चिखली - लोकमान्य टिळक यांचे मूळ गावं

टिळकांचे जन्मगाव चिखली गाव नसले तरी त्यांचे मूळ घराणे चिखली गावात होते. याची जाणीव फार वर्षांनी का होईना शासनाला झाल्याने चिखली गाव माणसात येत असल्याची जाणीव झाली. अनेकांचा समज असा आहे की, टिळकांचे जन्म ठिकाण चिखली गाव, परंतु प्रत्यक्षात टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला होता. त्यांचे वडील शिक्षक होते.

चिखली - लोकमान्य टिळक यांचे मूळ गावं
चिखली

चिखली गावाकडे मी दुसऱ्यांदा जात होतो. दहा वर्षापूर्वी गेलो तेव्हा या चिखली गाव एस.टी. थांबा पाटीच्या दक्षिणेस एक लाल मातीचा नागमोडी रस्ता त्यावेळी चिखली गावाकडे गेला होता. पायी चालत गेलो तर जेमतेम एक तास या गावाकडे जाण्यास लागतो. रस्त्यावरून थोडे खोलगट भागात जावून पुन्हा दुसऱ्या टप्प्यावर गेल्यावर टिळकवाडी नावाच्या एका वाडीत आपण प्रवेश करतो. चिखली गावाच्या परिसरात जी गावे येतात त्यामध्ये या टिळकवाडीचा समावेश आहे. कोकणातील इतर खेड्याप्रमाणे नारळ, आंबे आणि केळींच्या सान्निध्यात ही वाडी लपली होती. अलिकडेच म्हणजे दहा वर्षानंतर पुन्हा मी या चिखली गावाकडे गेलो तेव्हा लाल मातीचे रस्ते जावून तेथे डांबरीकरणाने जागा घेतली होती. गावाकडे जात असताना पूर्वी डावीकडे असलेले माळरान गवताने जाम भरलेले दिसायचे, या खेपेस मात्र या माळरानावर टिळक विद्यालय नावाचे एक सुंदर शैक्षणिक संकुल उभे राहिलेले दिसत होते. हे संकुल जेथे बांधले आहे ती जागाही टिळक घराण्याची. टिळकांनी शैक्षणिक संकुलासाठी ती जागा देणगी दिली आहे हे गावात गेल्यावर कळले. या लेखामध्ये चिखली गावाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे याच्याशी असलेले नाते आणि गावातील बदल यावर सविस्तर चर्चा केली आहे. इतिहासप्रेमी, स्वातंत्र्यसैनिकांचा अभ्यास करणारे आणि कोकणातील सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हा लेख माहितीपूर्ण ठरेल.

चिखली गाव आणि टिळकांचे मूळ

टिळकांचे जन्मगाव चिखली गाव नसले तरी त्यांचे मूळ घराणे चिखली गावात होते. याची जाणीव फार वर्षांनी का होईना शासनाला झाल्याने चिखली गाव माणसात येत असल्याची जाणीव झाली. अनेकांचा समज असा आहे की, टिळकांचे जन्म ठिकाण चिखली गाव, परंतु प्रत्यक्षात टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला होता. त्यांचे वडील शिक्षक होते. आपल्या बदलीच्या वास्तव्यात ते रत्नागिरीत असताना बाळ गंगाधर नावाच्या या सुपुत्राने रत्नागिरीच्या भूमीवर जन्म घेतला होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरी येथे झाला. चिखली हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे, जे टिळकांच्या पूर्वजांचे मूळ गाव आहे. टिळकवाडी या गावात शिरल्यावर डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली एक कौलारू घर दिसले, जवळच उभा असलेला एक ग्रामस्थ म्हणाला, तेच ते कौलारू घर लोकमान्य टिळकांचे... घराचा दरवाजा बंद होता, दरवाजावर टकटक केल्यावर एका वृद्ध माणसाने दरवाजा थोडासा किलकिला केला, मी विचारले टिळकांचे घर हेच का? माझ्या प्रश्न पुरा होत नाही तोच त्या माणसाने आतून दरवाजा आपटला आणि म्हणाला, कोण टिळक? टिळक पुण्याला राहतात आणि आता ते टेल्कोतून निवृत्त होऊन घरीच आहेत. पुण्याला जा... कपाळावर हात मारण्यापलिकडे माझ्याकडे उत्तर नव्हते. तहान लागली होती म्हणून याच गृहस्थांना पाणी द्या म्हणालो आणि दरवाजा पूर्णपणे न उघडताही दरवाजातून फक्त हात आणि तांब्याच बाहेर आला. गावात गेल्यावर कळलं की, टिळकांच्या पूर्वजांचे हे घर असल्याने (चौथी पिढी) हे घर शासन ताब्यात येईल या भितीने त्यांना तसं खोटे बोलावं लागतं, असे गावातील एकजण म्हणाला. याचवेळी दुसरा एक इसम माझ्याजवळ आला आणि त्या घरासमोरील रिकाम्या जोत्याकडे बोट दाखवित म्हणाला, टिळकांचे मूळ घर या जागेवर होते. मी त्या मोकळ्या जागेकडे पाहिले तेव्हा त्या रिकाम्या जोत्यावर टिळकांचा एक अर्धपुतळा होता, डोक्यावर छत्री, आजूबाजूला स्वच्छता नाही, कित्येक दिवस झाडलोट नाही, योगायोगाने टिळक जयंतीच्या दिवशीच मी चिखली गावात होतो. गावातील शाळेतील मुले पुतळा स्वच्छ करून झाडलोट करून टिळकांच्या पुतळ्याला हार घालीत होती आणि म्हणत, होती चिखलातून कमळ उमलावे तसे...

