देवगिरी उर्फ दौलताबाद - यादवकालीन महाराष्ट्राची राजधानी

देवगिरी दुर्गाची निर्मिती ही राष्ट्रकूट काळात झाली व यादव राजा भिल्लम याने देवगिरीस आपल्या राजधानीचा दर्जा दिल्याने साहजिकच महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठमोळ्या यादव साम्राज्याची राजधानी म्हणून तिला महाराष्ट्राच्या मुख्य राजधानीचा मान सुद्धा प्राप्त झाला आणि किल्ल्याचे वैभवात आणखी भर पडली.

देवगिरी उर्फ दौलताबाद - यादवकालीन महाराष्ट्राची राजधानी
देवगिरी उर्फ दौलताबाद - यादवकालीन महाराष्ट्राची राजधानी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी उर्फ दौलताबाद हा किल्ला मध्ययुगीन दुर्ग स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

देवगिरी किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला एक भव्य अशी तटबंदी पार करावी लागते.

तटबंदीतून आत आल्यावर आपल्याला काळाच्या ओघात हरवलेल्या एका संपन्न अशा नगरीच्या पाऊलखुणा दिसू लागतात.

किल्ल्याच्या दरवाज्यास असलेली आणखी एक भव्य अशी तटबंदी आपले लक्ष वेधून घेते आणि येथून यादवकालीन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या देवगिरी दुर्गाचे दर्शन होते.

किल्ल्याच्या महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर आतील अद्भुत असे स्थापत्य पाहून चकित व्हायला होते.

देवगिरी हा किल्ला पराक्रमाने जिंकणे अवघड आहे असे पूर्वी म्हटले जात असे व त्याची प्रचिती किल्ल्याची संरक्षण व्यवस्था पाहून येते.

देवगिरी किल्ल्याच्या रक्षणासाठी शत्रूवर जवळून व अगदी काही मैल अंतरावरून आग ओकणाऱ्या असंख्य तोफा येथे पाहावयास मिळतात व या तोफांची रचना सुद्धा अत्यंत अद्भुत आहे.

किल्ल्याच्या अंतर्गत दरवाजाच्या दोन्ही बाजूंस यादवकालीन शिल्पकलेचे उत्तम उदाहरण असलेली देखणी हत्तीशिल्पे पाहावयास मिळतात याशिवाय दरवाजावर काही शरभशिल्पे सुद्धा दिसून येतात.

दरवाज्याच्या आत पहारेकरांच्या चौक्या दिसून येतात.

देवगिरी दुर्गाची निर्मिती ही राष्ट्रकूट काळात झाली व यादव राजा भिल्लम याने देवगिरीस आपल्या राजधानीचा दर्जा दिल्याने साहजिकच महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठमोळ्या यादव साम्राज्याची राजधानी म्हणून तिला महाराष्ट्राच्या मुख्य राजधानीचा मान सुद्धा प्राप्त झाला आणि किल्ल्याचे वैभवात आणखी भर पडली.

शेकडो वर्षे देवगिरी हा किल्ला महाराष्ट्राच्या राजधानीचे स्थळ राहिल्याने या ठिकाणी वेगवेगळ्या काळात अनेक बांधकामे करण्यात आली.

देवगिरी हा किल्ला डोंगरी दुर्ग आणि भुईकोट या दोघांचे मिश्रण असून एका वैभवशाली नगरीस साजेसे असे त्याचे रूप आहे.

देवगिरी हा किल्ला ज्या ठिकाणी स्थित आहे त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण फार कमी असल्याने किल्ल्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी किल्ल्यात अनेक तलावांची निर्मिती करण्यात आली व त्यापैकी एक तलाव म्हणजे प्रसिद्ध हत्ती तलाव.

येथून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आपला प्रवेश होतो व या मार्गाच्या दुतर्फा अनेक इमारती दिसून येतात. या इमारतींचा वापर पूर्वी विविध कारणांसाठी केला जात असावा.

देवगिरी किल्लयावरील भारतमाता मंदिर प्रख्यात आहे. भारतमाता मंदिर ज्या ठिकाणी आहे ते मूळ मंदिर यादवकालीन आहे मात्र काही वर्षांपूर्वी स्थानिकांनी या ठिकाणी भारतमातेच्या मूर्तीची स्वयंस्फूर्तीने स्थापना केली व तेव्हापासून या मंदिरास भारतमाता मंदिर या नावाने ओळखलं जाते.

भारतमाता मंदिराकडे जाताना वाटेत लंगूर प्रजातीची अनेक वानरे पाहावयास मिळतात. 

एका भव्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर मंदिराचे भव्य असे प्रांगण दिसून येते.

मंदिराच्या प्रांगणात यादवकालीन स्तंभ दिसून येतात. या ठिकाणाची रचना पाहता पूर्वी या ठिकाणी खूप भव्य असे मंदिर असावे हे लक्षात येते.

मंदिराचा गाभारा सुद्धा मोठा असून गाभाऱ्यात भारतमातेची लोभसवाणी मूर्ती दिसून येते.

समस्त भारतामध्ये भारतमातेचे हे एकमेव अथवा पहिलेच मंदिर असावे.

भारतमाता मंदिराचे दर्शन घेऊन पुढे आल्यावर आपल्याला किल्ल्याच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध प्रकारच्या तोफा दिसून येतात.

या तोफा पाहून आपल्याला किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेची कल्पना येते. या तोफा पोलादी अथवा पंचधातूच्या बनवल्या गेल्या होत्या.

