मुरुड जंजिरा - पर्यटकांची पंढरी

‘मुरुड-जंजिरा’ हे आज पर्यटकांचे आवडते ‘पर्यटन केंद्र’ म्हणून नावारूपास आले आहे. मुंबईसारख्या महानगरीमध्ये सततची दगदग सहन करणारे हौशी पर्यटक ‘वीकएन्डला’ या पर्यटनस्थळाला आवर्जून येत असतात.

मुरुड जंजिरा - पर्यटकांची पंढरी
मुरुड जंजिरा - पर्यटकांची पंढरी

‘मुरुड-जंजिरा’ हे शब्द कानी पडताच डोळ्यासमोर उभा राहतो तो सागर लाटांशी लाडिवाळपणे खेळणारा निळाशार अरबी समुद्र, हळुवारपणे बागडावी अशी सोनेरी वाळूमय चौपाटी, नम्रपणे गगनाचे वेध घेणाऱ्या हिरव्या नारळी-पोफळीच्या बागा, आपण मुरुडला भेट दिल्याची साक्षीदार असलेली लालभडक माती, माणिकमोत्यांनी भरलेली पिवळीशार शेतजमीन आणि त्याच्यापलीकडे सदाहरित असणाऱ्या डोंगरकड्या व त्याच्या उरापोटावर बागडणारे शुभ्रधवल धबधबे! या सप्तरंगाप्रमाणे येथे भेट देणाऱ्या पर्यटक-पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारी मुरुडची माणसे देखील पर्यटकांना आकर्षित करून घेण्यामध्ये पटाईत आहेत, बव्हं तर या निसर्गाने त्यांना हे वरदानच दिले आहे.

‘मुरुड-जंजिरा’ हे आज पर्यटकांचे आवडते ‘पर्यटन केंद्र’ म्हणून नावारूपास आले आहे. मुंबईसारख्या महानगरीमध्ये सततची दगदग सहन करणारे हौशी पर्यटक ‘वीकएन्डला’ या पर्यटनस्थळाला आवर्जून येत असतात. मुंबईपासून मुरुडला येण्यासाठी इ.स.१५३० मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेल्या चौलच्या किल्ल्याच्या भिंती-दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर मुरुड दर्शनाला सुरुवात होते. प्राचीन काळी आपल्या देशांचा परराष्ट्रांशी सागरी व्यापार ज्या खाडीतून चालत असे ती नागोठण्याची खाडी आपले पाय धुण्यासाठी सज्ज असते. मुरुडमध्ये घेऊन जाणारा या खाडीवरील सेतू म्हणजे आधुनिक रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील पहिला आदर्श सेतू होय. हा सेतू पार केल्यावर साळावच्या प्रसिद्ध विक्रम विनायक दर्शन घेऊन मुरुडकडे जाताना पोर्तुगीजांच्या उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेला कोर्लईचा ‘अभेद्य किल्ला’ हा तर किल्ला प्रेमींचे मोठे आकर्षण आहे. त्या किल्ल्यावर चढताना आजही मुंबईकरांची दमछाक होते.

तेथून पुढे जाणारा नागमोडी रस्ता उजवीकडे पश्चिम लाटांचे तुषार झेलीत आणि पूर्वेकडील कडेकपारीच्या दर्शनाने पुढे सरकतो. काशिदची सागरपट्टी ही तर पर्यटकांची पंढरी समजली जाते. तेथून पूर्वेकडे उंचच उंच डोंगरकडे दिसतात. त्या निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर ‘केसोली’ हे संस्थानाच्या उन्हाळी राजधानीचे ठिकाण (मुरुडचे माथेरान) दृष्टीस पडते. काशिद सर्व्हे सोडून एक अवघड वळण पार केल्यानंतर जागृत देवस्थान सिद्धिविनायकाचे नांदगाव हे ठिकाण आपले स्वागत करते. तेथे दर्शन घेऊन पुढे मजगावमार्गे टाळदेवाची प्रसिद्ध खिंड पार केल्यानंतर मुरुडचे विहंगम दृश्य नजरेस पडते. सातासमुद्राची आठवण करून देणाऱ्या सागरावरून दृष्टी ढळते न ढळते तोच नजरेस पडतो मुरुडचा शिरोमणी असलेला संस्थानाचा राजवाडा जो पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

राजवाडा सोडून १०० फुटांवर आल्यावर मुरुडला विजेचा पुरवठा करणाऱ्या पहिल्या केंद्राचे अवशेष दिसतात. त्या पॉइंटवरून पूर्वेकडे दोन डोंगरांवर दत्तमंदिर आणि इदगाह आपल्याला येथील सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवतात. पुढे येताच पोलीस ठाण्यापासून दरबार रोड सुरू होतो. शासकीय कार्यालये एकाच रस्त्यावर दुतर्फा असणारे मुरुड हे बहुदा एकमेव ठिकाण असावे. मुरुड शहरामध्ये प्रवेश केल्यावर येथील माणसांच्या सागरासारख्या खोल मनाने आणि माडासारख्या उंच आदरातिथ्याने येथील पर्यटक भारावून जातो. त्याचे अधिक वर्णन करण्यापेक्षा येथे पाहुणचार घेतलेल्या पर्यटकांकडूनच त्याची महती ऐकावी.

