सदाशिवराव पेशवे यांच्या तोतयाचे बंड
पानिपतच्या युद्धानंतर सुमारे १५ वर्षांनी, अचानक बातमी आली की सदाशिवराव भाऊ पेशवे जिवंत आहेत आणि ते पुण्याकडे येत आहेत. ही बातमी थेट शनिवारवाड्यावर पोहोचली. काहींना हे सत्य वाटले, काहींना शंका वाटली.
भारतीय इतिहासात पानिपतच्या युद्धाला अत्यंत वेगळे आणि हृदयद्रावक स्थान आहे. १४ जानेवारी १७६१ या दिवशी झालेले पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्याच्या दृष्टीने एक टोकाचा वळणबिंदू ठरले. मराठ्यांनी अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दाली विरोधात प्रचंड शौर्य दाखवले, परंतु विश्वासघात आणि नियोजनातील त्रुटींमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
या लढाईत सदाशिवराव भाऊ पेशवे आणि विश्वासराव हे दोघेही रणांगणावर हरवले आणि कधीच परतले नाहीत. या युद्धानंतर १५ वर्षांनी, मराठा साम्राज्यात एका तोतयाच्या रूपाने बंड उभे राहिले, ज्याने पुण्याच्या गादीलाच हादरवून टाकले.
पानिपतचे युद्ध आणि सदाशिवराव भाऊंचा अंत
१४ जानेवारी १७६१ – या दिवशी सदाशिवराव चिमाजी पेशवे उर्फ भाऊसाहेब हे अफगाण सैन्याशी लढा देत होते. युद्धाच्या मध्यात विश्वासराव यांचा अचानक मृत्यू झाल्याने भाऊसाहेब विचलित झाले. त्यांनी प्रतिज्ञा केली – “गिलच्या खाशासुद्धा ठार करीन तरच पुण्यास जाईन.” त्यांनी तलवार उचलली आणि रणांगणात शिरले – पण ते पुन्हा परतलेच नाहीत. भाऊसाहेब व विश्वासराव अंबारीत दिसेनासे झाले आणि मराठा फौजेचा धीर खचला. एका विजयाच्या जवळ असलेला लढा पराभवात बदलला.
१५ वर्षांनी परतलेले भाऊसाहेब?
पानिपतच्या युद्धानंतर सुमारे १५ वर्षांनी, अचानक बातमी आली की सदाशिवराव भाऊ पेशवे जिवंत आहेत आणि ते पुण्याकडे येत आहेत. ही बातमी थेट शनिवारवाड्यावर पोहोचली. काहींना हे सत्य वाटले, काहींना शंका वाटली.
पार्वतीबाई, भाऊसाहेबांची पत्नी, यांनी कधीही सौभाग्यचिन्हे उतरवली नव्हती, कारण त्यांना पतीच्या मृत्यूबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे ही बातमी त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या धक्कादायक होती.
त्यावेळी थोरले माधवराव पेशवे गादीवर होते. त्यांनी या कथित सदाशिवरावाची चौकशी केली. चौकशीअंती लक्षात आले की हा व्यक्ती खरा भाऊसाहेब नसून एक तोतया होता. त्याला रत्नागिरीच्या किल्ल्यात कैद करण्यात आले.
रामचंद्र नाईक परांजपे आणि बंडाचा प्रारंभ
रत्नागिरीचा मामलेदार रामचंद्रनाईक परांजपे, जो पेशव्यांचा आप्त आणि सावकार होता, याने या तोतयाचा वापर करण्याचे ठरवले. त्या काळात मराठा सैन्य गुजरात आणि कर्नाटक मोहिमांमध्ये गुंतलेले होते. या अस्थिरतेचा फायदा घेऊन त्याने तोतयाची सुटका केली आणि त्यास सदाशिवराव भाऊ म्हणून घोषित केले.
तोतया मुक्त झाल्यावर, त्याला मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठिंबा मिळू लागला. सैन्य, आरमार, आणि प्रांत त्याच्या नियंत्रणाखाली गेले. त्याने सुवर्णदुर्ग ते मुंबईपर्यंत मोठा प्रदेश ताब्यात घेतला.
शत्रूंचा पाठिंबा आणि पुण्यावर हल्ल्याचा कट
तोतयाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठ्यांचे पारंपरिक शत्रू हैदर अली आणि ब्रिटिश देखील त्याच्या बाजूने येऊ लागले. त्यांनी तोतयाला कुमक पुरवली. एक दिवस त्याने २० हजार फौज घेऊन बोरघाट चढून राजमाची किल्ला ताब्यात घेतला.
