महाड - नररत्नांची ऐतिहासिक भुमी
साक्षात शिवाजी महाराजांचे वास्तव्य या परिसरात असल्याने महाड शहराचे ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे, तरी शिवकाळापूर्वी सुद्धा महाड हे महत्त्वाचे ऐतिहासिक केंद्र राहिले असले पाहिजे.
महाराष्ट्राला भूगोलाबरोबरच इतिहास देखील आहे, असे आजही अभिमानाने म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात तर इतिहास व भूगोल खचून भरला आहे. अशा या रायगड जिल्ह्यातले एक सुप्रसिद्ध स्थळ म्हणजे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्याचे महाड शहर. सावित्री नदीच्या तीरावर वसलेले हे शहर प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहापर्यंत, महाडचा इतिहास अनेक नररत्नांनी आणि ऐतिहासिक घटनांनी समृद्ध आहे. या लेखात आपण महाड शहराचा इतिहास, भूगोल, सांस्कृतिक वैभव आणि पर्यटन स्थळांचा सविस्तर आढावा घेऊ.
महाडचा प्राचीन इतिहास
साक्षात शिवाजी महाराजांचे वास्तव्य या परिसरात असल्याने महाड शहराचे ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे, तरी शिवकाळापूर्वी सुद्धा महाड हे महत्त्वाचे ऐतिहासिक केंद्र राहिले असले पाहिजे. कारण १५३८ साली महाडला भेट देणारा पोर्तुगीज डी कास्ट्रो असें लिहितो की, महाड व्यापारी वस्तीचें गाव असून येथे गव्हाची फार मोठी घडामोड होते. तसेच १७७१ साली जॉन फोर्बस याने महाड चांगल्या तटबंदीचें व भरवस्तीचें शहर असल्याची नोंद केली आहे.
महाड हे शहर रायगड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नदीच्या म्हणजे सावित्रीच्या तीरावर वसले आहे. या सावित्री नदीस गांधारी, घोड, काळ व नागेश्वरी अशा एकूण चार उपनद्या आहेत. सावित्री नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावून महाडमार्गे बाणकोट खाडीस मिळते. सावित्री नदीच्या या परिसराचे महत्त्व फार प्राचीन असून तिचा उल्लेख पुराणांत सुद्धा आला आहे. स्कंदपुराणातल्या कथेनुसार सावित्री ही ब्रह्मदेवाची पत्नी. एक दिवस ब्रह्माने ब्रह्मारण्यात यज्ञाचे आयोजन केले, मात्र सावित्री आभूषणे परिधान करण्यात गुंग राहिल्याने यज्ञास उशीर होऊन पाहुण्यांची गैरसोय नको म्हणून ब्रह्माने शंकर, विष्णू इत्यादी देवतांची अनुमती घेऊन आपली उपपत्नी गायत्री हिच्यासोबत दीक्षा घेतली. मात्र, एवढ्यात सावित्रीचे तिथे आगमन होऊन समोरचे दृश्य पाहिल्याने तिचा संताप अनावर झाला व तिने सरसकट सर्वांना, “तुम्ही जलमय होऊन स्त्रीरूपाने प्रसिद्ध व्हाल व गायत्री नदी होऊन सर्व लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतील,” असा शाप दिला. मात्र, संतापलेल्या विष्णूने सावित्रीसही शाप देऊन जलप्राय केले, त्यामुळे त्राग्याने सावित्रीने सह्याद्रीच्या कड्यावरून उडी टाकून समुद्रास मिळण्याचा मार्ग पत्करला. तिला परत आणण्यासाठी ब्रह्मदेव तिच्या मागोमाग गेले, मात्र ती परत आली नाही. आजही सावित्री नदीच्या तीरावर उगमापासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत बारा शिवलिंगे आहेत, ते पाहता या परिसराच्या प्राचीनत्वाची प्रचिती येते.
महाड परिसराच्या प्राचीनत्वाचा दुसरा पुरावा म्हणजे शहरापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेली गांधारपाले लेणी. फार प्राचीन काळापासून बाणकोटच्या खाडीचा परिसर हा देश व परदेशांतर्गत दळणवळणाचा प्रमुख मार्ग असल्याने व्यापाराच्या या प्रमुख मार्गावर इसवी सनाच्या पहिल्या शतकात कोरल्या गेल्या. या लेण्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या तीन ब्राह्मी शिलालेखांवरून कुमार कंबोज विष्णूपुलीत, वेदश्री व संघरक्षीत अशी तीन नावे मिळतात. काहींच्या मते या लेण्याची निर्मिती करणारा कंबोज विष्णूपुलीत हा याच परिसरात राज्य करत होता, मात्र या लेण्यांची निर्मिती सातवाहन काळातच झाली असून, त्यांच्याच काळात सध्याच्या अफगाणिस्तानातील गांधार, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, क्रिगीझस्तान इत्यादी प्रदेशावर राज्य करणाऱ्या कंबोज या राजवंशाच्या व्यापारी उद्देशाकरिता मिळालेल्या देणग्यांतून या लेण्यांची निर्मिती झाली असावी. कारण या लेण्यांचे गांधारपाले (गांधार-पल्ली) हे नाव पाहता कंबोज हे राजघराणे त्याकाळी अफगाणिस्तानातील गांधार येथेच राज्य करीत होते, त्यामुळे ही शक्यता अजून दृढावते.