प्रशस्त सागरकिनारा, हिरव्यागार नारळी-पोफळीच्या बागांमध्ये समरस झाल्यानंतर आपण एकदरा खाडी ओलांडून डोंगरीमार्गे काळकायच्या खोऱ्यात पोहोचतो. सागरी प्रवासाच्या काळातील उत्कृष्ट म्हणून नावाजलेले हे ठिकाण सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे समजले जात असे. काळकायच्या खोऱ्यातून दंडराजपुरीकडे डोंगरमाथ्याच्या अवघड रस्त्यावरून जाताना श्रीनगरवरून लेहकडे जाणाऱ्या रस्त्यांची आठवण होते. पश्चिमेकडे पाताळाचा वेध घेणारे समुद्रदर्शन घेत-घेत आपण राजपुरीमध्ये पोहोचतो. म्हणजेच आपल्या पश्चिम किनाऱ्यावरील अभेद्य जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतो.

येथून जंजिरा किल्ला, कासा किल्ला (पद्मदुर्ग), पलीकडे श्रीवर्धन तालुक्यातील नानवेलची बत्ती, राजपुरीची खाडी आदी पाहिल्यानंतर निसर्गाने या भागाला झुकते माप दिल्याची कल्पना येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून जात असताना ‘खोकरी’ येथील ‘गोल घुमट’ आपल्याला विजापूरच्या साम्राज्याची आठवण करून देत १०व्या शतकापर्यंत मागे घेऊन जातात. संभाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेण्यासाठी रचलेल्या बांधावरून पलीकडे आगरदांड्याकडे जाताना उजवीकडे कन्याकुमारीच्या सागराचे तर डावीकडे हिमालयासारख्या उंचच उंच पर्वतरांगांचे दर्शन आपल्याला घडून येते. हा सुखद प्रवास करीत सागर किनाऱ्याने निसर्गरम्य ‘भालगांव’ या ठिकाणी येतो. तेथून गोपाळवट आणि आराळी येथून येणाऱ्या आकाराच्या दऱ्यांचे दुर्मिळ दर्शन होते.

येथून खाडीतून पलीकडे गेल्यावर बौद्धकालीन कुडे-मांदाडची जगप्रसिद्ध लेणी पहावयास जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक गर्दी करत असतात. या ठिकाणाहून आपणास शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत असलेले ‘तळागड’ आणि ‘घोसाळगड’ यांचे दर्शन होते. या गडांच्या पलीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुरू होऊन रायगड किल्ल्याच्या क्षितिजाला जाऊन भिडतात. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या निसर्गदर्शनाने पर्यटकांना मुरुड-जंजिरा येथे आल्याचे चीज झाल्याचे समाधान मिळते. हे दर्शन करून परत मुरुड येथे जाताना शिघ्रे गावाजवळ मुरुडला पाणी पुरवठा करणारे ब्रिटीशकालीन गारंबी आणि नवेदरचे धरण हे पर्यटकांच्या वनभोजनाचे प्रसिद्ध स्थळ आहे. अशा प्रकारे दोन दिवसांमध्ये साठवून घेतलेल्या या परिसराच्या इतिहासाबाबत देखील पर्यटकांना मोठी उत्सुकता वाटते.

मुरुड परिसरातील इतर पाहण्यासारखी स्थळे

भोगेश्वर मंदिर

मुरुडच्या पुरातन मंदिरांपैकी एक जागृत देवस्थान. सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधलेले पश्चिमाभिमुख देवस्थान. हे मंदिर स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांसाठी आध्यात्मिक शांतीचे ठिकाण आहे. येथील शांत वातावरण आणि प्राचीन वास्तुकला पर्यटकांना आकर्षित करते.

श्री सिद्धिविनायक देवस्थान

श्री सिद्धिविनायक हे जागृत देवस्थान. अष्टविनायकाची यात्रा या देवस्थानाचे दर्शन घेतल्याखेरीज पूर्ण होत नाही. माघ वद्य चतुर्थीला मोठी जत्रा भरते. हे मंदिर गणेशभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे आहे आणि येथील वार्षिक उत्सव पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरते.

सर एस ए हायस्कूल

जंजिरा संस्थानाचे नवाब सर सिद्दी अहमदखान यांनी संस्थानाच्या राजधानीत ‘जंजिरा स्कूल’ या नावाने इ.स.१८७१ मध्ये शाळा सुरू केली. ही शाळा ऐतिहासिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. येथील जुनी वास्तू आणि त्यामागील इतिहास पर्यटकांना जंजिरा संस्थानाच्या वैभवाची आठवण करून देतो.

फणसाड अभयारण्य

जंजिरा नवाबांचे पारंपारिक शिकारक्षेत्र म्हणजे केसोली जंगल, तेच सध्याचे फणसाड अभयारण्य म्हणून ओळखले जाते. अभयारण्य सुमारे ५४ चौ.किमी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्यात अनेक दुर्मिळ वृक्षराजी, पक्षी, सरीसृप व प्राण्यांचा वावर आहे. दुर्मिळ समजली जाणारी शेकरू सुद्धा येथे पाहावयास मिळते. निसर्गप्रेमींसाठी हे अभयारण्य एक खजिना आहे.

