मुरुड-जंजिरा परिसरातील पर्यटनस्थळे: निसर्ग, इतिहास आणि अध्यात्माचा संगम

हिरवीगार वनराई, अथांग निळाशार अरबी समुद्र, रुपेरी-चंदेरी वाळू-नारळी पोफळीच्या बागांना लागून मुरुडचा किनारा खूपच लक्षवेधी आहे. नवाबाच्या राजवाड्यापुढे वळणावर रात्रीच्या वेळी प्रवेश करताना समुद्रकिनारी हायमास्ट दिव्यांची सोनेरी रोषणाई आणि तीन डोंगराच्या कुशीतील मुरुड म्हणजे नैसर्गिक शांतीचा रात्रीच्या काळोखातही सुंदर भासतो.

मुरुड-जंजिरा परिसरातील पर्यटनस्थळे: निसर्ग, इतिहास आणि अध्यात्माचा संगम
मुरुड जंजिरा परिसरातील पर्यटनस्थळे

मुरुड-जंजिरा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अभेद्य आणि अजिंक्य जंजिरा किल्ला आणि शहरापासून अडीच किलोमीटरपर्यंत पसरलेला अवर्णनीय समुद्रकिनारा. हा परिसर केवळ पर्यटकांनाच नाही, तर निसर्गाशी जवळीक न साधणाऱ्या आणि इतिहासात रस नसणाऱ्या व्यक्तींनाही मोहून टाकतो. मुरुडच्या आजूबाजूचा परिसर पाहिल्यास, येथे मनसोक्त फिरण्यासाठी किमान एक आठवडा लागेल. चला, मुरुड-जंजिरा परिसरातील या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांचा आढावा घेऊया.

मुरुड-जंजिरा: निसर्गाचा आणि इतिहासाचा खजिना

हिरवीगार वनराई, अथांग निळाशार अरबी समुद्र, रुपेरी-चंदेरी वाळू-नारळी पोफळीच्या बागांना लागून मुरुडचा किनारा खूपच लक्षवेधी आहे. नवाबाच्या राजवाड्यापुढे वळणावर रात्रीच्या वेळी प्रवेश करताना समुद्रकिनारी हायमास्ट दिव्यांची सोनेरी रोषणाई आणि तीन डोंगराच्या कुशीतील मुरुड म्हणजे नैसर्गिक शांतीचा रात्रीच्या काळोखातही सुंदर भासतो. सकाळच्या कोवळ्या किरणांमध्ये चकाकणारी वाळू, निळेशार पाणी, सुमारे अडीच कि.मी. लांबीचा हा किनारा पर्यटकांना मोहून टाकतो. समुद्रस्नानासाठी इतका उत्तम व सुरक्षित किनारा शोधून सापडणार नाही. गोव्यापर्यंत पाहिल्यास असे नैसर्गिक सौंदर्य चुकून एखाद्या सागरतटास मिळालेले दिसेल. म्हणून हा किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

गावाप्रमाणे समुद्रकिनारा स्वच्छ असलेला दिसतो. किनाऱ्यावरील सुरूची बने, उजव्या हाताकडील प्रेक्षणीय राजवाडा, नवाबकालीन टुमदार इमारती यामुळे सगळे वातावरण आल्हाददायक भासत राहते. सोनेरी वाळू, चिंबोऱ्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्या, लाटांबरोबर वाहून येणारे शंख-शिंपले यासाठी पर्यटकांनी नेहमी हा किनारा गजबजलेला असतो. मुरुड समुद्रकिनारी सूर्यास्त अनुभवण्यास हजारो पर्यटक सुट्टीत या किनाऱ्यावर ठाण मांडून असतात.

