अवचितगड, बिरवाडी, सुरगड व घोसाळगड - रोहे तालुक्यातील किल्ले
रोहे तालुक्यात अवचितगड, तळगड, बिरवाडी, सुरगड व घोसाळगड हे अतिशय ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे किल्ले आहेत. दुर्गभ्रमंतीची सवय असलेले अगदी दोन दिवस हाती असतील तर हे पाचही किल्ले पाहू शकतात.
रोहे तालुका, रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण, कोकणातील कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेले आहे. रोहे तालुक्यात अवचितगड, बिरवाडी, सुरगड व घोसाळगड हे अतिशय ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे किल्ले आहेत. दुर्गभ्रमंतीची सवय असलेले अगदी दोन दिवस हाती असतील तर हे किल्ले पाहू शकतात. हे किल्ले केवळ ऐतिहासिक वारसाचेच प्रतीक नाहीत, तर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील निसर्गसौंदर्य आणि ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहेत. चला, या किल्ल्यांचा इतिहास, वास्तुकला आणि पर्यटन वैशिष्ट्यांचा आढावा घेऊया.
अवचितगड
नागोठणे शहराच्या दक्षिणेस सहा किलोमीटरवर मोटार रस्त्याने व सरळ रेषेत पायवाटेने अनुक्रमे सहा किलोमीटर व चार किलोमीटर अंतरावर असलेला अवचितगड, रोहे व नागोठण्यामधील डोंगरांच्या टेकडीवर मेढा या गावानजिक आहे. याच गावावरून या किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. हा गड शिलाहारांनी बांधला असावा, असे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. कारण अहमदनगरच्या निजामशाहीत बाह्य अंगावरून हा किल्ला मोगलांनी बांधला असावा, असे मत नेर्न या लेखकाने व्यक्त केले आहे आणि याच ग्रंथांमध्ये शिवाजीराजांनी या गडाचे बांधकाम शेख महंमद नामक वास्तुविशारदाच्या मदतीने केले असा उल्लेख आहे, कारण मुरुड-जंजिऱ्याच्या सिद्दीवर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा अवचितगड बांधला असा दावा इतिहासकारांमध्ये केला जातो. १६४८ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला व १८१८ मध्ये कर्नल प्रार्थरने सरसगड व भोरपगडासह हा किल्ला काबीज केला.
बुरुज व इतर कामाबरोबर महाराजांनी या किल्ल्यावर श्रीशिवमंदिर बांधले. किल्ल्यात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ दोन बुरूज आहेत. एका बुरूजाची पडझड झाली आहे. गडाला तटबंदी असून त्याची लांबी ५४९ मीटर आहे. ती अनेक ठिकाणी ढासळलेली आहे. काही ठिकाणी कडे फुटल्याने वरचा भाग निमुळता व निसरडा झाला आहे. किल्ल्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना सरदारांच्या इमारतीच्या जोत्यांचे अवशेष हात येतात. याच किल्ल्यात १२ कोनी तलावात भरपूर पाणी आहे, तलावाच्या पश्चिमेस एक टाकी असून त्यातही भरपूर पाणी आहे. मेढ्यांचे एक वयोवृद्ध प्रतिष्ठित नागरिक आबा जोशी यांनी या किल्ल्यावरचे पाणी संपूर्ण मेढे गावाला भर उन्हाळ्यातही पुरेल असे यापूर्वीच सांगितले होते. याच पाण्याच्या टाक्यांजवळ गडाचा हवालदार बाजी पासलकराच्या स्मरणार्थ एक प्रतिमा कोरलेली आहे व तिच्या जवळच एक दीपमाळ आहे. पाण्याच्या टाक्यांच्या वरच्या बाजूला श्रीमहादेवाच्या लहानशा देवळात गणपती, पार्वती आणि विष्णूंच्या मूर्ती आहेत.
अवचितगडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत: पिंगळसई, मेढा आणि पडम. पिंगळसई मार्गे कुंडलिका नदीवरील पूल ओलांडून सुमारे ५ किलोमीटर चालल्यानंतर गडाच्या पायथ्याला पोहोचता येते. मेढा मार्गे विठोबा मंदिराच्या मागून वाट जाते, तर पडम मार्गे बंद पडलेल्या कागद कारखान्यापासून गडावर पोहोचण्यास दोन तास लागतात. गडावरील निसर्गसौंदर्य, विशेषतः पावसाळ्यात, ट्रेकर्ससाठी आकर्षक आहे.
