पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

आहिल्यादेवी होळकर यांचा जन्म सन १७२५ साली झाला. आहिल्याबाई या मूळच्या बीड येथील चौंढे गावच्या कन्या. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंढे गावचे पाटील होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

महाराष्ट्राच्या इतिहासात पुष्कळ अमूल्य अशी स्त्रीरत्ने होऊन गेली. काहींनी आपल्या पराक्रमाने, काहींनी आपल्या बुद्धी व औदार्याने तर काहींनी आपल्या लोकोत्तर गुणांमुळे इतिहासात आपले नाव कायमचे कोरून ठेवले.

आहिल्याबाई होळकर यांचा परिचय आणि प्रारंभिक जीवन

असेच एक स्त्रीरत्न म्हणजे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर. आहिल्याबाईंना जनमानसात पुण्यश्लोक या पदवीने ओळखले जाते व ही पदवी त्यांनी आपल्या सात्विक वृत्तीने मिळवली. इतिहासात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा आहिल्यादेवी होळकर यांचा जन्म सन १७२५ साली झाला. आहिल्याबाई या मूळच्या बीड येथील चौंढे गावच्या कन्या. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंढे गावचे पाटील होते. १७३३ साली आहिल्याबाई यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्यासोबत संपन्न झाला. खंडेराव हे तसे स्वतंत्र वृत्तीचे असले तरी आहिल्यादेवी यांच्या शब्दाबाहेर ते कधीही नसत. १७४५ साली आहिल्याबाईंनी मालेराव या मुलास देपालपूर येथे जन्म दिला व तीन वर्षांनी मुक्ताबाई नावाचे कन्यारत्न त्यांना प्राप्त झाले. आहिल्याबाई यांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांचे कुटुंबीय यांनी त्यांच्या नेतृत्व आणि सात्विक गुणांना आकार दिला, ज्यामुळे त्या मराठा इतिहासात अजरामर झाल्या.

खंडेराव यांचे निधन आणि आहिल्याबाईंची जबाबदारी

१७५४ साली कुंभेरीच्या किल्ल्यास मराठ्यांनी वेढा घातला होता त्यावेळी खंडेराव होळकर यांना गोळी लागून हौतात्म्य प्राप्त झाले. खंडेराव यांचे जाणे आहिल्याबाई यांच्यासाठी अतिशय मोठा धक्का होता. त्यांनी आपल्या पतीसोबत सहगमन करण्याचे ठरवले मात्र आहिल्याबाईंचे सासरे मल्हारराव यांनी आहिल्याबाईंना सती जाण्यापासून प्रवृत्त केले व म्हणाले, “तू आम्हाकडे पाहून मागे राहिलीस तर खंडू राहिला व अहल्या गेली.” मल्हारराव व इतरांनी खूप समजावल्याने आहिल्याबाईंनी सहगमन गेले नाही. यानंतर मल्हाररावांनी आपल्या संस्थानाचा सर्व कारभार आहिल्याबाईंच्या स्वाधीन केला. या कठीण काळात आहिल्याबाईंनी आपली जबाबदारी स्वीकारली आणि होळकर संस्थानाचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. त्यांच्या धैर्याने आणि नेतृत्वाने मराठा इतिहासात एक नवीन अध्याय निर्माण झाला.

होळकर संस्थानाचा कारभार आणि रघुनाथराव यांच्याशी संघर्ष

१७६६ साली मल्हारराव मरण पावले यानंतर संस्थानाची व कुळाची सर्व जबाबदारी आहिल्याबाई यांच्यावरच येऊन पडली. त्यांनी आपला २१ वर्षीय पुत्र मालेराव यास गादीवर बसवून त्याच्या नावाचा शिक्का सुरु करून राज्यकारभार पाहू लागल्या मात्र दुर्दैवाने पुढील १ वर्षभरातच मालेरावाचा मृत्यू झाला. मालेराव यांच्या मृत्यूनंतर त्यांनी होळकर घराण्यातील मुलगा दत्तक घ्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली. कालांतराने त्यांनी जानोजी होळकर यांचा पुत्र तुकोजी यास दत्तक घेतले. मल्हारराव व मालेराव यांच्या मृत्यूनंतर रघुनाथराव पेशवे यांनी होळकर संस्थानाचा कारभार स्वतःच्या ताब्यात घ्यावा असा विचार केला. होळकरांचे कारभारी गंगोबा चंद्रचूड हे राघोबाचे समर्थक होते त्यानुसार दत्तक घेऊन गंगोबाने कारभार चालवायचा असा बेत तयार करण्यात आला. मात्र ज्यावेळी हा बेत आहिल्याबाईंना समजला तेव्हा त्यांनी राघोबादादास स्पष्ट सांगितले कि जहागिरी व फौजेची जबाबदारी सांभाळण्यास मी समर्थ आहे. इतर कुणीही त्यात ढवळाढवळ करू नये. माधवराव पेशवे यांना हा बाणेदारपणा खूप आवडला मात्र राघोबादादांना हे रुचले नाही. त्यांनी सरळ आहिल्याबाईंना इंदुरवर हल्ला करण्याची धमकी दिली. आहिल्याबाई सुद्धा लढण्यास तयार झाल्या त्यांनी त्वरित तुकोजी होळकर यांना फौजेचे मुख्य केले आणि राघोबा समर्थक गंगोबा यांना कारभारावरून काढून टाकले. आहिल्याबाई येथे तयारी करत असताना रघुनाथराव यांनी शिंदे, नागपूरकर भोसले, गायकवाड आणि दाभाडे इत्यादी सरदारांसह तयारी सुरु केली. आहिल्याबाईंना हे समजताच त्यांनी आपले दूत माधवराव पेशवे यांच्याकडे रवाना केले व भोसले, गायकवाड आणि शिंदे यांना आपल्या बाजूने वळवून घेतले. महादजी शिंदे यांनीही इंदुरवर स्वारी करण्यास नकार दिला. यानंतर आहिल्याबाई यांनी रघुनाथरावांना पुढील संदेश पाठवला, “माझा पराभव झाला तर मी अबलाच आहे, पण आपणावर तो प्रसंग आला तर जग काय म्हणेल याचा विचार करून युद्धास तयार व्हावे.” आहिल्याबाईंच्या या पत्राने रघुनाथराव थंड पडले व त्यांना युद्धाचा बेतही गुंडाळावा लागला. या प्रसंगाने आहिल्याबाई यांचे नेतृत्व आणि धैर्य सर्वांसमोर आले, ज्यामुळे त्यांचे नाव मराठा इतिहासात अजरामर झाले.