अभेद्य जंजिरा: ऐतिहासिक वैभव

दहाव्या शतकात कोकणपट्टीवर शिलाहारांचे राज्य होते आणि त्यांची राजधानी मुरुडजवळील वैभवशाली राजपुरी होती. त्यांचे शिलाखंड राजपुरी खोकरीच्या दरम्यान अजूनही साक्ष देतात. दमण ते कारवा हा पश्चिम किनारपट्टीचा भाग आजही किल्ल्याच्या रूपाने दिमाखाने उभा आहे. त्यांना जंजिरे किंवा सागरातील किल्ले म्हणता येईल, असे किल्ले थोडेच आहेत. वसई, जंजिरा, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अग्वादा, सदाशिवगड, अंजनदीव अशा मोजक्याच किल्ल्यांच्या इतिहासात जातिवंत सागरी लढाया झाल्या. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला बलाढ्य, अजिंक्य आणि अभेद्य किल्ला म्हणजेच जंजिरा.

मुरुडपासून राजपुरी गाव अवघ्या ५ किमी. अंतरावर आहे. राजपुरी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी होडीचा वा मचव्याचा प्रवास करावा लागतो. किल्ल्याचा पाया मुळी पक्क्या कातळावर आहे. पूर्ण भरतीच्या वेळी समुद्रपातळीपासून तटाची उंची पंधरा मीटर सहज भरते. किल्ल्याचा आकार लांबून घुबडासारखा वाटतो. किल्ल्याला दोन दरवाजे असून महादरवाजा पूर्वेस असला तरी लांबून दिसत नाही. ३०० वर्षांपूर्वी बांधलेला जंजिरा किल्ला हा वास्तुशिल्पाचा एक चमत्कार वाटतो. मुख्य दरवाज्यावर दोन्ही दुर्गद्वार शिल्प असून किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत. शस्त्रागार व दारूगोळ्याचे कोठार उंचावर आहे. किल्ल्याचा तट दगडी व मजबूत असून चिरे झिजले तरी सांध्यांमध्ये भरलेला चुना, शिसे अभंग आहे. किल्ल्याची २२ बुरुजांची, तटांमध्ये गुंफलेली माळ केवळ बुलंद, बळकट आणि बेलाग आहे. जंजिरा किल्ला हा इतिहासप्रेमींसाठी आणि वास्तुशिल्प अभ्यासकांसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे.

श्री विक्रम विनायक मंदिर: अध्यात्मिक शांती

मुरुडपासून रोह्याच्या रस्त्यावर अलिबागकडे जाताना विक्रम इस्पातचा कारखाना लागतो. या ठिकाणी बिर्ला उद्योग समूहाने त्यांच्या परंपरेप्रमाणे मंदिर उभारले. ओबडधोबड टेकडी जेव्हा गणेश मंदिराचे रूप घेत होती तेव्हा कुणाला या ओसाड रानात काही निर्मिती होईल हे अशक्यच वाटले असेल. परंतु पांढऱ्या शुभ्र रंगाचा संगमरवर व टेकड्यांच्या नैसर्गिक उताराचा खुबीने वापर करून झालेले बगीचे, कारंज्यासह प्रकाश योजना यामुळे विक्रम विनायक मंदिर म्हणजे पर्यटकांचे नंदनवन व गणेशभक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. पॉलिकॉर्पशीटचे छत व चारी बाजूंनी मोकळा सभा मंडप, मंदिरच्या मध्यवर्ती जागी सजीव भासणारी गणेशमूर्ती, बाजूला छोट्या मंदिरात राधा-कृष्ण, शंकर-पार्वती, देवी दुर्गामाता व सूर्यदेवांच्या नेत्रसुखद मूर्ती आहेत.

आदित्य बिर्ला यांच्या स्मृती जतन करणारा पूर्णाकृती पुतळा बागेची शोभा वाढवतो. पर्यटकांची नेहमी कायम गर्दी असणारे हे ठिकाण प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. सकाळी ९.०० व सायं. ७.१५ वा. मंदिरात आरती व पूजाअर्चा होते. सकाळी ६.०० ते ११.३० व सायं. ४.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत मंदिरात प्रवेश मिळतो. रेवदंडा एस.टी. स्थानकापासून एस.टी. गाडीसह व खाजगी वाहतुकीची सोय आहे. हे मंदिर अध्यात्मिक शांती आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी उत्तम आहे.

