मुंबईचा अज्ञात इतिहास

मुंबईचा प्राचीन इतिहास झाकोळला जाण्याची अनेक कारणे आहेत मात्र मात्र त्यापैकी प्रमुख म्हणजे, गेल्या दोन हजार वर्षांत या बेटाने अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली व साहजिकच या बेटाचे नावही वेळोवेळी बदलले गेले.

मुंबईचा अज्ञात इतिहास

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मुंबई! भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर बसलेले एक महानगर, मुंबईचा महिमा काय वर्णावा? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर, महाराष्ट्र राज्याची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, जगातील पाचच्या कमांकाचे महानगर, भारत आणि दक्षिण, पश्चिम व मध्य आशियातील सर्वाधिक वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर, भारताच्या सागरी मालवाहतुकीत ५०% योगदान असलेले एक बंदर आणि भारतीय उद्योगांचे माहेरघर अशी अनेक विरुदे या शहरास प्राप्त आहेत.

सदैव जागे असणारे शहर अशी सुद्धा या महानगराची ख्याती आहे. या मुंबईत कुणीही कधीही उपाशी झोपत नाही. सर्व ठिकाणी प्रयत्न करून हरलेली माणसे सुद्धा मुंबईत येतात आणि पैसा व प्रसिद्धी प्राप्त करतात अशी या शहराची जादू आहे. मुंबईला मायानगरी म्हटले जाते ते यासाठीच कारण येथे एकदा आलेला पुन्हा हे शहर सोडून जाण्यास तयार होत नाही, तो कायमचा इथलाच म्हणजे मुंबईकर होऊन जातो.

मुंबईची ही ख्याती काही एका रात्रीत झाली नाही त्यासाठी गेली दोन हजार वर्षे अनेकांचे हात अविरतपणे राबले. असंख्य राजवटी येथे नांदल्या, मुंबईच्या विकासात योगदान दिले आणि काळाच्या ओघात नाहीशा झाल्या आणि आम्ही मुंबईच्या विकासाचे श्रेय फक्त इंग्रजांना देत बसलो. इंग्रजांनी सुद्धा मुंबईचा विकास केला हे खरेच आहे मात्र त्यापूर्वी मुंबई म्हणजे एक निर्मनुष्य बेट होते असा जो गैरसमज पसरवला गेला आहे तो पूर्णपणे खोटा असून इंग्रजांपूर्वीही शेकडो वर्षे मुंबई बेटावर अनेक राज्ये स्थापन झाली होती व या शहराच्या आणि त्याच्या आसमंतात आजही दिसून येणारी लेणी, किल्ले व मंदिरे याचा पुरावा आहेत. मुंबईतील वालुकेश्वर व बाणगंगेचा उल्लेख तर स्कंदपुराणात सुद्धा येतो मात्र दुर्दैवाने कोणीच मुंबईचा प्राचीन इतिहास जाणून घेण्यासही इच्छुक नाही.

वर्तमानात राज्याच्या व देशाच्या आर्थिक विकासात मुंबईचे योगदान सर्वाधिक असले तरी हे स्थान प्राप्त करण्यासाठी मुंबईने स्वत: कितीतरी राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक उलथापालथी स्वत:च्या डोळ्याने पहिल्या व अनेकदा स्वत:चेच नाव बदललेले पाहिले. मुंबईने जसे निर्माणकर्ते पहिले तसेच विनाशकर्ते सुद्धा पाहिले.

मुंबईचा प्राचीन इतिहास झाकोळला जाण्याची अनेक कारणे आहेत मात्र मात्र त्यापैकी प्रमुख म्हणजे, गेल्या दोन हजार वर्षांत या बेटाने अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली व साहजिकच या बेटाचे नावही वेळोवेळी बदलले गेले. मुंबई हे नाव सुद्धा इसवी सनाच्या चौदाव्या शतकात या शहरास मिळाले होते व तशी माहिती मुंबादेवी माहात्म्यात आहे.

मुंबईचे सर्वात जुने नाव पुरी होते व ही पूरी कोकणची प्राचीन राजधानी होती. पुरीवरून कोकणास पुरीकोंकण या नावाने ओळखले जाई. ही पुरी समुद्राने तिन्ही बाजूंनी वेष्टित होती व तिचा पहिला ज्ञात उल्लेख इसवी सनाच्या चौथ्या शतकात आढळतो. मुंबईस पूरी या नावाबरोबर कपर्दि द्वीप अथवा कवडी द्वीप ही नावेही प्राचीन काळी होती. शेकडो वर्षानंतर प्रताप बिंबाने या बेटाचे महिकावती व बिंबस्थान असे नामकरण केले. यानंतर भीमदेवाने या बेटाचे भीमपुरी असे नामकरण केले. कालांतराने मुंबादेवीच्या आशीर्वादाने स्थानिकांनी मुबारक खिलजीचे राज्य येथून घालवले आणि या शहरास मुंबई अथवा मुंबापुरी या नावाने ओळखले जाऊ लागले. गुजरात सुलतानाच्या काळात या शहराचा मानबाई असा उल्लेख सापडतो.

