चौल व रेवदंडा - दोन प्राचीन शहरे

चौल व रेवदंडा ही दोन प्राचीन महत्व असलेली गावे अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून १६ किमी अंतरावर आहेत. सुमारे अडीच हजार वर्षाची प्राचीन परंपरा या गावांना  लाभली आहे.

चौल व रेवदंडा - दोन प्राचीन शहरे
चौल व रेवदंडा

चौल व रेवदंडा ही दोन प्राचीन व्यापारी महत्व असलेली गावे अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून १६ किमी अंतरावर आहेत. सुमारे अडीच हजार वर्षाची उज्वल परंपरा या गावांना  लाभली आहे. या दोन्ही गावांचा प्राचीन इतिहास इतका मनोरंजक आहे की तो सांगण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. आज जरी चौल आणि रेवदंडा ही स्वतंत्र गावे असली तरी फार पूर्वी ही दोन्ही गांवे एकच होती व अनेक नावांनी ती ओळखली जात होती. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, इटालियन. पार्शियन, चीनी इत्यादी परकिय प्रवाश्यांनी या शहरांचे तत्कालीन वर्णन आपल्या प्रवासवृत्तांत केले आहे.

ज्ञात इतिहासावरुन इ. स. १३ वे शतक पासून १७८६ पर्यंत चौल व रेवदंडा हे सतत ऐतिहासिक घटनांचे केंद्र आणि आतंरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख बंदर होते. चौल व रेवदंडा या शहरांचे प्राचिनत्व इ.स. पूर्व १२०० पर्यंत नेता येते. त्याकाळी चौलला चंपावती आणि रेवदंड्यास रेवती क्षेत्र म्हणत असावेत. चंपावती हे नाव एखाद्या झाडावरुन, चंपा नावाच्या जाळ्यापासून किंवा चंपा नावाच्या राजापासून पडले असा निष्कर्ष काढण्यात येतो. श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याची पत्नी रेवती या नावावरुन रेवदंडा असं नाव पडले असावं असं तज्ज्ञांचं मत आहे.

आज वाचतांना तुम्हाला नवल वाटेल पण त्याकाळी या शहरांत सोळा लक्ष इमारती, ३६० मंदिरं, ३६० तळी होती आणि ते १६ पाखाड्यात विभागलं गेलं होतं. अनेक प्रकारचे कारागीर व कलावंत चौल येथे वास्तव्यास होते. सुतीच्या झाडापासून रेशीम काढण्याचा व्यवसाय व त्यापासून पितांबर तयार करणे, रेशमी कापड बनविणे वगैरे व्यवसाय चालत. त्याकरिता कच्चा माल चीन देशातून मागवित. धनधान्याची विपुलता असलेले चंपावती नगर (चौल) व रेवतीक्षेत्र (रेवदंडा) ' श्रीमंत व्यापारी नगरे' म्हणून ओळखली जात होते. मध्ययुगात या शहरानं अनेक राजवटी पाहिल्या. शिलाहार, यादव, विजयनगर, बहामनी, निजामशाह, पोर्तुगीज, आदिलशहा, मराठे, इंग्रज आदींच्या ताब्यात हे जुळे शहर होते. १६५७-५८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल जिंकले असावे. ७ सप्टेंबर १७४० मध्ये इंग्रजांनी मराठ्यांसोबत तह करुन चौल रेवदंडा ही दोन्ही स्थळं मराठ्यांकडं दिली.

रशियन प्रवासी अफनासी निकीतीन याने चौल व रेवदंड्यास भेट दिली होती. निकितीनने आपल्या प्रवासवर्णनात चौलचा उल्लेख 'चिवील' असा केला आहे. रेवदंडा येथे आता निकितीन याचे स्मारक उभारण्यात आलं आहे. फ्रेंच प्रवासी फ्रैंकॉईस पायरार्ड इटालियन प्रवासी पेटो डेलावेल्ल यांनीही चौल, रेवदंड्यास भेटी दिल्या होत्या. सर्वच परदेशी प्रवाशांनी रेवदंडा, चौलचे एक वैभवशाली नगर आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेले, संरक्षणदृष्ट्या मजबूत, व्यापारी केंद्र अशा शब्दांत उल्लेख केला आहे.

