नजीबखान रोहिला - पानिपतच्या युद्धास कारणीभूत ठरलेला इसम

नजीबखान हा दुआब प्रांतातील सहारणपूर प्रांताचा जहागीरदार होता. नजीबखानाचा स्वभाव मुळात मोठा कारस्थानी होता.

नजीबखान रोहिला - पानिपतच्या युद्धास कारणीभूत ठरलेला इसम
नजीबखान रोहिला

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा मुख्य शत्रू म्हणून अफगाणिस्तानचा सुलतान अहमदशाह अब्दाली हा ओळखला जात असला तरी त्यास भारतात आणण्यात ज्याचा हात होता तो म्हणजे नजीबखान रोहिला.

नजीबखान हा दुआब प्रांतातील सहारणपूर प्रांताचा जहागीरदार होता. नजीबखानाचा स्वभाव मुळात मोठा कारस्थानी होता. 

सुरुवातीस त्याने मोगल सरदार गाजीउद्दीनचा विश्वासघात करून नजीबखानाने अब्दालीला जवळ केले आणि स्वतः दिल्लीत प्रबळ होऊन बसला. यानंतर मीर शहाबुद्दीन याने नजीबखानाच्या विरोधात रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांची मदत घेतली आणि नजीबखानाचा पाडाव केला.

या पराभवानंतर खरे तर नजीबखान मराठ्यांकडून मारला गेला असता मात्र त्याने पेशवे आणि होळकर यांच्याकडे गयावया करून जीवदान मागितले आणि त्याला यावेळी जिवंत सोडणे ही मराठ्यांची खूप मोठी चूक ठरली.

एकदा जीवदान मिळूनही नजीबखानाच्या कारस्थानी स्वभावात फरक पडला नाही आणि १७६० सालच्या पावसाळ्यात मराठ्यांचे सैन्य उत्तर हिंदुस्थानात नसल्याचा फायदा उचलून अब्दालीला उत्तर हिंदुस्तानात बोलावून घेतले.

मराठ्यांचा फायदा होईल म्हणून गंगेवर पूल बंधू असे खोटे अमिश त्याने दत्ताजी शिंदे यांना दाखवले आणि त्याच मार्गाने अब्दालीला उत्तर भारतात प्रवेश मिळवून दिला आणि अब्दाली गंगेचा पूल ओलांडून आत आल्यावर दत्ताजी शिंदे यांना कारस्थान करून होळकरांपासून वेगळे करून त्यांना एकटे पडून त्यांची हत्या केली.

पानिपतचे युद्ध झालयावर काही काळ मराठ्यांचे उत्तर भारताकडे दुर्लक्ष झाले यावेळी नजीबखानाने उत्तर भारतात मोठी उचल खाल्ली.

१७६३ साली नजीबखानाने दिल्लीजवळ सुरजमल जाट याचा पराभव करून त्याची हत्या केली.

आपल्या पित्याचा बदला घेण्यासाठी सुरजमल जाट याचा पुत्र जवाहिरमल याने नजीबखानाच्या सैन्यासोबत अनेक लढाया करून त्याचे मोठे नुकसान केले.

१७७० साली मराठ्यांनी पुन्हा एकदा उत्तर भारतात आपले वर्चस्व निर्माण केले आणि नवलसिंग याचा पराभव केला हे पाहून लवकरच मराठे आपलाही समाचार घेतील अशी भीती वाटून त्याने पुन्हा एकदा आपल्या कारस्थानांना सुरुवात केली.

आपण कितीही प्रयत्न केले तरी आपला मराठ्यांसमोर टिकाव लागू शकत नाही अशी खात्री होऊन त्याने शेवटी मराठ्यांसमोर शरणागती पत्करून पानिपतचे युद्ध होण्यापूर्वी दुआब प्रांतातील जेवढा मुलुख मराठ्यांकडे होता त्याच्या सनदा मोगल शहाजाद्याकडून मिळवून त्या मराठ्यांना दिल्या आणि स्वतः त्याचा मुलगा झबेता खान याच्यासह आपले लष्कर घेऊन मराठ्यांच्या फौजेत तुकोजीराव होळकर यांच्या अखत्यारीत नोकरी करू लागला.

१७७० सालच्या ऑकटोबर महिन्यात नजिबगडाकडे जात असताना वाटेतच नजीबखानाचा मृत्यू झाला. आपल्या अखरेच्या काळात जरी पर्याय नसल्याने नजीबखान मराठ्यांच्या आश्रयास आला असला तरी अब्दालीला आमंत्रण देऊन पानिपतचे संहारक युद्ध घडवण्यास मुख्य कारण हा नजीबखानच होता हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.