नरवीर तानाजी मालुसरे यांची एक अपरिचित लढाई

तानाजींच्या अनेक लढायांपैकी अशीच एक अपरिचित लढाई म्हणजे संगमेश्वर येथील सूर्यराव सुर्वे यांच्याविरोधातील लढाई. १६६१ मध्ये शिवरायांनी दक्षिण कोकण जिंकण्याची मोहीम सुरु केली. दंडा राजपुरी ते खारेपाटण शिवरायांना या मोहिमेत प्रचंड यश मिळाले. १६६१ मध्ये निजामपूर आणि पुढे दाभोळ जिंकण्यात आले.

नरवीर तानाजी मालुसरे यांची एक अपरिचित लढाई
नरवीर तानाजी मालुसरे यांची एक अपरिचित लढाई

नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सहकारी आणि स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे योगदान देणारे शूरवीर योद्धा होते. त्यांचे नाव ऐकताच डोळ्यासमोर येतो तो त्यांचा सिंहगडावरील पराक्रम, तसेच "आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे" ही प्रतिज्ञा आणि त्यांच्या मृत्यूनंतर शिवरायांचे "एक गड आला पण एक गड गेला" हे भावुक उद्गार. या लेखामध्ये आपण तानाजी मालुसरे यांच्या एका अपरिचित लढाईचा, म्हणजेच संगमेश्वर येथील सूर्यराव सुर्वे यांच्याविरोधातील लढाईचा सविस्तर आढावा घेऊ.

तानाजी मालुसरे आणि स्वराज्य

नरवीर तानाजी मालुसरे यांचे नाव ऐकले की डोळ्यासमोर येतो तो त्यांचा सिंहगडावरील पराक्रम, आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे ही प्रतिज्ञा आणि त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेले 'एक गड आला पण एक गड गेला' हे भावुक उद्गार. खरं तर तानाजी हे शिवरायांचे खूप जुने सहकारी. शिवरायांनी जेव्हा स्वराज्यकार्यास सुरुवात केली तेव्हापासून तानाजी मालुसरे हे शिवरायांसोबत होते. तानाजी मालुसरे ज्या मोहिमेवर असायचे त्या मोहिमेत विजय हा ठरलेलाच असायचा. उंबरखिंड, प्रतापगड, सिंहगड व इतर अनेक मोहिमांमध्ये तानाजींनी आपला पराक्रम गाजवला होता.

संगमेश्वर येथील अपरिचित लढाई

तानाजींच्या अनेक लढायांपैकी अशीच एक अपरिचित लढाई म्हणजे संगमेश्वर येथील सूर्यराव सुर्वे यांच्याविरोधातील लढाई. १६६१ मध्ये शिवरायांनी दक्षिण कोकण जिंकण्याची मोहीम सुरु केली. दंडा राजपुरी ते खारेपाटण शिवरायांना या मोहिमेत प्रचंड यश मिळाले. १६६१ मध्ये निजामपूर आणि पुढे दाभोळ जिंकण्यात आले. यावेळी पालीवाण प्रांताचे राजे जसवंतराव दळवी पळून गेले आणि त्यांनी प्रभानवल्ली प्रांताचे राजे सूर्यराव सुर्वे यांचा आश्रय घेतला. सुर्वे यांच्या प्रांताची राजधानी शृंगारपूर ही होती. शृंगारपूर हे स्थान संगमेश्वरच्या ईशान्येस ८ मैलांवर आहे.

तानाजींची नेमणूक आणि राजापूर स्वारी

या प्रांताची देखरेख करण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे आणि पिलाजी नीलकंठ सरनाईक यांना नेमले. यानंतर शिवाजी महाराजांनी राजापुरावर हल्ला केला कारण तेथे इंग्रजांची वखार होती आणि येथील लोकांनी सिद्दी जोहरला पन्हाळा वेढ्याप्रसंगी मदत केली होती त्यामुळे त्यांना धडा शिकवणे गरजेचे होते. राजापूरनंतर, चिपळूण, संगमेश्वर अशी महत्वाची ठिकाणे स्वराज्यात आली. यानंतर महाराजांनी देवरुख वर स्वारी केली.