उंटावरून अथवा हत्तीवरून वापरता येणाऱ्या कमी वजनाच्या तोफा सुद्धा येथे पाहावयास मिळतात. 

एके ठिकाणी किल्ल्याच्या टेहळणी बुरुज असून त्यास चांदमिनार या नावाने ओळखले जाते.

चांदमिनार या टेहळणी बुरुजाची बांधणी उत्तरकालीन असावी.

या ठिकाणाहून किल्ल्याच्या चौफेर नजर ठेवणे शक्य होत असे व शत्रू जवळ आल्यास किल्ल्यातील लोकांना सावध करणे शक्य होत असे.

पुढे गेल्यावर एक छोटा कालवा दिसून येतो. हा कालवा पार केल्यावर आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो.

कौटिलीय अर्थशास्त्रातील दुर्गरक्षण व्यवस्था कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगिरी किल्ल्याची अंतर्गत रचना आहे.

पुढे गेलयावर चकवा देणाऱ्या अनेक छुप्या वाटा दिसून येतात. शत्रूला ही व्यवस्था फोडून आत प्रवेश करणे ही त्याकाळी अशक्यप्राय गोष्ट असे.

देवगिरीच्या अंतर्गत भागात राजधानीतील अत्यंत महत्वाच्या इमारती असून खुद्द राजाचा निवास येथे असल्याने हे स्थान अत्यंत मजबुत करण्यात आले होत

यादव साम्राज्याच्या अस्तानंतर देवगिरी किल्ल्यावर खिलजी, तुघलक, बहामनी, निजामशहा, मोगल आदी मुस्लिम सत्तानी राज्य केल्याने किल्ल्यावर इस्लामी पद्धतीच्या वास्तू सुद्धा दिसून येतात. मुस्लिम काळात या किल्ल्यास दौलताबाद या नावाने ओळखले जात असे.

देवगिरी किल्ल्याच्या राजवाड्यासमोर एक अप्रतिम अशी तोफ आहे व ही तोफ मेंढा तोफ या नावाने प्रसिद्ध आहे.

मेंढा तोफेची लांबी तब्बल तेवीस फूट असून ही तोफ चौफेर फिरवता येत असे. या तोफेवर एक लेख आहे ज्यामध्ये किला शिकन असे वाक्य आहे व या वाक्याचा अर्थ किल्ला उध्वस्त करणारी तोफ असा होतो.

येथून पुढे डोंगर चारही बाजूनी खोदून निर्माण केलेला अभेद्य असा खंदक दिसून येतो. कौटिलीय अर्थशास्त्रात या प्रकारच्या खंदकाचे वर्णन आहे.

शत्रूने अथक प्रयत्न करून किल्ल्याचं आत प्रवेश केला असता या खंदकात पाणी सोडून शत्रूचा मार्ग बंद केला जात असे व या खंदकात हिंस्त्र अशा मगरी सुसरी सुद्धा सोडल्या जात.

सध्या या खंदकावर दोन पूल दिसून येतात व यातील एक पूल आत्ता बांधण्यात आला आहे.

येथून पुढे लागणारी वाट एवढी निमुळती आहे की एका वेळी फार कमी माणसे येथून आत प्रवेश करू शकतील.

येथून लागतो देवगिरी किल्ल्याचा चकवा देणारा मार्ग व हा मार्ग भुलभुल्लैया अथवा अंधारी मार्ग या नावाने ओळखला जातो.

या अंधारी मार्गात काही फसवे मार्ग सुद्धा तयार केले आहेत व हे मार्ग शत्रूला थेट अंधकारात घेऊन जातात. 

शत्रू एकदा का या अंधारी भागात शिरला की आधीच गोंधळात सापडलेल्या शत्रूवर उकळते तेल, दगड, बाण आदींचा वर्षाव करून त्याचा नाश करण्यात येत असे.

अंधारी ओलांडली की डाव्या हाताला एक सुंदर गणेश मंदिर असून या मंदिरात गणेशाची देखणी मूर्ती आहे.

माथ्यावर एक अष्टकोनी इमारत असून या इमारतीस बारदारी या नावाने ओळखले जात असे. या ठिकाणी गडाचा सुभेदार राहत असे. 

या इमारतीस घुमटाकृती छत असून जाळीच्या खिडक्या आणि अष्टकोनी खोल्या आहेत व या ठिकाणावरून किल्ल्याचे आजूबाजूचा खूप मोठा आसमंत दृष्टीस पडतो आणि गडाच्या पायथ्याशी असलेले दौलताबाद शहर सुद्धा दिसते.

पुढे गेल्यावर बिजली या नावाचा एक दरवाजा लागतो व हा दरवाजा पार केल्यावर आणखी एक बुरुज दिसून येतो.

पुढे काही अंतरावर खडकात खोदलेल्या लेणी व टाके दिसून येतात. 

किल्लयावर एका ठिकाणी जनार्दन स्वामींच्या पादुका असून काळा पहाड नावाची एक तोफ पाहावयास मिळते.

किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर एक बुरुज असून येथे दुर्गा नावाची एक भलीमोठी तोफ आहे. या तोफेस धूळधाण या नावाने सुद्धा ओळखले जाते.

या बुरुजावरून किल्ल्याचा संपूर्ण घेरा दिसून येतो.

महाराष्ट्राची यादवकालीन राजधानी असलेला देवगिरी हा किल्ला एकदातरी पाहायलाच हवा.