चंगेजखान - मोगलांच्या उत्कर्षास कारणीभूत शासक

चंगेजखानचा जन्म ११६३ साली मंगोलिया येथे झाला व हा देश त्याकाळी चीनच्या अमलाखाली होता.

चंगेजखान - मोगलांच्या उत्कर्षास कारणीभूत शासक
चंगेजखान

संपूर्ण जगातील मानवप्राण्याची वंशाच्या आधारावर विभागणी करण्यात आली आहे व हे वंश प्रामुख्याने भौगोलिक स्थानास गृहीत धरून निर्माण करण्यात आले आहेत. जगातील अशा अनेक वंशापैकी एक म्हणजे मंगोल वंश. मंगोल वंशास आपल्याकडे मोगल म्हणायची परंपरा आहे.

मोगल हे भारतात बाबराच्या काळापासून आले असले तरी बाबरची आई ही ज्या घराण्यातील होती त्या घराण्याचा आणि मोगलांचा इतिहास सुरु झाला तो चंगेजखान पासून. चंगेजखानापूर्वी मोगल वंशाचा प्रभाव जागतिक स्तरावर एवढा नव्हता मात्र चंगेजखानाने आपल्या आक्रमक धोरणाने जगाच्या इतिहासात मोगल वंशाचे नाव कोरले.

चंगेजखानचा जन्म ११६३ साली मंगोलिया येथे झाला व हा देश त्याकाळी चीनच्या अमलाखाली होता. चंगेजखानाचा वडील हा मोगलांचा सरदार असून सुरुवातीस तो चीनसाठी काम करीत असे. चंगेजखानाचे मूळ नाव तेमुजीन असे होते मात्र वयात आल्यावर म्हणजे १२०६ साली त्याने मोगलांचे एक वेगळे साम्राज्य तयार करण्याचा निश्चय केला आणि मोगलांची मोठी सभा भरवून स्वतः चंगेजखान असे नाव धारण केले.

मोगलांची एकजूट केल्यावर चंगेजखानाने सुरुवातीस तार्तार लोकांच्या टोळ्यांवर विजय प्राप्त केले आणि आपल्या फौजेस युद्धाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. फौज सज्ज झाल्यावर याने फक्त स्वदेशावर समाधान न मानता वेगाने वेगवेगळे देश आणि प्रांत जिंकण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता त्याने पूर्वसमुद्र, कॅस्पियन समुद्र आणि ओल्गा नदी त्यांच्या मधील मोठा प्रदेश ताब्यात आणला. 

यानंतर त्याने दक्षिणेकडील बुखारा, काबुल, कंदहार, सुरासान हे विभाग जिंकले आणि नंतर इराणवर कब्जा केला. चंगेजखानाची फौज एवढी होती की त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद चीनशिवाय कुठल्याही देशाची नव्हती. चीन हा देश तुल्यबळ असूनही चंगेजखानाने चीनवर देखील हल्ला करून चीनच्या उत्तर भागावर कब्जा केला आणि तो भाग आपल्या राज्यास जोडला.

कालांतराने चंगेजखानाने अफगाणिस्तानच्या सेल्जुक सुलतान महमंद वर हल्ला करून त्याच्या ताब्यातील अरबस्तान, तुर्कस्तान, इराण हे देश काबीज करून त्याचा पूर्ण पराभव केला.

पाहता पाहता साडेपाच हजार मैल लांब आणि तीन हजार मैल रुंद एवढा मोठा प्रदेश चंगेजखानाच्या ताब्यात आला. चंगेजखान हा पूर्णपणे नास्तिक आणि कुठल्याही धर्मास पाळणारा नसल्याने त्याने प्रत्येक युद्धात आक्रमक धोरण स्वीकारले आणि क्रूरतेची परिसीमा गाठली. धर्म आणि विद्या त्याच्यासाठी बिलकुल गौण असत.

१२२७ साली म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी चंगेजखानाचा मृत्यू झाला नाहीतर त्याची टोळधाड आणखी काही देशांवर पडण्याचा संभव होता कारण चंगेजखानाकडे एवढी मोठी आक्रमक फौज होती की जगभरातील लोक म्हणत की एकवेळ अग्नीचा प्रलय परवडला पण चंगेजखानाचा हल्ला नको.

चंगेजखानाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या चार मुलांना आपले राज्य वाटून दिले आणि त्याच्या वंशात काही काळाने जि मुलगी झाली तिचे लग्न तैमूरलंगाच्या वंशातील मुलासोबत होऊन दोघांना जो पुत्र झाला तो बाबर हा भारतातील मुघल राज्याचा संस्थापक होता.