श्री दत्त मंदिर

प.पू. ब्रह्मेंद्रस्वामी यांनी इ.स.१७५० च्या सुमारास जंजिरा मुरुडमधील निसर्गरम्य डेकडीच्या माथ्यावरील सपाट मैदानातील उंबराच्या झाडापाशी श्री दत्तगुरुंच्या पादुकांची स्थापना केली. संस्थानाचे तत्कालीन न्यायाधीश मा. राजाध्यक्ष यांनी १९०७ मध्ये लहानसे मंदिर उभारले, तर १९२७ मध्ये कळस तथा सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास आले. १९९७ मध्ये जिर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारण्यात आले. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५० मी. उंचावर असलेल्या या ठिकाणी ३०९ पायऱ्या चढून जावे लागते. मुरुडचे मनोहारी रूप येथून न्याहाळता येते. हे मंदिर दत्तभक्तांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक विशेष ठिकाण आहे.

इदगाह

मुरुडच्या सौंदर्यस्थळांमध्ये इदगाहचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. मुस्लिम धर्मियांचे हे पवित्र स्थान. मुरुड शहरापासून उत्तरेस दोन किमी. अंतरावर सुमारे ४०० फूट समुद्रसपाटीपासून उंचावर ही वास्तू आहे. याच पर्वतराजीवर साबिक रियासतचे नवाब वलिये अफशान सर अहमद खान शाह यांनी १९३८ मध्ये इदगाहची पायाभरणी करून प्रारंभ केला. इदगाहच्या व्यवस्थापन तथा देखरेखीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. मुस्लिम समाज रमजान ईद व बकरी ईद या सणांच्या दिवशी इदगाहवर आवर्जून नमाज अदा करतात. इदगाह हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे.

कोटेश्वरी देवी

मुरुडच्या हद्दीत प्रवेश करतानाच दर्शन होते ते कोटेश्वरी ग्रामदेवतेचे. मंदिरासमोर अथांग सिंधूसागर दिसतो, तर याच सागरात घट्ट पाय रोवून उभा असलेला इतिहासाचा मूक साक्षीदार पद्मदुर्ग खुणावतो. कोटेश्वरी देवीची मूर्ती कासा किल्ल्यावर होती. या मूर्तीची स्थापना शिवाजी महाराजांनी केली होती, अशी अख्यायिका बुजुर्ग सांगतात. हे मंदिर स्थानिकांसाठी आणि पर्यटकांसाठी आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचे आहे.

मुरुड-जंजिरा: पर्यटकांसाठी पंढरी

मुरुड-जंजिरा हे केवळ समुद्रकिनारे आणि किल्ल्यांसाठीच नाही, तर त्याच्या निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि आध्यात्मिक स्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक ठिकाण पर्यटकांना काहीतरी खास अनुभव देते. जंजिरा किल्ल्याचा अभेद्यपणा, काशिद बीचचे सौंदर्य, फणसाड अभयारण्यातील जैवविविधता, आणि दत्त मंदिरासारखी आध्यात्मिक स्थाने येथील वैविध्य दर्शवतात. मुरुडच्या स्थानिक लोकांचे आदरातिथ्य आणि कोकणी संस्कृती पर्यटकांना पुन्हा-पुन्हा येण्यासाठी प्रेरित करते.

प्रवास टिप्स

प्रवास टिप्स म्हणून खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • प्रवासाची सोय: मुंबईहून फेरी (मांडवा मार्गे) किंवा रस्त्याने (अलिबागमार्गे) मुरुड-जंजिरा सहज पोहोचता येते. रेवस-रेड्डी सागरी महामार्ग हा प्रवास सुखकर बनवतो.

  • राहण्याची सोय: मुरुड आणि काशिद येथे हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे आणि कॉटेज उपलब्ध आहेत.

  • सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च हा मुरुड भेटीचा उत्तम काळ आहे, कारण हवामान सौम्य आणि आल्हाददायक असते.

  • स्थानिक खाद्यपदार्थ: कोकणी सी-फूड, मालवणी मासे, आणि स्थानिक व्यंजने यांचा आस्वाद घ्या. मुरुडमधील स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे.

  • वॉटर स्पोर्ट्स आणि साहसी खेळ: काशिद बीचवर वॉटर स्पोर्ट्स आणि जंजिरा किल्ल्याला बोटीने भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे.

मुरुड-जंजिरा हे निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे. येथील सागरकिनारे, किल्ले, मंदिरे, आणि अभयारण्य प्रत्येक पर्यटकाला अविस्मरणीय अनुभव देतात. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण विकेंड गेटवेसाठी आदर्श आहे. मुरुडच्या निसर्गरम्य सौंदर्याने आणि स्थानिक लोकांच्या आतिथ्याने प्रत्येक पर्यटक भारावून जातो. मग वाट कसली पाहता? सामान बांधा आणि मुरुड-जंजिरा या पर्यटकांच्या पंढरीला भेट द्या!