ज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी
इतिहासाचा समृद्ध वारसा आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेला रेवदंड्याचा परिसर महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वास्तव्याने आणि कार्याने पावन झाला आहे.

इतिहासाचा समृद्ध वारसा आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेला रेवदंड्याचा परिसर महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वास्तव्याने आणि कार्याने पावन झाला आहे. नानासाहेबांनी रेवदंड्यातूनच केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला बंधुत्वाची शिकवण दिली. श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधातील शिकवण अंगिकारुन त्यांचे बोधामृत जनतेला पाजण्याचे महान कार्य नानासाहेबांनी केले. अंधश्रद्धा, अज्ञान आणि व्यसनाधिनतेत जखडून गेलेल्यांना त्यातून मुक्त करण्याचे समाजकार्य त्यांनी केले. यासाठी त्यांनी परमार्थिक निरुपणाचा आधार घेतला.
आपल्या ओघवत्या, रसाळ, प्रासादिक वाणीने, परमार्थिक विचारांनी, आचरणाने त्यांनी साक्षात्कार घडवून सन्मार्गाची शिकवण दिली. समाजातील रंजल्या-गांजल्या व्यक्तींना जवळ करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य त्यांनी केले. बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून लहान मुलांना रुचेल, पटेल, समजेल अशा भाषेत संत परंपरेची शाश्वत शिकवण त्यांनी मुलांना दिली. नवी पिढी संस्कारक्षम झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह आणि प्रयत्न होता. नम्रता, सद्सद्विवेकबुद्धी, सत्याची चाड, देवावर निष्ठा, सत्कर्मावर श्रद्धा, सहिष्णुता, परदुःख जाणून घेण्याची पात्रता, दुसऱ्यांचा आदर करण्याची वृत्ती असे सगळे चांगले गुण प्रत्येकाच्या ठायी रुजावेत यासाठी नानासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. सुदैवाने त्यास चांगले फळही लाभले.
लाखो दुःखी, पीडित, उपेक्षितांनी नानांच्या शिकवणीच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करुन घेतला आहे. देशाचा उद्धार करायचा असेल तर समाजाचा उद्धार करायला हवा आणि समाजाचा उद्धार करायचा असेल तर प्रत्येक घरांचा आणि घरातील प्रत्येकांचा उद्धार करायला हवा असे नानासाहेबांचे धोरण होते. याच भूमिकेतून त्यांनी समाज उद्धाराचे कार्य केले.
नानासाहेब धर्माधिकारी यांचं मूळ आडनाव शांडिल्य असे होते. त्यांच्या सातव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य प्रवचनकार म्हणून विख्यात होते. प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी उत्तम समाजकार्य केल्याने राजे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी रेवदंडा नगरीत जाऊन गोविंदपंतांना 'धर्माधिकारी' ही पदवी देऊन सन्मानित केले. तेव्हापासून शांडिल्य घराणे धर्माधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा ख्यातकीर्द घराण्यात विष्णपंत अनंत धर्माधिकारी यांच्या पोटी १ मार्च १९२२ रोजी नानासाहेबांचा जन्म झाला वडील ख्यातनाम प्रवचनकार तर होतेच त्याचबरोबर ते व्याकरण, वेदांत आणि ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक होते. नानासाहेबांनी हाच वारसा पुढे चालवत समाजक्रांती घडवन आणली. या क्रांतीचा पाया त्यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी म्हणजे १९४५ मध्ये रचला.
रेवदंडा येथे त्यांनी 'श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समिती' स्थापन करुन आपल्या कार्याला सुरुवात केली. कार्यारंभाच्या वेळेस फक्त सात समर्थ सेवक होते. पुढे समितीतर्फे दासबोध निरुपणाच्या बैठका गावोगावी सुरु केल्या. आज त्यांचे हे कार्य सातसमुद्रापार गेले आहे. समर्थ सदस्यांची संख्या किती हे सांगणे कठीण आहे. बैठकांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे जीवन प्रकाशमय केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना समाज आणि शासनाने विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. रायगड जि.प.चा रायगडभूषण (१९९३) ते महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण (२००८) या पुरस्कारांच्या दरम्यान त्यांना पंधरा-सोळा पुरस्कार मिळाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी.लीट. ही सन्माननीय पदवी प्रदान करुन नानासाहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे अद्याप वितरण व्हायचे होते. तत्पूर्वीच नानासाहेबांचे देहावसान झाले. मंगळवार दिनांक ८ जुलै २००८ रोजी नानासाहेबांची प्राणज्योत मालवली आणि महाराष्ट्र एका आध्यात्मिक गुरुला आणि थोर समाजसेवकाला मुकला. रायगडचे सुपुत्र नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य समाजाला निश्चितपणे दिशा दाखविण्याचे काम करीत राहील यात शंका नाही.
- एस. एम. देशमुख