महाड शहराचे नाव आणि व्यापारी महत्त्व
या लेण्यांची निर्मिती कोणीही केली असली, तरी या लेण्यांच्या निर्मितीचा काळ पाहता महाडचा इतिहास किती प्राचीन आहे, हे लक्षात येते. महाड या शहराच्या मूळ नावातही इतिहास दडलेला आहे. महाड हे महा व हाट या दोन शब्दांचे रूप आहे. महा म्हणजे मोठा व हाट म्हणजे बाजार, त्याअर्थी बाणकोट खाडीवरील मोठी बाजारपेठ म्हणून महाड हे नाव या गावास मिळाले असावे. कालांतराने महाहाट या शब्दाचा अपभ्रंश होऊन महाड हा शब्द तयार झाला असावा, कारण असे अपभ्रंश मध्ययुगात प्रामुख्याने झाले, जसे कर्हाड पूर्वी करहाट या नावाने व वर्हाड पूर्वी वरहाट या नावाने प्रसिद्ध होते.
प्राचीन काळी महाड हे स्थानिक बाजारपेठेचे ठिकाण असले, तरी या ठिकाणी लोकवस्ती तुरळक असावी, कारण भौगोलिक दृष्ट्या महाड शहर सावित्री नदीच्या तटास लागून असल्याने पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रमाण त्याही काळी असावे. त्यामुळे कदाचित त्याकाळी मुख्य लोकवस्ती आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या गावांत असून व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या सोयीकरिता हे सर्व व्यापारी वर्षातला ठरावीक काळ हा मोठा बाजार भरवत असण्याची शक्यता आहे. कारण मध्ययुगपूर्व प्राचीन साधनांमध्ये महाडचा थेट उल्लेख अजूनपर्यंत मिळाला नसला, तरी प्राचीन काळातली एक मोठी बाजारपेठ म्हणून महाड निःसंशय प्रसिद्ध होती.
शिवकाळ आणि महाड
महाडचे व्यापारी महत्त्व प्राचीन काळापासून कायम असले, तरी राजकीय महत्त्व निजामशाही काळापासून मिळाले असले पाहिजे. याच काळापासून येथे लोकवस्ती वाढू लागली असावी, कारण सध्याचा जो महाडचा कोट आहे, तो आदिलशाही काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. पूर्वी निजामशहा व नंतर आदिलशहा यांचा मांडलिक असलेल्या जंजिर्याच्या सिद्दीच्या ताब्यात महाडचा त्याकाळी कारभार असून, महाडच्या उत्तरेस मुल्ला अहमदच्या अखत्यारीत असलेला कल्याण सुभा सुरू होत असे.
१६५६ साली जावळीकर मोर्यांचा पाडाव करून महाराजांनी महाड स्वराज्यात आणले व खऱ्या अर्थाने या भागाच्या उत्कर्षाचा पाया रचला. महाडपासूनच काही अंतरावर असलेल्या रायगड किल्ला ही शिवरायांनी राजधानीचे ठिकाण केल्याने महाड परिसर मराठी साम्राज्याचा केंद्रबिंदू बनला व महाडचे वैभव हळूहळू वाढू लागले. महाड शहराचे सध्याचे जे रूप आहे, ते अर्थात शिवकालीन आहे. येथील पुरातन विरेश्वर मंदिर व इतर मंदिरे, इथल्या वस्त्या, चवदार, वीरेश्वर व हापूस (हबशी) ही तीन तळी तसेच इथली नगररचना ही मुख्यत्वे करून शिवकाळातच रचली गेली असावी. एका अर्थी किल्ले रायगड मुख्य राजधानीचे कार्य पार पाडत असताना दुय्यम राजधानीचे ठिकाण हे महाड होते. शिवाजी महाराजांनी निवासाकरिता महाडास एक वाडा बांधला होता, या अगोदरही समुद्रस्नानाची आवड असल्याने बाणकोट खाडीवर महाडात त्यांनी एक वाडा खास समुद्रस्नानासाठी बांधला होता.
