परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी - औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्याचे संस्थापक

छत्रपती राजाराम महाराजांसोबत जिंजीस असताना परशुराम त्र्यंबक यांनी चांगली कामगिरी बजावल्याने छत्रपती राजाराम महाराजांनी परशुराम यांना समशेरबहाद्दूरजंग हा किताब दिला.

परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी - औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्याचे संस्थापक
परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी

छत्रपती शाहू महाराजांच्या प्रधान मंडळात पंतप्रतिनिधी पदाची जबाबदारी पार पडणारे परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी हे औंध संस्थानाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात.

परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांचा जन्म १६६० साली सातारा जिल्ह्यातील किन्हई या गावी झाला. किन्हई हे गाव वर्धनगडाच्या पायथ्याशी असून या गावाचे कुलकर्णी पद परशुराम त्रिंबक यांच्या घराण्याकडे होते.

परशुराम यांच्या वडिलांचे नाव त्र्यंबकपंत तर मातेचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वडिलांच्या निधनानंतर गावाच्या कुलकर्णी पदाची जबाबदारी वंशपरंपरेनुसार परशुराम यांच्याकडे आली मात्र वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी गावाचे कुलकर्णी पद सोडले आणि तेथून त्यांनी विशाळगड येथे जाऊन निळो सोमदेव अमात्य यांच्याकडे नोकरी सुरु केली.

ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराज जिंजीस गेले त्यावेळी त्यांनी परशुराम पंतांना निळो सोमदेव अमात्य यांच्या नेतृत्वाखाली सरदार पद दिले व ही घटना १६९० साली घडली.

छत्रपती राजाराम महाराजांसोबत जिंजीस असताना परशुराम त्र्यंबक यांनी चांगली कामगिरी बजावल्याने छत्रपती राजाराम महाराजांनी परशुराम यांना समशेरबहाद्दूरजंग हा किताब दिला.

१६९२ साली मोगलांविरोधात लढण्यासाठी परशुराम त्र्यंबक यांची नेमणूक होऊन त्यांना पन्हाळा मोगलांकडून जिंकण्यासाठी पाठवले गेले व १६९२ साली मोगलांविरोधात युद्ध करून पन्हाळा किल्ला परशुराम यांनी मोगलांपासून स्वराज्यात पुन्हा घेतला आणि त्याचसोबत मिरज ते रांगणा किल्ल्यापर्यंतचा मुलुख सुद्धा मोगलांच्या कचाट्यातून मुक्त केला.

१६९९ साली छत्रपती राजाराम महाराजांनी परशुराम यांना पंतप्रतिनिधी हे पद तात्पुरत्या स्वरूपात दिले मात्र काही काळाने त्यांनी परशुराम त्र्यंबक यांना पेशवे पद देऊन त्यांच्याकडील पंतप्रतिनिधी हे पद तिमाजीपंत हणमंते यांच्याकडे दिले.

छत्रपती शाहू महाराज राज्यपदी आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रतिनिधी हे पद परशुराम त्र्यंबक यांना वंशपरंपरेने वतन करून दिले आणि त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणाले की, एकनिष्ठपणाची सीमा केली, महत्कार्य करून राज्यरक्षण केले म्हणून वंशपरंपरेने वतनी करून दिले.

मात्र छत्रपती शाहू महाराज साताऱ्यास येण्यापूर्वी छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांच्या एकनिष्ठ लोकांमध्ये परशुराम त्र्यंबक एक असल्याने व ताराबाई यांच्या पक्षात पूर्णपणे एकनिष्ठ राहण्याचे वचन त्यांनी घेतले असल्याने परशुराम त्र्यंबक यांना काही काळ तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता.

छत्रपत्री शाहू महाराज यांचा सातारा येथे राज्याभिषेक संपन्न झाल्यावर खटावकर यांच्यावर केलेल्या स्वारीत परशुराम त्र्यंबक यांचा द्वितीय पुत्र श्रीपाद याने मोठा पराक्रम केल्याने छत्रपती शाहू महाराज अत्यंत आनंदी झाले आणि त्यांनी परशुराम पंतांना कैदेतून मुक्त करून पुन्हा एकदा पंतप्रतिनिधी हे पद वंशपरंपरेने दिले. ही घटना १७१४ साली घडली.

त्यानतंर परशुराम त्र्यंबक हे कायमच छत्रपती शाहू महाराजांशी एकनिष्ठ राहिले व शाहू महाराजांची सुद्धा परशुराम यांच्यावर चांगली मर्जी बसली व परशुराम यांनी राज्याची चांगली सेवा केल्याबद्दल छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा वेळोवेळी त्यांचे कौतूक करून त्यांना अनेक इमाने दिली.

परशुराम त्र्यंबक हे शूर होतेच मात्र ते एक भगवद्भक्त सुद्धा असून ते संस्कृत भाषेत सुद्धा निपुण होते. ते स्वतः काव्य लिहून कीर्तन सुद्धा करीत असेही उल्लेख आढळतात.

परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांचा मृत्यू १७१८ साली सातारा येथे झाला व त्यांची समाधी सातारा येथील संगम माहुली येथे आहे. याच ठिकाणी त्यांच्या पत्नीची सुद्धा समाधी आहे. परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांना पाच पुत्र व दोन कन्या होत्या व परशुराम यांच्या निधनानंतर पंतप्रतिनिधी हे पद त्यांच्या वंशजांकडे वंशपरंपरेने आले.