लोकमान्य टिळकांचे योगदान

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव ठाऊक नसलेला भारतीयच मिळणार नाही. पारतंत्र्याच्या काळात आपल्या प्रखर ध्येयवादाने भारतीय जनतेला त्यांनी जागृत केले होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या अध्यापकांनी लोकशिक्षणासाठी चालविलेली 'केसरी व मराठा' ही अनुक्रमे मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे. 'मराठा'चे संपादनकार्य करीत असतानाच टिळकांनी क्रियाशील राजकारणात भाग घेतला, आधी राजकीय स्वातंत्र्य देशाला मिळाले पाहिजे, मग सर्व त-हेच्या राजकीय सुधारणा आपोआपच होतील अशी श्रद्धा होती. 'लोकमान्य' ही त्यांना जनतेने दिलेली उत्स्फूर्त पदवी आहे. टिळक हे मुत्सद्दी तर होतेच पण असामान्य विचारवंतही होते. गीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन दि वेदाज या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथातून त्यांच्या विवेचक प्रज्ञेची व गाढ व्यासंगाची खात्री पटते. टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच' या ब्रिदवाक्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सारख्या सार्वजनिक उत्सवांना प्रोत्साहन देऊन सामाजिक एकता आणि राष्ट्रीय जागृतीला चालना दिली. त्यांच्या या कार्यामुळे ते जनतेत ‘लोकमान्य’ म्हणून ओळखले गेले.

चिखली आणि रत्नागिरी येथील स्मारक

रत्नागिरीमधील या जन्मठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे म्हणून १९४४ सालो लोकांनी सुमारे आठ हजार रुपयांचा निधी जमा करून टिळकांचा अर्धपुतळा उभारला. अर्थात चिखली गावामधील त्यांच्या उघड्या जोत्यावरील उभारलेला टिळकांचा अर्धपुतळा अलिकडचा, अर्थात १९४४ नंतर शासनाला जाग आल्याने तब्बल ५५ वर्षांनी रत्नागिरी येथील जन्मस्थळी शासनाने त्यांचा पूर्ण आकृतीचा पुतळा उभा केला. परंतु १ ऑगस्ट या त्यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने व मंत्री न मिळाल्याने या पुतळ्याचे अनावरण झालेच नाही, हे अनावरण शेवटी लोकांनीच केले, हे यातील विशेष. यातील दुसरे विशेष म्हणजे उद्घाटनासाठी मंत्र्यांची वाट पहात हा पुतळा कपड्याने बंदिस्त करण्यात आला होता. 'स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच' या आपल्या ब्रिदाचा त्यांनी निर्भय उच्चार केला व निर्भयतेमुळे त्यांना १९०८ साली मंडालेच्या तुरूंगात राजकीय बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. हे लक्षात घेतले तर ९१ वर्षानंतरही १९९९ साली उद्घाटनाला मंत्री मिळत नाहीत म्हणून टिळकांना त्यांच्याच घरासमोर कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत बंदिस्त व्हावे लागले, हा दोष नक्की कोणाचा? त्या पुतळ्याचा कि लोकमान्यांचा की नव्याने इंग्रज म्हणून निर्माण झालेल्या राज्यकर्त्यांचा? रत्नागिरी येथील त्यांचे जन्मस्थान आणि चिखली येथील त्यांचे मूळ गाव हे दोन्ही ठिकाणे आजही टिळकांच्या स्मृती जपतात.

चिखली गाव हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मूळ गाव असून, त्यांच्या पूर्वजांचे वास्तव्य येथील टिळकवाडीत होते. या लेखामध्ये चिखली गावाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व, टिळकांचे या गावाशी असलेले नाते, आणि त्यांच्या स्मारकांचा इतिहास यावर सविस्तर चर्चा केली आहे. चिखलीतील टिळक विद्यालय आणि टिळकांचा अर्धपुतळा यामुळे गावाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्त्व वाढले आहे. टिळकांनी स्वातंत्र्यलढा, शिक्षण आणि साहित्य यांद्वारे भारतीय समाजाला प्रेरणा दिली. रत्नागिरी येथील त्यांचे जन्मस्थान आणि चिखली येथील मूळ गाव यांना भेट देऊन इतिहासप्रेमींनी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे चाहत्यांनी टिळकांचा वारसा समजून घ्यावा. चिखलीतील टिळकवाडी आणि रत्नागिरीतील स्मारक हे टिळकांच्या अमर स्मृतींचे प्रतीक आहेत, आणि त्यांचे संरक्षण आणि जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.