महाड: नररत्नांची भूमी
महाड हे ऐतिहासिक स्थळ आहेच, मात्र अनेक नररत्नांची भूमी म्हणूनही महाड परिसर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी एकतर या नररत्नांनी जन्म घेतला अथवा इतर नररत्नांची ही कर्मभूमी ठरली. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज, संभाजी महाराज, समर्थ रामदास, कवींद्र परमानंद, मुरारबाजी देशपांडे, दादाजी देशपांडे, क्रांतीसूर्य नानासाहेब पुरोहित, काळकर्ते शि.म.परांजपे, त्र्यंबक कारखानीस, हुतात्मा कमलाकर दांडेकर, हु. वसंत दाते, हु. अर्जुन कानू भोई आणि हु. नथू दौलत टेकावला, सुरबनाना टिपणीस अशा अनेक नररत्नांची महाड ही जन्मभूमी व कर्मभूमी आहे. नाना फडणीसांचे महाडचे प्रख्यात राजकीय कारस्थानही प्रसिद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच १९ व २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला, ज्याने सामाजिक समतेचा एक नवा पायंडा पाडला.
महाडचे धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव
महाडचे श्रद्धास्थान ग्रामदैवत विरेश्वर महाराज यांचा छबीना उत्सव हा येथील पंचक्रोशीतल्या तमाम नागरिकांचे प्रमुख आकर्षण आहे. हा उत्सव पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक महाडला भेट देतात. याशिवाय दुर्गराज रायगड, पाचाड येथील जिजाबाईंची समाधी, दासबोधाचे जन्मस्थान शिवतरघळ, गांधारपाले लेणी, सव येथील गरम पाण्याचे झरे, ऐतिहासिक चवदार तळे ही महाड शहरातील व परिसरातील प्रमुख प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. प्राचीनता व आधुनिकता यांचा संगम असलेले महाड शहर व परिसर पाहिल्यावर या परिसरास नररत्नांची भूमी असे का म्हटले जाते, याची खऱ्या अर्थाने प्रचिती येते.
प्रमुख पर्यटन स्थळे
-
विरेश्वर मंदिर: महाडचे ग्रामदैवत असलेले हे मंदिर शिवकाळीन आहे. येथील छबीना उत्सव विशेष प्रसिद्ध आहे.
-
चवदार तळे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये येथे सत्याग्रह केला, जो सामाजिक समतेचा ऐतिहासिक टप्पा ठरला.
-
गांधारपाले लेणी: इसवी सनाच्या पहिल्या शतकातील बौद्ध लेणी, ज्या व्यापारी मार्गावर कोरल्या गेल्या.
-
रायगड किल्ला: महाडपासून जवळ असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होता.
-
शिवतरघळ: समर्थ रामदास स्वामींनी येथे दासबोध लिहिला.
-
सव गरम पाण्याचे झरे: निसर्गरम्य ठिकाण आणि आरोग्यदायी स्नानासाठी प्रसिद्ध.
महाडला कसे पोहोचाल?
महाड हे मुंबई-गोवा महामार्ग (NH-66) वर आहे, जे मुंबईपासून सुमारे १७० किमी आणि पुण्यापासून १२० किमी अंतरावर आहे. रोहा आणि विन्हेरे ही जवळची रेल्वे स्थानके आहेत (सुमारे ३०-४० किमी). महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बस आणि खासगी वाहने येथे उपलब्ध आहेत. विमानाने येण्यासाठी मुंबई आणि पुणे ही जवळची विमानतळे आहेत. महाडमध्ये राहण्यासाठी हॉटेल्स, लॉज आणि होमस्टे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत साधारण १,००० ते ५,००० रुपये आहे.
महाडमधील उत्सव आणि खाद्यसंस्कृती
महाडमध्ये महाशिवरात्री, मकर संक्रांती, आणि विरेश्वर छबीना उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. येथील कोकणी खाद्यसंस्कृती, जसे की कोंबडी वडे, सोलकढी, मासे करी, आणि आमसूल पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. स्थानिक बाजारपेठेत हापूस आंबे आणि कोकणी मसाले खरेदी करता येतात.
FAQ
1. महाड शहर कोठे आहे?
महाड हे रायगड जिल्ह्यातील तालुके असून, सावित्री नदीच्या तीरावर, मुंबई-गोवा महामार्गावर आहे.
2. चवदार तळे सत्याग्रहाचे महत्त्व काय आहे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये चवदार तळ्यावर सत्याग्रह करून सामाजिक समतेचा पायंडा पाडला.
3. गांधारपाले लेणी कोणत्या काळात कोरल्या गेल्या?
गांधारपाले लेणी इसवी सनाच्या पहिल्या शतकात सातवाहन काळात कोरल्या गेल्या.
4. महाडमधील प्रमुख पर्यटन स्थळे कोणती?
विरेश्वर मंदिर, चवदार तळे, गांधारपाले लेणी, रायगड किल्ला, शिवतरघळ आणि सव येथील गरम पाण्याचे झरे.
5. महाडला पोहोचण्यासाठी कोणती वाहतूक सुविधा उपलब्ध आहे?
महाडला रस्त्याने (MSRTC बस), रेल्वेने (रोहा, विन्हेरे) आणि विमानाने (मुंबई, पुणे) पोहोचता येते.