चिरनेर - ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचे गाव

रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातले चिरनेर हे गाव अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, मग तो चिरनेरचा प्रसिद्ध जंगल सत्याग्रह असो, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महागणपतीचे मंदीर असो किंवा परिसरातली इतर प्राचिन मंदीरे असोत. मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा पुलावरुन उरणकडे जाण्यास जो फाटा फुटतो त्याच रस्त्यावर चिरनेर गाव लागते.

चिरनेर - ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचे गाव
चिरनेर जंगल सत्याग्रहाचे स्मारक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

चिरनेर गावात शिरताक्षणीच हे गाव फार प्राचिन असल्याचे जाणवल्याशिवाय रहात नाही याचे कारण या गावाचा विस्तार. चिरनेर हे नाव मुख्यतः चिर (झरा) व नेर (नगर) या शब्दांपासून तयार झाले असावे. हे गाव प्रामुख्याने विविध पाड्यांमध्ये विभागले गेले असुन प्राचिन काळातील नगररचना शास्त्राप्रमाणे या गावाची रचना करण्यात आली आहे. हे सर्व पाडे मूळपाडा, चिंचपाडा, मधीलपाडा, कातळपाडा, तेलीपाडा, रांजणपाडा,  कुंभारपाडा या नावांनी प्रसिद्ध आहेत या सात पाड्यांव्यतिरीक्त रानसई, चान्दायाले वाडी, चिरनेर वाडी (आक्कादेवी), भूरयाची वाडी, धाकटे भोम इत्यादी लहान गावांचा चिरनेर ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो.

चिरनेर गावाचे नाव जगभरात पोहोचले ते येथील प्रसिद्ध अशा जंगल सत्याग्रहामुळे, स्वतःच्या मुलभुत हक्कांसाठी येथील स्थानिकांनी केलेले जनआंदोलन हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीस प्रेरणादायी ठरले व आजही ठरत आहे. चिरनेर हे गाव चोहोबाजुंनी दाट जंगलाने वेढलेले आहे, नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न अशा या जंगलावर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून होत यात प्रामुख्याने रानभाज्या, रानमेवा, फळे-फुले, सुकि लाकडे, मध इत्यादिंचा समावेश होत असे. जंगलाचे महत्व येथील स्थानिक ओळखुन होते त्यामुळे जंगलाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान न करता येथिल नागरिक जंगलातल्या नैसर्गिक साधनसंपत्तिचा मर्यादित वापर करुन आपला उदारनिर्वाह करित होते. मात्र ब्रिटिश काळात त्यांच्यावर अनेक जाचक निर्बंध आणले गेले नागरिकांना जंगलाचा कुठल्याहि प्रकारे वापर करण्यावर बंदी आणली गेली. परकिय ब्रिटीश मात्र या जंगलांची बेसुमर लुट करु शकत असताना येथिल भुमिपुत्रांना येथे फिरकण्यास सुद्धा मनाई करण्यात आली हे येथील स्वाभिमानी भुमीपुत्रांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे ठरविले व अशा रितीने चिरनेर जंगल सत्याग्रहाचा लढा उभा राहीला.

सुरुवातीस अंहिसेच्या मार्गाने मार्गक्रमण करणार्‍या या स्थानिकांच्या लढ्याच्या दमनार्थ ब्रिटिशांनी गोळीबाराचे आदेश दिले मात्र येथील मामलेदार केशव महादेव जोशी यांनी हा आदेश स्विकारण्यास नकार दिल्याने संतापून ब्रिटिश अधिकार्‍याने यांच्यावरच गोळी चालवून या लढ्याच्या रक्तरंजित अध्यायास सुरुवात केली यानंतर हा लढा चिघळला व दि. २५-९-१९३० साली ब्रिटीशांनी अक्कादेवीच्या डोंगरावर भयंकर गोळीबार केला व या स्वातंत्र्य यज्ञात चिरनेर व परिसरातील हु. नाग्या महादु कातकरी (चिरनेर), हु. धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), हु. रघुनाथ मोरेश्वर न्हावी-शिंदे (कोप्रोली), हु. रामा बामा कोळी(मोठी जुई), हु. आनंदा माया पाटील (धाकटी जुई) , हु.परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हु. हसुराम बुधाजी घरत (खोपटे), हु.आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), हु.नारायण पांडू कदम (कॉन्स्टेबल), हु. हरी नारायण दवटे( हेड कॉन्स्टेबल), हु.जयराम बाबाजी सावंत(हेड कॉन्स्टेबल), हु. काशिनाथ जनार्दन शेवडे (राऊंड गाईड) या भुमिपुत्र शुरविरांच्या व काही भारतीय कर्मचार्‍यांच्या आहुत्या पडल्या. मात्र इतके होऊनही ब्रिटीशांचा जुलूम थांबला नाही गोळीबारानंतर काही स्थानिक आरोपी म्हणून पकडले गेले मात्र त्या काळी गावात पोलीस चौकी नव्हती म्हणून चिरनेरच्या महागणपतीच्या देवळात सर्वांना अमानुषपणे कोंडण्यात आले व देवळाच्या दगडी खांबांना त्यांना करकचून बांधून त्यांना मारहाण करण्यात आली मात्र एवढ्या यातना भोगुनही कुठलाच भुमीपुत्र या प्रकरणात माफीचा साक्षिदार झाला नाही. २५ सप्टेंबर २००५ साली या सत्याग्रहाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या आंदोलनाचे भव्य हुतात्मा स्मारक चिरनेर गावात उभारले गेले व दर वर्षी २५ सप्टेंबरला परिसरातले सर्व नागरिक एकत्र येऊन हुतात्मा दिवस साजरा करतात व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात.