काशिद बीच: गोव्याची आठवण

गोव्यातले लांबच लांब पसरलेले बीच सर्वांनाच माहिती आहेत. असाच गोव्याची आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिद बीच आहे. मुरुडच्या उत्तरेस १८ कि.मी.वर हा सुंदर समुद्रकिनारा आहे. सध्या देशी-विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. किनाऱ्यावरील सुरूच्या नयनमनोहर बागांतून थांबलेल्या पर्यटकांच्या गाड्या आणि लाटांवर खेळणारी माणसे पाहूनच या बीचचे महत्त्व लक्षात येते. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी मुंबईतून शेकडो पर्यटक इथे समुद्रस्नानासाठी जमतात. अनेक वेळा इथे मॉडेलिंग, सिरियल व सिनेमांचे शूटिंग होत असते. सुरूबनात असलेल्या स्टॉल्सवर सर्व प्रकारची खान-पान सेवा असल्याने पर्यटक मजेत असतात. काशिद बीचच्या समोरच्या डोंगर उतारावर अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आहेत. काशिद बीच हे समुद्रस्नान आणि वॉटर स्पोर्ट्स प्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे.

पद्मदुर्ग (कांसा) किल्ला: शिवाजी महाराजांचा वारसा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत जंजिर्याचा लढा देत असताना शिवरायांच्या दर्यासारंग दौलतखान याने १६६१ मध्ये जंजिर्यापासून काही अंतरावर मुरुड शहराच्या समुद्रकिनाऱ्यासमोर कासा खडकावर एक किल्ला बांधला तो 'पद्मदुर्ग किल्ला' यास कासा किल्ला सुद्धा म्हणतात. ऐतिहासिक वास्तूंबाबत प्रेम असणारे पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. जंजिरा किल्ल्यात असणाऱ्या चावरी, लांडाकासम, कलालबांगडी या तोफेच्या मार्यामुळे कासा किल्ल्याचा जंजिर्याच्या दिशेचा भाग काही अंशी फुटला होता. अरबी समुद्राच्या मुख्य प्रवाहात असणारा हा किल्ला ३५० वर्षे पाण्याचा मारा खात आता अर्धाअधिक राहिला आहे. किल्ल्यामध्ये पोलादी तोफा गंजून गेल्या आहेत. गोड्या पाण्याचा पाच खणी पक्का तलाव या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. मुरुड शहराच्या वेशीवर असणारी ग्रामदेवता कोटेश्वरी माता हिचे मूळस्थान या किल्ल्यात होते असे म्हटले जाते. सिद्दीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवरायांचा आरमारी प्रमुख दौलतखान याने उभारलेला हा किल्ला कालांतराने सिद्दीने जिंकून त्याचा तुरुंग म्हणून वापर केला. पर्यटकांना खाजगी बोटीने किल्ला पाहण्यास जाता येते.

खोकरी घुमट: ऐतिहासिक स्मारके

सिद्दींचे धर्मगुरू सय्यद अली नजीर व सिद्दी नवाबांच्या काही कबरी खोकरी या ठिकाणी आहेत. खोकरी घुमट म्हणून हे ठिकाण पर्यटकांना ठाऊक आहे. इतिहासकाळात दंडा-राजपुरी बंदराजवळचे खोकरी हे एक छोट्या वस्तीचे गाव होते. भारतीय व अरबी पद्धतीच्या शिल्पकलेचा एक उत्तम प्राचीन नमुना म्हणून या घुमटांचे शिल्पकाम पाहण्यास चोखंदळ पर्यटक येतात. सिद्दी सिरुलखान, सिद्दी खैरियत व सिद्दी याकुतखान यांच्या कबरीसुद्धा याच ठिकाणी आहेत. खोकरी घुमट हे इतिहासप्रेमींसाठी एक विशेष आकर्षण आहे.