आहिल्याबाई यांचे युद्ध आणि प्रशासकीय योगदान

१७७१ च्या सुमारास मेवाडचा राणा अरिसिंह यांच्याकडून महादजी शिंदे यांनी काही परगणे घेतले त्यावेळी आहिल्याबाईंनी सुद्धा काही मुलुख राणाकडून मिळवला होता याशिवाय रामपुऱ्याच्या जहागीरदाराचे बंड मोडण्याच्या कामात आहिल्याबाईंचा मुख्य सहभाग होता. आहिल्याबाईंनी होळकरांच्या सैन्याचे अधिपत्य तुकोजी यांच्याकडे दिले असले तरी मुख्य कारभार त्याच पाहत. गोविंदपंत गानू हे आहिल्याबाईंचे मंत्री होते. विविध ठिकाणी होळकर दरबारातील जे प्रतिनिधी असत त्यांची नेमणूक स्वतः आहिल्याबाईच करीत. दीर्घ मुदतीच्या कराराने जमीन भाड्याने देण्याची पद्धत प्रथम आहिल्यादेवींनी सुरु केली असे माल्कम म्हणतो. आहिल्याबाई यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने आणि दूरदृष्टीने होळकर संस्थानाला स्थैर्य आणि समृद्धी प्रदान केली. त्यांनी सैन्य आणि प्रशासन यांचा समतोल राखला, ज्यामुळे होळकर संस्थान मराठा साम्राज्यात एक बलशाली शक्ती बनले.

आहिल्याबाईंची सामाजिक आणि धार्मिक कार्ये

आपल्या राज्यात लोकहिताची अनेक कामे आहिल्याबाईंनी केली अन्नछत्रे, धर्मशाळा, विहिरी, रस्ते व घाट विपुल प्रमाणात उभारले. काशी येथील विश्वेश्वराचे मंदिर आहिल्याबाई यांनी पुन्हा बांधले याशिवाय गया येथील विष्णुपदाच्या मंदिराचा सुद्धा त्यांनी जीर्णोद्धार केला. कलकत्ता ते काशी रस्ता, काशीचा मणिकर्णिका घाट, दशाश्वमेघ घाट, सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही मोठं मोठी धर्मकृत्ये त्यांनी केली. या कार्यांमुळे आहिल्याबाई यांना जनमानसात पुण्यश्लोक ही पदवी मिळाली. त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यांनी मराठा साम्राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला बळकटी मिळाली. त्यांनी आपल्या कार्यातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणले आणि सामाजिक कल्याणासाठी अथक परिश्रम केले.

आहिल्याबाई यांचा वैयक्तिक जीवन आणि अंतिम काळ

आपल्या कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत त्यांनी आपल्या मुलाचा शिक्काच कायम ठेवला होता. त्यांच्या मुलीचे लग्न यशवंतराव फणशे यांच्यासोबत झाले होते. १७९० साली त्यांच्या मुलीचा मुलगा नथ्याबा फणशे याचे निधन झाले त्यानंतर एकच वर्षात जावई यशवंतराव फणशे हे सुद्धा वारले. यशवंतराव फणशे यांचे निधन झाल्यावर आहिल्याबाई यांच्या कन्या मुक्ताबाई सुद्धा सती गेल्या. दि. १३ ऑगस्ट १७९५ साली आहिल्याबाईचे निधन झाले. आपले औदार्य, न्यायप्रियता, भूतदया व सदाचरण या गुणांमुळे त्यांना पुण्यश्लोक हा बहुमान मिळाला. त्यांच्या या गुणामुळे त्यांच्या कारकिर्दीत राज्यात बंडे झालीच नाहीत याशिवाय अनेक राजे राजवाडे त्यांना खूप मान देत त्यामुळे राज्यावर आक्रमण करण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नसे. अशा या चारित्र्यवान पुण्यश्लोक देवीस शतशः नमन.