चिरनेर येथिल प्रसिद्ध महागणपती अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चिरनेर गावाचे वैभव असलेले हे मंदीर बरेच ऐतिहासिक आहे. यादव साम्राज्याच्या पतनानंतर महाराष्ट्रावर जी परकिय आक्रमणे झाली त्याची झळ प्रामुख्याने तिर्थक्षेत्रांस बसली, अशा आक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मुर्त्या परिसरातल्या जलाशयात, विहीरीत अथवा जमिनीमध्ये लपवण्यात येत असत. चिरनेरचा महागणपती सुद्धा अशाच प्रकारे यादव काळानंतर बाजुच्या तळ्यात लपवण्यात आला होता. पेशवे काळात या भागाचे सुभेदार रामाजी महादेव फडके हे होते. पोर्तुगिजांच्या पराभवानंतर नानासाहेब पेशव्यांनी उरण परिसर घेतला. याच काळात सुभेदार रामजी फडके यांना महागणपतीने दृष्टांत दिला की मी तळ्यात आहे, मला बाहेर काढून माझी प्रतिष्ठापना करा यानंतर शोध घेतला असता ही मुर्ती याच तळ्यात सापडली व बाजुलाच एका मंदीरात महागणपतीची स्थापना त्यात करण्यात आली. महागणपती मिळाला म्हणुन तळ्याचे नावही देवाचे तळे असे पडले. गणपतीस महागणपती हे नाव मिळण्याचे कारण मुर्तीची भव्यता, अतिशय भव्य व सुरेख असलेली ही मुर्ती शेंदुररचित असून गणेशाची सोंड डाव्या बाजुस वळलेली आहे. हा महागणपती नवसास पावतो अशी या परिसरातल्या समस्त भाविकांची श्रद्धा आहे व दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत वाढच होत आहे. महागणपतीची मुर्ती दरवर्षी तिळातिळाने वाढते अशी अख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहे. माघी गणेशोत्सवास व गणेशचतुर्थीस येथे मोठा उत्सव साजरा होतो व या उत्सवास कानाकोपर्‍यातून भाविक येतात.

महागणपती व्यतिरिक्त गावात  एक शिवमंदीर, हनुमान मंदीर व भैरी मंदीर व इतर काही मंदीरे पहावयास मिळतात जी महागणपतीप्रमाणेच प्राचिन व ऐतिहासिक आहेत. महागणपती मंदीर व शिवमंदीर यांची बांधणी एकाच धाटणीची असल्याने ही मंदीरे समकालिन असावित. आता या दोनही मंदिरांचा जिर्णोद्धार झाला असला तरी दोनही मंदीरांचे गाभारे मुळ स्थितीतच आहेत व दोघांमध्येही विलक्षण साम्य असून हि बांधणी उत्तर शिलाहार अथवा यादवकालीन वाटते. या मंदीरांचे प्राचिनत्व सिद्ध करणारे पुरावे नुकतेच गधेगळींच्या स्वरुपात शिवमंदीराचा जिर्णोद्धार करीत असताना आढळले. येथे असणार्‍या दोन गधेगळीपैकी एक गधेगळ फार पुर्वीपासून येथे असून ती भैरीदेवाच्या मंदीरात पहावयास मिळते व दुसरी गधेगळ नुकतीच सापडली असून या गधेगळीवर शिलालेख कोरलेला आढळून आला आहे व सध्या या लेखावरील मजकुरावर संशोधन चालू आहे. गधेगळी व मंदीरांच्या बांधकामाच्या शैलींचा विचार केला असता या गधेगळी व मंदीरे ११व्या अथवा १२ व्या शतकात बांधण्यात आली असावीत असा कयास बांधता येतो व या गधेगळी कोरण्याचे प्रयोजन हे महागणपती तथा शिवमंदीराचे बांधकामासंबंधीतले असण्याची शक्यता आहे. गधेगळीवरील मजकुराचे वाचन झाले तर चिरनेरच्या ऐतिहासिक वैभवात आणखीनच भर पडेल व त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचाही अज्ञात इतिहास वेगळ्या रुपाने जगासमोर जाईल.

चिरनेर परिसरातील नागरिकांना आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतीक वारशाचा जाज्वल्य अभिमान आहे, आपल्या मुलभुत हक्कांसाठी ते किती जागरुक होते ते १९३० सालच्या जंगल सत्याग्रहाच्या निमित्ताने जगास माहित झाले आहेच मात्र या सर्व हुतात्म्यांचे कार्य पुढील पिढ्यांच्या लक्षात रहावे म्हणुन त्यांचे भव्य स्मारक उभारुन आजही दरवर्षी हुतात्मा दिन साजरा करण्याचेही ते विसरत नाहीत यातच त्यांचे वेगळेपण आहे. ज्या तेरा हुतात्म्यांनी व इतर नागरिकांनी जंगलासाठी आपले रक्त सांडून हक्कांसाठी लढण्याचा आदर्श सर्वांना घालून दिला त्यांचे भव्यदिव्य स्मारक पाहण्यासाठी, जागृत देवस्थान श्रीमहागणपतीच्या दर्शनासाठी व येथील पुरातन वारशासाठी चिरनेर गावाला एकदातरी भेट द्यावीच.