मलिक अहमद निजामशाह - अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक

मलिक अहमद याचे आजोबा हिंदू असल्याने त्याने स्वतःच्या नावात बहिरी असे त्यांचे नाव लावले आणि पुढे ही परंपरा कायम राहिली.

मलिक अहमद निजामशाह - अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक
मलिक अहमद निजामशाह

बहामनी राज्याच्या पतनानंतर त्या राज्याची पाच शकले उडून दक्षिण भारतात ज्या पाच शाह्या उदयास आल्या त्यापैकी एक प्रमुख राजवट म्हणजे निजामशाही.

निजामशाही ही महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन राजवट असून तिच्या राजधानीचे स्थळ अहमदनगर हे असल्याने या राज्यास अहमदनगरची निजामशाही म्हणून सुद्धा ओळखले जाते.

इसवी सन १४८९ ते इसवी सन १६३६ अशी एकूण १४७ वर्षे निजामशाही महाराष्ट्रातील एका मोठ्या भागावर अमल करून होती व या राज्याचा संस्थापक अहमद निजामशाह बहिरी हा होता.

निजामशाही राज्य हे मुस्लिम राज्य असले तरी या राज्याचा संस्थापक अहमद निजामशाह हा पूर्वी हिंदू असून ब्राह्मण कुळातील होता.

अहमद निजामशहाच्या अजोबाचे नावं बहिरंभट असे असून तो गोदावरी नदीच्या उत्तरेकडील वऱ्हाड प्रांतातील पाथरी या शहराचा देशपांडे होता.

बहामनी राज्य काळात पडलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळात बहिरंभट आपल्या तिमाजी या पुत्रास घेऊन विजयनगर येथे गेला असता बहामनी सुलतानाच्या शिपायांनी विजयनगरच्या स्वारीत तिमाजी यास कैद केले आणि त्याचे धर्मांतर केले आणि त्यास मलिकनायन हे नाव दिले.

तिमाजी उर्फ मलिकनायन याने पुढे बहामनी राज्यात चाकरी सुरू केली आणि आपल्या कर्तबगारीवर आणि बहामनी राज्याचा कारभारी खान जहान याच्या शिफारशीवरून सुलतान महमद याने त्याची निजाम या मोठ्या पदावर बढती केली.

निजामउल्मुल्क यास मलिक अहमद नामक एक पुत्र होता व त्याने पुत्राची नेमणूक आपल्या पदावर करून स्वतः दरबारात राहिला आणि कट कारस्थान करून ज्याने त्यास वर आणले अशा खानजहान याचाच खून घडवून आणला आणि राज्याचा कारभारी झाला.

कारभारी पद पाहत असताना निजाम उल मुल्क याने स्वतःचा मोठा फायदा करत बीड आणि काही जिल्हे आपल्या जहागिरीत घेतले आणि मलिक अहमद याची दौलताबाद सुभ्यावर स्थापना केली.

पुढे बहामनी सुलतानाच्या सांगण्यावरून निजाम उल् मुल्क याची हत्या झाल्यावर मलिक अहमद याने बंड करून स्वतःस स्वतंत्र घोषित केले आणि निजामशाह ही पदवी स्वतःस लावून घेतली व निजामशाही या राज्याची स्थापना केली.

मलिक अहमद याचे आजोबा हिंदू असल्याने त्याने स्वतःच्या नावात बहिरी असे त्यांचे नाव लावले आणि पुढे ही परंपरा कायम राहिली.

 याच्या कारकीर्दीत याने कोंढाणा, लोहगड, शिवनेरी आणि कोकणातील जंजिरा आणि इतर अनेक किल्ले, चंदन वंदन आदी असंख्य किल्ले ताब्यात घेतले होते.

बहामनी सुलतानाने जेव्हा अहमद निजामशहावर स्वारी केली त्यावेळी निजामशाहने बहामनी सुलतानाचाच दारुण पराभव करून दौलताबाद आणि जुन्नर यांच्या मध्यभागी अहमदनगर नावाचे नावे शहर निर्माण केले आणि त्यास राजधानीचे स्थळ बनवले.

१५०८ साली अहमद निजामशाह बहिरी याचा मृत्यू झाला. निजामशाही राज्याचा संस्थापक आणि एक उत्तम शासक म्हणून अहमद निजामशाह प्रसिद्ध आहे.