घोसाळगड
घोसाळगड हा किल्ला रोहे शहरापासून ९.३ किलोमीटर अंतरावर आहे. याच्या उत्तरेस रेवदंडा खाडी, आग्नेयेस साळाव खाडी व दक्षिणेस भालगाव खाडी आहे. हा गड चढताना पहिला टप्पा ६१ मीटरचा आहे, तर दुसरी चढण १६१ मीटरची असून तिसरी उभी चढण ३१ मीटरची आहे. चौथा टप्पा डोंगराच्या माथ्यावर आहे. उत्तरेस गवळीवाडा गाव आहे. पूर्वी येथूनच गडावर दूध जात असे. त्यामुळे या गावाला गोशाळा म्हणत असत. परंतु या शब्दाचा अपभ्रंश होऊन घोसाळे हे नाव पुढे आले असावे. हल्ली हा गड घोसाळगड म्हणून ओळखला जातो, घोसाळे या गावातून या गडावर जाण्यासाठी वाट आहे. दक्षिण व पूर्वेकडूनही जाण्यास वाटा आहेत.
गडाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे असावा, परंतु पडझडीमुळे त्याचा ठावठिकाणा लागत नाही. गडावर उत्तर व दक्षिण बाजूने तटबंदी असून त्याचा आकार खेकड्यासारखा आहे. पश्चिमेस बुरूज असून तेथे गोळीबाराचे ठिकाण आहे. दक्षिणेस चोर दरवाजा असून त्याचा वापर खाजगी कामासाठी व पाहुण्यांसाठी केला जात असे, असे कुलाबा गॅझिटीअरवरून दिसून येते. याच ठिकाणी दगडात अंधारकोठडी होती. परंतु आज तेथे कोठडी नाही. फक्त एक कोरीव भिंत आहे. गडाच्या दक्षिण बाजूला दगडात कोरलेल्या पाण्याच्या तीन टाक्या आहेत. पुढे नैसर्गिक गुहा असून तेथेही पडझड झाली आहे. गुहेजवळ श्रीभवानी देवीच्या देवळाचे जोते आहे. शेजारीच एक पिंडी आहे, तर मंदिराच्या पुढील बाजूस दगडात कोरलेल्या दोन टाक्या असून त्यांना भवानी टाक्या म्हणतात. तेथील एका टाकीत सिमेंटच्या स्लॅबसारखे दगडाचे आवरण असून दोन्ही टाक्यांत पाणी आहे. दक्षिण बाजूच्या पूर्व टोकास तटबंदी असून तेथे फक्त एक तोफ आहे.
हा गड सोळाव्या शतकात निजामशहाच्या ताब्यात होता. सन १६२६ मध्ये आदिलशहाने त्याचा ताबा घेतला. परंतु १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा पाडाव करून हा गड ताब्यात घेतला. आदिलशहाचा सरदार अफझलखान याने १६५० मध्ये प्रतापगडावर स्वारी केली असताना सिद्दीने या घोसाळगडाला वेढा दिला. पुढे १६६५ च्या तहानुसार या गडाची मालकी शिवाजीराजांकडे आली. पहिल्या बाजीराव पेशवांनी १७३५ मध्ये हा किल्ला काबीज केला, आणि त्याच वर्षाच्या सिद्दी व मराठा यांच्या तहानुसार या गडाची मालकी मराठ्यांकडे आली. ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्यापूर्वी कर्नल प्रार्थरच्या एक तुकडीने १८१८ मध्ये या किल्ल्याचा पाडाव केला असा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव “वीरगड” ठेवले होते, ज्यामुळे त्याचे तत्कालीन महत्त्व अधोरेखित होते.
बिरवाडी किल्ला
बिरवाडी हा किल्ला रोह्यापासून अदमासे २० किलोमीटर अंतरावर आहे. या गडाच्या पायथ्याशी बिरवाडी हे कोकणातले सुंदर गाव आहे. रोह्यावरून रेवदंड्याकडे जात असताना चणेरा या गावावरून हा किल्ला दिसतो. या किल्ल्यावरील तटबंदी, बुरूज सर्व काही ढासळलेल्या अवस्थेत आहेत. किल्ल्यात पडक्या इमारतींचे अवशेष असून जवळच असलेल्या पाण्याच्या चार टाक्या गाळाने भरलेल्या आहेत. या किल्ल्याच्या पायथ्याशी एक कबर आहे. त्यावरून शेखाची बिरवाडी असे नाव या गावाला पडले असावे. गडाच्या मध्य आणि उतारावर श्रीभवानीमातेचे जुने मंदिर आहे. सिद्दीपासून या भागाचे रक्षण व्हावे यासाठी तळगड, घोसाळगड घेतल्यावर शिवाजी महाराजांनी हा गड बांधला.
