कहाणी महाबळेश्वरच्या आर्थरसीटची
चार्लस मॅलेट हा १७९१ साली पुणे दरबारात रेसिडेंट होता. त्याचा मुलगा आर्थर मॅलेट मुंबईहून महाबळेश्वरला येण्यासाठी निघाला. त्याकाळी हा प्रवासमार्ग काहीसा विचित्र होता – मुंबईहून बाणकोट बंदरापर्यंत बोटीने, मग सावित्री नदीच्या काठाने महाबळेश्वरकडे.
महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. निसर्गसौंदर्य, थंड हवामान आणि ऐतिहासिक ठिकाणांमुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. याच महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध पॉईंट म्हणजे आर्थरसीट पॉईंट. या ठिकाणाचा देखावा जसा अप्रतिम आहे तशीच यामागील कथा मात्र अतिशय करूण आहे.
आर्थरसीट पॉईंटची उंची आणि देखावा
महाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १४७३ मीटर अर्थात ४४२१ फूट इतकी आहे. इथून दिसणारा देखावा केवळ नयनरम्य असतो. किल्ल्यांची माहिती असेल तर इथून खालच्या बाजूला दिसणारे चंद्रगड, मंगळगड हे किल्ले स्पष्ट दिसतात.
मढीमहाल ते आर्थरसीट
पायथ्याशी असलेल्या ढवळे गावातून चंद्रगडाला वळसा घालून ढवळ्या घाटाने पाच तासांची दमछाक करणारी चढण चढून आले की आपण येतो ते आर्थरसीट पॉईंटच्या खाली. मुळात याचं नाव आहे मढीमहाल. मग मढीमहालाला कुठून पडले हे आर्थरसीट पॉईंट असे नाव? यामागे आहे एक हृदय हेलावून टाकणारी घटना.
आर्थर मॅलेटची करूण कहाणी
सर चार्लस मॅलेट हा १७९१ साली पुणे दरबारात रेसिडेंट होता. त्याचा मुलगा आर्थर मॅलेट मुंबईहून महाबळेश्वरला येण्यासाठी निघाला. त्याकाळी हा प्रवासमार्ग काहीसा विचित्र होता – मुंबईहून बाणकोट बंदरापर्यंत बोटीने, मग सावित्री नदीच्या काठाने महाबळेश्वरकडे.
हा आर्थर मॅलेट त्यांची पत्नी आर.वाय. सोफिया आणि जेमतेम ३२ दिवसांची मुलगी एलेन यांच्यासह प्रवासास निघाला. मात्र त्याची बोट ऐन वादळात सापडली. या दुर्घटनेत त्याच्या पत्नीला, लहान मुलीला आणि बोटीवरील तेरा खलाशांना जलसमाधी मिळाली. बाणकोटच्या हिंमतगडाच्या थोडेसे खालच्या अंगाला त्यांचे दफन करण्यात आले, जिथे आजही स्मारक उभे आहे.
त्यावर लिहिले आहे –
Here the mortal remain of RY Sophia Morcia aged 25 years and ELLEN HARRIET aged 32 days the beloved wife and Daughter of ARTHUR MALLET of the Bombay Civil Service.
दु:खद आठवणीचे स्मरणस्थान
आर्थर मॅलेट पुढे महाबळेश्वरला पोहोचला. कामातून सवड मिळाल्यावर तो सावित्री नदीच्या उगमाशी, मढीमहालाशी, अत्यंत दु:खित मनाने टक लावून पाहत बसे. हाच तो कडा आता आर्थरसीट पॉईंट म्हणून ओळखला जातो.
या ठिकाणाहून किंचित खालच्या बाजूला भैरोबाचे ठाणे आहे. ढवळ्या घाटातून येणारा पदभ्रमण मार्ग इथूनच जातो. घाटमाथ्यावरचा भन्नाट वारा, दरीचा देखावा आणि इतिहासाची आठवण या सर्वामुळे आर्थरसीटला वेगळंच आकर्षण लाभलं आहे.
आर्थरसीट पॉईंट हे महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्याचे आणि ब्रिटिशकालीन इतिहासाचे अद्वितीय मिश्रण आहे. आज येथे हजारो पर्यटक येतात, छायाचित्रे काढतात, निसर्गाचा आनंद घेतात. पण या ठिकाणामागे दडलेली आर्थर मॅलेटची करूण कथाही तितकीच महत्त्वाची आहे.
महाबळेश्वर भेटीत आर्थरसीट बघायला आल्यावर क्षणभर त्या दु:खद इतिहासाची आठवण नक्की काढावी.