तेरवण ते तिलारी – सिंधुदुर्गातील स्वर्गसदृश पर्यटन यात्रा
तिलारी प्रकल्प हा केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर गोवा राज्यासाठीसुद्धा एक महत्वाचा जलप्रकल्प आहे. गोवा आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये संयुक्त विद्यमाने साकारलेले हे धरण कोकणातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे. याचा मुबलक पाणीसाठा, भव्यता, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला परिसर, आणि या धरणाच्या बुडीत क्षेत्रात वास्तव्य करणारे रानटी हत्ती यामुळे हे ठिकाण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या निसर्गसंपन्नतेसाठी ओळखला जातो. समुद्रकिनारे, गड-किल्ले, पारंपरिक संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि आता नवनवीन पर्यटनस्थळे हळूहळू पर्यटकांच्या नकाशावर झळकू लागली आहेत. अशाच काही स्थळांमध्ये वेगाने प्रसिद्धी मिळवणारी दोन ठिकाणे म्हणजे तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा आणि तिलारी धरण. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यात वसलेली ही ठिकाणं आज केवळ स्थानिकांच्याच नव्हे तर गोवा व इतर राज्यांतील पर्यटकांचाही आकर्षणबिंदू ठरू लागली आहेत.
तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा – निसर्गाचा खजिना
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण-मेढे परिसरात असलेला उन्नेयी बंधारा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक खजिनाच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण शांततेचा अनुभव, शुद्ध हवामान, पारंपरिक गावांचा गंध आणि मनमोहक दृश्यं देतं. याठिकाणी मुबलक पाणीसाठा, सभोवतालच्या डोंगररांगा, हिरवळ, खेळण्याचं उद्यान आणि महाराष्ट्रातील सर्वात छोटा (२ मेगावॅट) जलविद्युत प्रकल्प पर्यटकांना एक अद्वितीय अनुभव देतो.
एकदा येणारा पर्यटक येथील सौंदर्याने मोहून जातोच आणि पुन्हा इथे यायला उत्सुक राहतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर या पर्यटनस्थळावर १०,००० पेक्षा अधिक पर्यटकांची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागात पर्यटनवाढीबरोबरच स्थानिक रहिवाशांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे.
तिलारी धरण – जलसंपन्नतेचे प्रतीक
तिलारी प्रकल्प हा केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर गोवा राज्यासाठीसुद्धा एक महत्वाचा जलप्रकल्प आहे. गोवा आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये संयुक्त विद्यमाने साकारलेले हे धरण कोकणातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे. याचा मुबलक पाणीसाठा, भव्यता, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला परिसर, आणि या धरणाच्या बुडीत क्षेत्रात वास्तव्य करणारे रानटी हत्ती यामुळे हे ठिकाण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहे.
धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी सासोलीमार्गे गोव्यात वितरित केलं जातं आणि गाळेल-डिंगणे येथून ते बांदामार्गे महाराष्ट्रात परत आणलं जातं. सुमारे २९ कि.मी लांबीच्या या कालव्याच्या माध्यमातून पाणी ओटवणे परिसरात पोहचतं, आणि तिथून ते तेरेखोल नदीत मिसळवले जाते. या पाण्यामुळे परिसरात बागायती शेतीला चालना मिळाली असून कृषी उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
कालव्याच्या सौंदर्याने उठून दिसलेलं ओटवणे
ओटवणे हा परिसर निसर्गसंपन्न असून, कालवा त्यातून वाहत असल्यामुळे हे ठिकाण अधिकच मनोहारी दिसतं. कालव्याच्या दुतर्फा डोंगरदऱ्या, हिरवीगार झाडं, गावं आणि निसर्गातील शांतता हे सगळं मिळून हा भाग आता पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येतो आहे. या कालव्यावर तेरेखोल व दाभिल नदीवर उभारण्यात आलेले दोन जलसेतू पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहेत. जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेले हे पूल या भागाच्या सौंदर्यात भर घालतात.
वाढणाऱ्या पर्यटकांमुळे तालुक्याच्या पर्यटनाची नांदी
तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा आणि तिलारी धरण याठिकाणी केवळ पर्यटकच नाहीत तर शालेय सहली, वनभोज, स्थानिक सण-उत्सव यांचा सुद्धा वर्दळ असतो. विशेष म्हणजे गोवा राज्यातून येणारे देशी आणि विदेशी पर्यटक सुद्धा या भागाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटनवाढीसाठी ही एक सकारात्मक सुरुवात मानली जात आहे.
हत्तींचे वास्तव्य – एक वेगळं वैशिष्ट्य
तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रात रानटी हत्तींचं वास्तव्य असल्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि वन्यप्राणी निरीक्षकांसाठीही विशेष ठरतं. काही वेळा हत्तींचे थवे या परिसरात फिरताना दिसतात, ज्यामुळे वन्यजीवांची छायाचित्रण, अभ्यास आणि मार्गदर्शनासाठी अनेक पर्यटक येतात. ही बाब प्रादेशिक पर्यटनाच्या पुढच्या टप्प्याकडे झेप घेणारी आहे.
तिलारी आणि तेरवण परिसरातील इतर पर्यटनस्थळे
दोडामार्ग तालुका फक्त तिलारी आणि तेरवणपुरता मर्यादित नाही. इथे खालील ठिकाणीदेखील पर्यटकांना खुणावत आहेत:
-
कसईनाथ डोंगर – स्थानिकांचे श्रद्धास्थान.
-
नागनाथ तीर्थक्षेत्र (तेरवण-मेढे) – धार्मिक पर्यटनस्थळ.
-
शिरवल धरण – निसर्गरम्य धरण परिसर.
-
तळकटची वनबाग – जैवविविधतेचं केंद्र.
-
सासोली धबधबा – निसर्गनिर्मित, मोहीमयोग्य ठिकाण.
-
भूरूपे-विवरे (सासोली सड्यावर) – नव्याने शोधलेली नैसर्गिक रचना.
-
बोकारावाडी डोंगर (उसप) – पॅराग्लायडिंगसाठी उपयुक्त.
-
मांगेली, फुकेरी हनुमंतगड, आणि पारगड किल्ला – इतिहासप्रेमींसाठी सुवर्णसंधी.
या ठिकाणांचे महत्त्व हेच दर्शवतं की दोडामार्ग तालुक्यातील पर्यटन केवळ स्थिर नसून, सतत विस्तार पावत आहे.
निसर्ग, पाणी आणि पर्यटन यांचे त्रिवेणी संगम
तेरवण ते तिलारी ही केवळ भौगोलिक यात्रा नाही, तर ही एक निसर्ग-संवेदनशील, पर्यावरणपूरक आणि ग्रामविकासात्मक पर्यटनयात्रा आहे. या दोन्ही ठिकाणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा दिली आहे. स्थानिकांना रोजगार, पर्यटकांना निसर्ग आणि राज्यांना जलप्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिक भर यामुळे तिलारी प्रकल्प आणि तेरवण-मेढे बंधारा हे यशस्वी पर्यटन मॉडेल ठरत आहेत.