सूर्यराव सुर्वेंचा हल्ला

दक्षिण कोकणातील महाराजांच्या मोहिमेची माहिती आदिलशहास समजली व त्याने श्रुंगारपूरच्या सूर्याजी यांना फर्मान पाठवून महाराजांनी जिंकलेली स्थळे परत घ्या असा हुकूम केला. यानंतर सूर्यराव यांनी स्वराज्याच्या सैन्याचा तळ संगमेश्वर येथे असताना त्यावर आपल्या सैन्यासहित येऊन हल्ला केला. यावेळी सूर्यरावाच्या सैन्यात पायदळाची संख्या मोठी होती. सूर्यरावाच्या वेढ्यास फोडण्यास स्वराज्याचे शिलेदार सज्ज झाले आणि लढाईस तोंड फुटले. तानाजी मालुसरे आणि मावळे तलवारी, भाले आणि धनुष्य घेऊन शत्रुसैन्यावर तुटून पडले.

पिलाजींचा पळपुटेपणा आणि तानाजींचा संताप

मात्र यावेळी तानाजी यांच्यासहित असलेले पिलाजी निळकंठ कदाचित सूर्यरावांच्या हल्ल्यात आपला निभाव लागणार नाही असा विचार करून पळून जाण्याचा विचार करू लागले. हातातील तलवार खाली टाकून पिलाजी पळू लागले असता तानाजींनी त्यांना पहिले आणि त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना धरले आणि संतापाने म्हणाले, अरे पिलाजी, या युद्धात मी तुझ्यासोबत असताना तू आपल्याच लोकांना टाकून पळत सुटला आहेस ही खूप चुकीची गोष्ट आहे, पूर्वी तू ज्या बढाया मरायाच्यास त्या या प्रसंगी कुठे गेल्या? राजांनी तुला सेनापतिपदाची मोठी जबाबदारी दिली असता सेनापतीच आज सैन्यास वाऱ्यावर सोडून पळून जात आहे आणि त्याची खंतही तुला वाटत नाही? आणि यानंतर तानाजींनी पिलाजींना एका मोठ्या दगडास दोरखंडानी बांधून ठेवले आणि आपली तलवार घेऊन सूर्यरावांच्या सैन्यासोबत लढू लागले.

तानाजींचा पराक्रम आणि विजय

तानाजींनी यानंतर सूर्यरावांच्या सैन्याची दाणादाण उडवली. सूर्यरावाच्या सैन्याचा फडशा पाडण्यासाठी जणू अंधाऱ्या रात्री साक्षात सूर्यच उगवला असे सर्वांना तानाजींचा पराक्रम पाहून वाटले. तानाजी हाती तलवार घेऊन लढत असताना त्यांचे रक्षण करण्यासाठी स्वराज्याचे तरबेज तिरंदाज सज्ज होते. युद्धभूमीत रक्ताचा व प्रेतांचा खच पडला. सूर्यरावांचे सैन्य पराभूत होऊ लागले आणि आता स्वराज्याच्या सैन्यापुढे आपला निभाव अशक्य आहे हे समजून सूर्यरावाचे सैन्य तेथून पळून गेले. सूर्यराव यांना पूर्वी शिवाजी महाराजांनी अभय दिले होते मात्र तेच सूर्यराव पुन्हा आपल्या विरोधात गेल्याचे समजताच महाराज राजापूरहून संगमेश्वर येथे आले व तानाजी मालुसरे यांची भेट घेऊन त्यांचा व सर्व सैन्याचा सन्मान केला व सूर्यरावास आपल्या दूतांकरवी कठोर निरोप पाठवला. कालांतराने महाराजांनी शृंगारपुरावर स्वारी केली आणि श्रुंगारपूरसहित प्रभानवल्लीचा पूर्ण प्रदेश स्वराज्यात आला.

तानाजींचा आदर्श

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या अपरिचित पराक्रमाची साक्ष देणारी ही लढाई स्वराज्यासाठी अतिशय बिकट प्रसंगीही पळ न काढता 'लढा अथवा मरा' या उक्तीचे पालन करण्याचा आदर्श दिसून येतो व या आदर्शाचा परिपाठ त्यांनी पुढे झालेल्या सिहंगडाच्या युद्धात दाखवून दिला. तानाजींचा हा पराक्रम स्वराज्याच्या इतिहासात एक प्रेरणादायी पर्व आहे.