त्याकाळच्या व्यापारासंबंधीत काही महत्वपूर्ण माहिती अशी सापडते की, दोनशे वर्षांपूर्वीचा १ खंडी भाताचा भाव ८ रु. ते १२ रु. होता. साधारण दिडशे वर्षापूर्वी नागवेलींची पाने १ आण्यास हजार पाने व्यापारी खरेदी करत. रेशीम उद्योगावर रेशमीकर आकारला जाई. स्थानिक समाज ताडीमाडीचा व्यवसाय करीत. क्वचित प्रसंगी मोहाची दारू काढीत व त्यावर मोहतरफा नावाचा कर भरीत असत. मिठाचा व्यवसाय भरभराटीस होता त्यावेळी एक गोण मीठ १ रु. मिळत असे. मत्स्यव्यवसाय नेहमी फायद्यात चालत होता. मासळीसंबंधी गंमतीदार नोंद वाचनात येते ती अशी की, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सरखेल संभाजी आंग्रे यांनी सातारच्या शाहूमहाराजांना भेट म्हणून काही वस्तुंसोबत मासे सुद्धा पाठविले होते. साधारण २५०  वर्षांपूर्वी फक्त  १ रु. मध्ये शंभर नारळाची गोण मिळत असे. तर सुपारीचा भाव मणास ३ रुपये होता. दोन आणे म्हणजे पूर्वीची चवली. १ चवलीस एक कोंबडे मिळत होते. रुपया सव्वा रुपयाला १ बोकड किंवा बकरी मिळत होती.

चौल व रेवदंड्यामध्ये चालणाऱ्या त्याकाळच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पाहू, नाण्यांची नावे पुढीलप्रमाणे होती. सजगनी, (ढबू) शिवराई , चौलच्या सुभ्यांतील नाण्याला चौली लारी म्हणत. तसेच लारी हे चांदीचे नाणे १ रु. म्हणजे ५ लारी. तसेच अशर्फी बुजरुकी, आंग्र्यांनी ' अलिबाघी' रुपया हे नाणे सुरू केले. नागाव येथे नाणी पाडण्याची टाकसाळ होती व टांकसाळीच्या प्रमुखाला पोतदार म्हणत असत. त्याशिवाय सपिका, दमडी हीसुद्धा नाणी प्रचारात होती. १८५६ साली ही सर्व नाणी प्रचारातून बंद होवून इंग्रजी रुपया प्रचारांत आला.

अशा प्रकारे राजकीयदृष्ट्या महत्व असलेल्या चौल-रेवदंड्यास धार्मिकदृष्ट्याही तेवढंच महत्व होतं. या परिसरात आजही अनेक मंदिरं उभी आहेत व ही मंदिरे आजही चौल व रेवदंड्याचे प्राचीन महत्व सांगत आजही उभी आहेत. अशाप्रकारे एके काळी वैभवाच्या शिखरावर असणारी रेवदंडा व चौल ही नगरे काळाच्या ओघांत हळूहळू आपले वैभव हरवून बसली . शिलाहार, यादव, बहामनी, निजाम शहा, आदिलशहा, पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज इत्यादी सत्तांतरे पाहिलेल्या या दोन प्राचीन बंदरवजा शहरांचे व्यापारी महत्व ब्रिटिशकाळात मुंबईचे महत्व वाढून हळूहळू कमी होत गेले मात्र आजही आपले प्राचीन रूप सांभाळून ठेवलेली चौल व रेवदंडा ही दोन गावे प्राचीन काळातील नगरांची आजही पाहता येणारी संग्रहालयेच आहेत.