खर्ड्याची प्रसिद्ध लढाई

मराठयांनी निजामाविरोधात तब्बल एक लाख तीस हजार एवढे सैन्य तयार करून निजामाच्या राज्याच्या दिशेने कूच केले.

खर्ड्याची प्रसिद्ध लढाई

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

मराठा साम्राज्याचे अखेरचे यशस्वी युद्ध म्हणजे खर्ड्याचे युद्ध. हे युद्ध १७९५ साली झाले व या युद्धात संपूर्ण मराठा राज मंडळ मराठा साम्राज्याच्या अस्मितेसाठी एकत्र येऊन लढले.

खर्ड्याची लढाई ही हैद्राबादचा निजाम याच्याविरोधात झाली. मोगल साम्राज्याचा अस्त झाल्यावर त्याच राज्यातील एका मोठ्या सरदाराने दक्षिणेत एक स्वतंत्र राज्य स्थापन केले होते तोच सरदार म्हणजे निजाम. निजामाचे हे राज्य मराठेशाहीसाठी सारखे उपद्रवी ठरत होते.

मराठ्यांचा वाढत उत्कर्ष निजामास सहन होत नसे व वेळोवेळी काहीतरी निमित्त काढून मराठ्यांच्या मुलुखात उपद्रव देत असे. 

या काळात इंग्रज सुद्धा प्रबळ होते व निजामाने ब्रिटिशांची मदत घेतली होती. ब्रिटिशांच्या मदतीने आपण मराठ्यांचा पराभव करू असा विचार करून निजामाने मराठ्यांविरोधात युद्धाची तयारी सुरु केली. 

या काळात मराठ्यांच्या वतीने मुसद्दी नाना फडणवीस यांनी निजामास धडा शिकवण्याची तयारी सुरु केली आणि सर्व मराठे सरदारांना एकत्र आणले. याच काळात सेनानायक हरिपंत फडके यांचे निधन झाल्याने नानांनी परशुराम पटवर्धन यांना निजामावरील युद्धाचे सेनापती म्हणून नेमले.

मराठयांनी निजामाविरोधात तब्बल एक लाख तीस हजार एवढे सैन्य तयार करून निजामाच्या राज्याच्या दिशेने कूच केले. निजामही आपल्या सैन्यासह मराठ्यांच्या प्रदेशात यावयास निघाला आणि अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोटाजवळ येऊन त्याने आपल्या सैन्याचा तळ दिला. खर्डा येथे निजाम इंग्रजांच्या मदतीची वाट पाहत राहिला मात्र इंग्रजांची कुमक त्यास येऊन मिळालीच नाही.

१७९५ सालच्या मार्च महिन्यात मराठ्यांचे सैन्य खर्ड्यास येऊन पोहोचले आणि याच ठिकाणी निजाम आणि मराठे यांच्यात मोठे युद्ध झाले. हे युद्ध खर्ड्याचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. या युद्धात मराठ्यांनी मोठा पराक्रम गाजवून निजामाचा सपशेल पराभव केला.

स्वतःहून उकरून काढलेल्या युद्धात आपलीच मोठी फजिती झाल्याचे पाहून निजामाने मराठ्यांशी तहाची बोलणी सुरु केली. सर्वप्रथम मराठ्यांनी या लढाईच्या मागील मुख्य म्हणजे निजामाचा दिवाण मुशरुन मुल्क यास ताब्यात घेतले. या लढाईत झालेला मराठ्यांचा सर्व खर्च निजामाने मराठयांना दिला आणि यापूर्वीची सर्व बाकी सुद्धा मराठ्यांनी वसूल केली.

सर्वात महत्वाचे म्हणजे मराठे व निजाम यांच्या सरहद्दीवरील ३७ लाख रुपये उत्पन्नाचा मुलुख निजामाने मराठ्यांना देऊन दौलताबादचा अर्थात देवगिरीचा किल्ला सुद्धा मराठ्यांकडे आला.

खर्ड्याच्या युद्धाचे महत्व म्हणजे हे युद्ध मराठ्यांचे अखेरचे यशस्वी झालेले युद्ध मानले जाते आणि या युद्धात मराठ्यांच्या एकीचा प्रत्यय सर्वांना पाहावयास मिळाला.