कर्नाळा किल्ला व अभयारण्य
कर्नाळा किल्ल्याची उंची समुद्र सपाटी असून ४५० मीटर असून शिवरायांनी आपल्या उत्तर कोकण मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात आणला होता.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेले व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ज्याला खेटूनच गेला आहे असे महाराष्ट्रातले एकमेव पक्षी अभयारण्य तसेच कर्नाळा किल्ला सर्वांच्याच परिचयाचे आहेत. या परिसरामध्ये येत असताना अगदी ३० कि.मी. च्या परिघातून या किल्ल्याचा सुळका आपला अंगठा दाखवून पर्यटकांना व पर्यावरणप्रेमींना खुणावत असतो.
कर्नाळा किल्ल्याची उंची समुद्र सपाटी असून ४५० मीटर असून शिवरायांनी आपल्या उत्तर कोकण मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात आणला होता.
गडाची चढण उत्तरेकडून असून अदमासे ४०० मीटर उंचावर आल्यावर गडदेवता कर्णाई देवीचे मंदिर लागते व येथून गडाचा मुख्य भाग सुरू होतो. कर्णाई देवीच्या मंदिराच्या पुढे एक दरवाजा पार करावा लागतो.
येथून काही अंतरावर एक उंच व खोदीव पायऱ्या असलेल्या खडकावर चढून आपण गडाच्या दुसर्या दरवाज्यात पोहचतो. सुरक्षिततेसाठी येथे लोखंडी रेलिंग बांधण्यात आल्या आहेत.
दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर कर्नाळा किल्ल्याचा सर्वोच्च असा सुळका आणि त्याच्या पोटात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात.
कर्नाळाच्या सुळक्यावर पायऱ्या नसल्याने कातळारोहण करूनच वर जाता येते.
माथ्यावर असलेला ह ५० मिटर उंचीचा सुळका प्रथमदर्शनीच छातीत धडकी भरवितो. परंतू हा सुळका गिर्यारोहकांचा लाडका आहे. पश्चिमेस कलत्या असलेल्या या सुळक्यावर मधमाशांचे पोळे आहेत परंतू सामान्य पर्यटकाला त्यावर चढता येणे कठीण आहे. सुळक्याच्या माथ्यावर भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसून येतो.
गडावर पाण्याच्या अनेक खांब टाक्या असून या टाक्यांतील पाणी अतिशय चविष्ट असते.
गडाच्या दक्षिण बाजूस सुद्धा उत्तम असे बांधकाम करण्यात आले असून किल्ल्यावरील विभक्त अशा उंच भागांना तटबंदी करून संरक्षित करण्यात आले आहे.
किल्ल्यावरून मुंबई, घारापुरी बेट, माणिकगड, सह्याद्री रांगेतील नागफणी, राजमाची व माथेरान आदी दूरवरील प्रदेश आणि किल्ले दृष्टीक्षेपात येतात.
दक्षिण दिशेकडून वर किल्ल्यावर जाताना लागणाऱ्या दरवाज्यात शरभशिल्पे दिसून येतात.
पूर्वी कर्नाळा किल्ल्यावर फारसी व मराठी भाषेतील दोन शिलालेख होते. यातल्या फारसी शिलालेखात ‘सय्यद नुरुद्दीन मुहम्मदखान, हिजरी ११४७’ असे लिहिले होते तर मराठी शिलालेखात ‘शके १५९२ संवस्तर आषाढ शु.१४ कर्नाळा घेतला’ असे लिहिले होते मात्र सध्या हे शिलालेख कुठे आहेत त्याची माहिती मिळत नाही.
गडावरील धान्य कोठारे सुद्धा प्रशस्त असून गडावरील शिबंदीचे व्यवस्थेचा अंदाज ही कोठारे पाहून येतो.
गडावर पुर्वी देवगिरीचे यादव राज्य करित असत. सन १५४० मध्ये कर्नाळा किल्ला अहमदनगरच्या ताब्यात गेला, नंतर गुजरात सुलतानने पोर्तुगिजांची मदत घेऊन कर्नाळा किल्ला ताब्यात घेतला, कालांतराने शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराज्यात आणला.
कर्नाळा किल्ला परिसरात दाट जंगल असून येथे विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात म्हणुन शासनाने येथे २ ऑक्टोबर १९६९ साली ४.५० चौ.कि.मी. क्षेत्रात कर्नाळा पक्षी अभयारण्य निर्माण केले.
या अभयारण्यात १५० जातींचे विविध पक्षी आढळतात.तसेच ४० जातींचे विविध पक्षी स्थालांतर करुन विविध हंगामात येथे येतात. निरिक्षण केल्यास आपल्याला खंड्या, पंचरंगी पोपट, हिरवा तांबट, मोर, कालशिर्ष कांचन, ससाणा इत्यादी तसेच इतर अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडू शकते.
येथे पक्षांसाठी पक्षीघरे असून दुर्मिळ पक्षी या ठिकाणी पहावयास मिळतात.