धीची ओळख होते. त्यांनी रचलेल्या साहित्यकृती त्यांच्या बौद्धिक सामर्थ्याचा आणि सौंदर्यदृष्टीचा परिचय देतात. या रचनांनी मराठा इतिहासातील सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आहे.

बुधभूषण

संभाजी महाराजांचा बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत असून या ग्रंथाची फक्त तीनच प्रकरणे मिळाली आहेत. अनेक अभ्यासकांच्या मते बुधभूषण ग्रंथाची इतरही प्रकरणे असावीत. बुधभूषण ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात एकूण १६४ श्लोक आहेत. यामध्ये गणेश, शिव, गुरु आणि पार्वती प्रार्थना असून नंतर संभाजी महाराजांच्या वंशाचे वर्णन आहे. पुढील श्लोकांत भोसले घराण्याची कुलदेवता भवानी मातेची स्तुती आहे. बुधभूषणाच्या दुसऱ्या अध्यायात राजनीती शास्त्राची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या अध्यायात एकूण ६३२ श्लोक आहेत. तिसऱ्या अध्यायाचे नाव मिश्रप्रकरण असे असून त्यात ५७ छंद आहेत. यामध्ये राजाने पाळावयाचे धर्म व तत्व यांची माहिती दिली आहे. हा ग्रंथ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांनी लिहिला. बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराजांच्या राजकीय आणि धार्मिक विचारांचा आढावा घेणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, जो मराठा इतिहासातील साहित्यिक योगदानाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

नायिकाभेद

संभाजी महाराजांची दुसरी साहित्य रचना म्हणजे नायिकाभेद. हा ग्रंथ ब्रजभाषेत लिहिला गेला आहे. नायिकाभेद या ग्रंथाचे श्लोक अखंड सापडले नसल्याने हा ग्रंथ पूर्ण स्वरूपात मिळत नाही. हा ग्रंथ संभाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर लिहिला असावा कारण या ग्रंथात ते स्वतःचा उल्लेख नृपशंभू असे करतात. नायिकाभेद हा ग्रंथ त्यांच्या काव्यात्मक संवेदनशीलतेचा परिचय देतो, आणि ब्रजभाषेतील त्यांच्या प्रभुत्वाचे दर्शन घडवतो. या ग्रंथाने मराठा साहित्याला एक नवी दिशा दिली.

नखशिख

संभाजी महाराजांची तिसरी साहित्य रचना म्हणजे नखशिख. हा ग्रंथ काशीच्या नागरी प्रचारणी सभेत उपलब्ध आहे. नखशिख मध्ये एकूण १३६ छंद असून ब्रजभाषेतील कवित्त, सवैया, दोहा आणि छप्पेय अशा विविध छंदांचा वापर करून हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला आहे. नखशिख हा ग्रंथ त्यांच्या काव्यकौशल्याचा आणि सौंदर्यदृष्टीचा परिचय देतो. ब्रजभाषेतील विविध छंदांचा वापर करून त्यांनी मराठा साहित्याला समृद्ध केले आहे.

सातसतक

संभाजी महाराजांची चौथी साहित्य रचना म्हणजे सातसतक. हा ग्रंथ सुद्धा काशीच्या नागरी प्रचारणी सभेत प्रथम मिळाला. ग्रंथात एकूण १०० छंद असून सुरुवातीचे ७ छंद प्रास्ताविक स्वरूपात आहेत. सातसतक हा ग्रंथ संभाजी महाराजांच्या साहित्यिक संवेदनशीलतेचा आणि धार्मिक विचारांचा परिचय देतो. या ग्रंथाने त्यांच्या काव्यकौशल्याची आणि बौद्धिक प्रगल्भतेची प्रचिती येते.

संभाजी महाराजांचा प्रेरणादायी वारसा

स्वधर्मे निधन श्रेय पराधर्मो भयावह या पंक्तीचे पालन करून हसत हसत मृत्यूस स्वीकारणारे संभाजी राजांचे मन बाहेरून कठोर मात्र आतून किती कोमल होते हे त्यांनी निर्माण केलेल्या साहित्य रचना वाचुन समजून येते. संभाजी महाराजांनी स्वराज्याचा राजकीय वारसा जपताना आपल्या साहित्यिक योगदानाने मराठा इतिहासाला सांस्कृतिक समृद्धी प्रदान केली.