मग मूर्तिभंजक पोर्तुगीज आले आणि त्यांनी मुंबईचे बॉम्ये केले आणि नावासहित तिचे स्वरूपही बदलण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न सकारात्मक नसून नकारात्मक होता. पोर्तुगीजांनी मुंबईची जुनी ओळख पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये ते काही अंशी यशस्वी सुद्धा झाले हे आजही मुंबईचा प्राचीन इतिहास शोधण्यात दिसून येणाऱ्या अडचणीवरून सिद्ध होते. पोर्तुगीजांनंतर ब्रिटिश आले व त्यांनी या बेटावर तब्बल २८६ वर्षे राज्य केले. या काळात त्यांनीही मुंबईच्या स्वरूपात विपुल बदल केले मात्र ते पोर्तुगीजांसारखे विध्वंसक नव्हते. त्यांनी विकासकामे करताना जन्या गोष्टी जपून ठेवल्या आणि अभ्यासकांसमोर आणल्या.

पोर्तुगीज आक्रमकांनी मात्र मुंबईतील प्राचीन वारसास्थळे उध्वस्त केलीच मात्र अनेक शिलालेख सुद्धा पोर्तुगाल येथे नेले व ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत. असे म्हणतात की पोर्तुगीजांच्या काळात शेंदुर लावलेला एखादा पाषाण जरी दिसला तरी पोर्तुगीज त्यास समुद्रात फेकून देत. ब्रिटिशांनी सुद्धा अनेक गोष्टी इंग्लंड येथे 
नेल्या असल्या तरी त्या त्यांनी जगासमोर ठेवल्याने त्यांचा अभ्यास करून इतिहास शोधणे आपल्याला शक्य होते.

उत्तर कोकणच्या ऐतिहासिक साधनांत वारंवार पुरीचे उल्लेख आढळतात मात्र दुर्दैवाने तिची स्थलनिश्चिती आजही झालेली नाही मात्र पुरीचे ऐतिहासिक साधनांतील वर्णन नीट अभ्यासल्यास ते मुंबईशी तंतोतंत जुळते आणि मुंबई बेटावर वालुकेश्वर, बाणगंगा ही प्राचीन तीर्थे ज्यांचा उल्लेख स्कंदपुराणात आहेत ती पाहता ब्रिटिश येण्यापूर्वी मुंबई निर्मनुष्य होती हा दावा फोल ठरतो.

पुरीची स्थलनिश्चिती करण्याचे यापूवीही अनेकदा प्रयत्न झाले मात्र मुंबई हीच पुरी असा निष्कर्ष प्रथमच या पुस्तकातून सप्रमाण मांडण्यात आला आहे. उत्तर कोकणच्या प्राचीन इतिहास संशोधनात अतिशय मोलाची भर घालणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक वासुदेव विष्णू मिराशी यांनी म्हटले होते की पुरीचा स्थलनिश्चय भावी संशोधनावर सोपवणे भाग आहे.

उत्तर कोकणाचा इतिहास ज्यांना जाणून घ्यावयाचा असेल त्यांनी वा.वि. मिराशी, गो.ना. माडगावकर, या.वा. आचार्य, मो.वि. शिंगणे, ज. रा. चौधरी, त्र्यं. शं. शेजवलकर, वा. कृ. भावे, वि. गो. खोबरेकर यांनी लिहिलेले उपयुक्त असे ग्रंथ नक्की वाचावेत कदाचित यातून अजून काही नवे शोध लागू शकतील. या सर्व पुस्तकांची नावे शेवटच्या पानावर देण्यात आले आहेत याशिवाय उत्तर कोकणचा उल्लेख असणारे काही दुर्मिळ ग्रंथ आणि विदेशी लेखकांनी फार पूर्वी लिहिलेले ग्रंथ सुद्धा मुंबईचा इतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक आहेत.

हे पुस्तक पूर्णपणे मुंबईच्या प्राचीन इतिहासावर आधारित असून या माध्यमातून मुंबई हीच प्राचीन कोकणची राजधानी पुरी होती हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे मुंबईच्या प्राचीन इतिहासाच्या संशोधनास काही प्रमाणात दिशा मिळेल व भविष्यात अनेक नवे पुरावे हाती लागतील व मुंबई हीच प्राचीन पुरी होती हे सिद्ध होईल अशी आशा आहे. असे म्हणतात की लक्ष्मीचा निवास हा सागरात असतो आणि भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर लक्ष्मीचेच रूप आहे. शेकडो वर्षांपूवी विकीती या कवीने मुंबईस पश्चिम समुद्राच्या लक्ष्मीची सार्थ उपमा दिली होती जी आजही खरी ठरते. मुंबईचा प्राचीन इतिहास जगासमोर यावा व तिच्या भरभराटीत योगदान देणाऱ्यांची महती सर्वीस समजावी या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहण्यात आले असून मुंबईवर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या पसंतीस उतरेल.

पुस्तक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे - Amazon | Flipkart