यातच तो पुण्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. एवढेच नव्हे तर सिंहगडावरील माणसे सुद्धा त्याच्या बाजूला येण्याची शक्यता निर्माण झाली. त्यावेळी पेशव्यांचे निकटवर्तीय – व्यंकटराव घोरपडे, रघुनाथ कोल्हटकर, नारोशंकर – यांनाही तो सदाशिवरावच आहे असे वाटू लागले.
पार्वतीबाई यांचा गोंधळ
सदाशिवराव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई यांनाही हा तोतया खरा पती आहे की काय, असा संशय आला. त्यांच्या नात्यातील अनुबाई घोरपडे ह्याही तोतयाला भाऊसाहेब मानू लागल्या. भावनिक गुंतवणूक आणि अपूर्ण शोक यामुळे पार्वतीबाई गोंधळल्या.
परंतु दुसरीकडे, अब्दालीकडून खंडणी देऊन भाऊंचे पार्थिव मागवण्यात आले होते, आणि हे माहिती पेशव्यांना आधीच सुजाउद्दौला याच्या वकिलामार्फत कळवले गेले होते. त्यामुळे पेशव्यांना खात्री होती की हा तोतया आहे.
बंडाचा बंदोबस्त
ही स्थिती आता गंभीर बनली होती. पेशव्यांनी भिवराव पानसे, तोफखान्याचे अधिकारी, यांना आदेश दिला. त्यांनी ५ हजार फौज आणि तोफखाना घेऊन तोतयावर हल्ला केला. या लढाईत तोतयाचे कंबरडे मोडले गेले, फौज पांगली.
शेवटी तोतया समुद्रमार्गे मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत होता. पण रघुजी आंग्रे यांनी त्याला समुद्रातच पकडले आणि पुण्यास पाठवले.
सत्य उघडकीस – तोतया म्हणजे सुखलाल
पुण्यात आणल्यानंतर तोतयाची सखोल चौकशी झाली. चौकशीदरम्यान त्याने उघड केले की,
"माझे खरे नाव सुखलाल आहे. छत्तीसगडजवळील छत्रपूर येथील कन्नोल गावचा मी रहिवासी आहे. माझे वडील महानंद, आई अन्नपूर्णा आणि आजी मन्मथा. मी कनौज ब्राह्मण आहे."
हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला.
शिक्षेचा अंतीम निर्णय – मृत्युदंड
सुखलालने सदाशिवराव भाऊ बनण्याचा बनाव केला, बंड उभारले, मुलुख ताब्यात घेतला, आणि पुण्यावर हल्ल्याचा कट रचला. त्यामुळे त्याला दिली गेली एकच शिक्षा – मृत्युदंड.
त्याला गाड्यावर बसवून शहरभर फिरवले गेले, लोकांना दाखवले, आणि शेवटी उंटावर बसवून 'मेेेेखसू'ने डोक्यात वार करून ठार मारले. मेखसू ही एक लाकडी, लोखंडी चाफरसारखी वस्तू असते जी युद्धात कठोर शिक्षा देण्यासाठी वापरली जात असे.
बंडातील सहकाऱ्यांचे पारिपत्य
तोतया सुखलालचा अंत झाल्यावर, नाना फडणवीस यांनी त्याला मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली. कारण जर एक तोतया सत्तेला आव्हान देऊ शकतो, तर खरे शत्रू किती धोकादायक ठरू शकतात, हे नानांच्या ध्यानात आले होते.
निष्कर्ष – इतिहासातून शिकण्याची गरज
सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या तोतयाचे बंड हे इतिहासातील अत्यंत अद्भुत आणि धोकादायक घटनांपैकी एक होते. एका सामान्य व्यक्तीने फक्त खोट्या ओळखीच्या आधारावर संपूर्ण साम्राज्याला हादरवून टाकले. यावरून हे लक्षात येते की सत्तेची गादी ही केवळ परंपरेने चालत नाही, तर जनतेच्या विश्वासाने टिकते.
ही घटना भावनांचा गैरफायदा, अस्थिरतेचा वापर, आणि सत्तेसाठीच्या राजकीय खेळांचा जिवंत नमुना आहे. हे बंड फक्त संपवले गेले नाही, तर मराठा साम्राज्याने यानंतर अशा बंडांची शक्यता रोखण्यासाठी धोरणात्मक बदल देखील केले.