इ.स. १६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यानंतर बिरवाडी किल्ला बांधला गेला. गावातून किल्ल्यावर जाताना वाटेत श्रीभवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत सुमारे १०० पायऱ्या आहेत. मंदिराच्या प्रांगणात एक तोफ आहे, आणि मागील बाजूस शिवाजी महाराजांचा ६ फुटी पुतळा आहे. गडावर सात बुरुज आणि पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे, जे बऱ्यापैकी शाबूत आहे.
सुरगड
सुरगड नागोठणे शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पूर्व वैजनाथ या गावाजवळ आहे. हा गड रस्त्यापासून दूर असल्याने अनेकांना या गडाचे अस्तित्व माहिती नाही. या गडावर जाण्यासाठी किल्ल्याच्या दक्षिण व उत्तरेकडून वाटा आहेत. वाटेवर काही ठिकाणी दगडी पायऱ्या आहेत. दोन डोंगरांच्या मधून घळीतून जाणारा हा मार्ग किल्ल्यावर जुन्या इमारतीचे अवशेष, बुरुज, तटबंदी, अंधारकोठडी हे सर्व काही कोसळलेल्या अवस्थेत आहे. सध्या रहदारी नसल्याने व हा किल्ला एका बाजूला असल्याने या किल्ल्याकडे विशेष दुर्लक्ष झाले आहे. किल्ल्यावर पाण्याच्या पाच टाक्या आहेत. किल्ल्याच्या आग्नेय बाजूकडील बुरूजाजवळ एक दगड पडला असून त्यावर अरबी व देवनागरी लिपीतील एक लेख आहे. त्यावरून हा शिलालेख पूर्वी बुरूजावरील भिंतीत बसविला असावा. या शिलालेखानुसार सिद्दी नबाबाच्या राजवटीत दुसऱ्या वर्षी हा किल्ला बांधला असावा असा निष्कर्ष इतिहासकारांनी काढला आहे. या किल्ल्याचा वास्तुशास्त्रज्ञ नुरयानी होता व गडाच्या हवालदारपदी तुकोजी हैबत होता. फेब्रुवारी १८१८ मध्ये कर्नल प्रार्थरने अवचितगडासह या किल्ल्याचा पाडाव केला.
रोहे तालुक्यातील इतर आकर्षणे
रोहे तालुका केवळ किल्ल्यांसाठीच नव्हे, तर निसर्गसौंदर्य आणि धार्मिक स्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. कुंडलिका नदी, रेवदंडा खाडी आणि ताम्हणी घाट येथील हिरवळ पर्यटकांना भुरळ घालते. वैजनाथ गावातील वैजनाथेश्वर मंदिर आणि खांब येथील खांबजाई देवीचे मंदिर धार्मिक पर्यटकांसाठी आकर्षक आहे. कुडा लेणी, ज्या तळा-मांदाड रस्त्यावर आहेत, बौद्धकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.
प्रवास टिप्स
रोहे तालुक्यातील किल्ल्यांना भेट देताना खालील टिप्स लक्षात ठेवा:
-
प्रवासाची सोय: मुंबईहून पेण-नागोठणे-रोहा मार्गे किंवा पुण्याहून माणगाव-कोलाड मार्गे रोह्याला पोहोचता येते. रोहा हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
-
राहण्याची सोय: रोहा आणि नागोठण्यात हॉटेल्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत. गडांवर राहण्याची सोय नाही, त्यामुळे जेवण आणि पाणी सोबत न्यावे.
-
सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च हा ट्रेकिंगसाठी उत्तम काळ आहे, कारण हवामान सौम्य आणि आल्हाददायक असते.
-
स्थानिक खाद्यपदार्थ: कोकणी सी-फूड, मालवणी मासे आणि स्थानिक व्यंजने यांचा आस्वाद घ्या.
-
सुरक्षितता: जंगलातील वाटांवर स्थानिक मार्गदर्शकांचा सल्ला घ्या आणि वाट चुकण्यापासून सावध रहा.
रोहे तालुक्यातील अवचितगड, घोसाळगड, बिरवाडी आणि सुरगड हे किल्ले कोकणातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य वारसाचे प्रतीक आहेत. शिवाजी महाराजांच्या रणनीतिक दूरदृष्टीने बांधलेले हे किल्ले इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी अविस्मरणीय अनुभव देतात. कुंडलिका नदीच्या खोऱ्यात वसलेला हा परिसर मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्याने विकेंड गेटवेसाठी आदर्श आहे. मग वाट कसली पाहता? सामान बांधा आणि रोहे तालुक्यातील या ऐतिहासिक किल्ल्यांच्या साहसी भटकंतीला सुरुवात करा!