गारंबी धरण: निसर्गाचा आल्हाद

जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विकास करणारे सर सिद्दी अहमदखान यांनी विक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गारंबीच्या जंगलातील धरणास "विक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स" हे नाव दिले. विपुल वनसंपत्ती, नैसर्गिक पाणी अडवून बांधलेले हे धरण गारंबी धरण म्हणून प्रसिद्ध आहे. शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरून पूर्णपणे नैसर्गिक प्रवाहाच्या वेगाचा वापर करून केले जाते. पावसाळ्यात पर्यटक पाण्याच्या प्रवाहांत डुंबण्यासाठी हमखास या ठिकाणी जातात. वनभोजनासाठी हे ठिकाण आदर्श आहे. पाण्याचा मूळ प्रवाह दूषित न करण्याचे सामंजस्य बाळगून निसर्गाचा आनंद घेण्यास कोणतीच हरकत नाही. दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाट, चहूबाजूस प्रचंड वृक्षराजी, मोठमोठे खडक, वाहत्या पाण्याची गाज, पक्ष्यांची किलबिल यामुळे पर्यटक गारंबी परिसरात खिळून जातो.

कोर्लई किल्ला: पोर्तुगीज वारसा

रेवदंडाखाडीच्या तोंडाजवळ साळाव पुलाजवळ ऐतिहासिक कोर्लई किल्ला आहे. सन १५२१ मध्ये दियोगू लोपिस दि सैकर या पोर्तुगीज सैन्याधिकाऱ्याने हा किल्ला बांधला असल्याचे नमूद आहे. लहानशी तटबंदी व कूस उभारलेला हा किल्ला बरीच वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ल्याचे प्रवेशद्वार समुद्राच्या बाजूस आहे. याठिकाणी 'लढल्याशिवाय आत प्रवेश नाही' असा इशारा दगडावर कोरलेला दिसतो. किल्ल्यास सात दरवाजे आहेत. आता मोडकळीस आलेले चर्च आहे. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगराजवळ समुद्रास खेटून जुने दिपगृह आहे. अत्यंत प्रेक्षणीय वातावरणातील या किल्ल्यावरून साळव खाडीपुल सुंदर दिसतो.

गायमुख: अध्यात्मिक शांतीचे स्थान

शहरास लागून पुलाच्या दुसऱ्या टोकास जंजिर्याकडे जाताना एकदरा गाव लागते. एकदरा गाव डोंगराच्या पूर्वेस वसले आहे. पूर्वी ही कोळी वस्ती जंजिरा किल्ल्यात राहात असे. डोंगराच्या माथ्यावर संभाजी महाराजांनी शामराजगडाचे अवशेष आहेत. या डोंगराच्या कपारीमध्ये गायमुख हे शिवस्थान आहे. दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या हरिहरेश्वराचे मूळस्थान गायमुख असल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे. फारपूर्वी कुणी तरी वृषभ हत्या या ठिकाणी केल्याने महादेवाने पलिकडच्या श्रीवर्धनच्या डोंगरावर स्थलांतर केले तेच ठिकाण हरिहरेश्वर असल्याच्या शिवभक्तांना विश्वास आहे. पर्यटक अध्यात्मिक शांतीसाठी याठिकाणी फेरफटका मारण्यास श्रद्धापूर्वक जातात.

क्षेत्रपाल शिवमंदिर: निसर्गातील अध्यात्म

दत्तमंदिराच्या टेकडीवरून जंजिरा हँगीग व्हॅली परिसरांत पुरातन शिवमंदिर आहे. क्षेत्रपाल शिवमंदिर शाळांमधील मुलांना वनभोजनासाठी ठाऊक आहे. जंजिरा हँगीग व्हॅलीच्या विकासामुळे आता शिवमंदिरापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. मंदिराजवळ असणारी दगडी विहीर वेगळ्या पुरातन धाटणीची आहे. निसर्गासह एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती देणारे हे 'शिवस्थळ' निसर्गाच्या कुशीत आपले वेगळेपण टिकवून आहे. ध्यानधारणा करण्यासाठी येथील वातावरण अत्यंत उपयुक्त आहे.

खोरा बंदर: समुद्रसफर

जंजिरा संस्थानाचा इतिहास अरबी समुद्राशी निगडीत आहे. खोरा बंदरात पूर्वी भाऊच्या धक्क्यावरून रत्नागिरीस जाणारी बोट थांबत असे. मुंबईहून एस.टी. वाहतूक नव्हती तेव्हा हा एकमेव जलमार्ग होता. या ठिकाणावरून जंजिरा किल्ला समोरच दिसतो. पर्यटक जेव्हा यदाकदा येत असत तेव्हा याच बंदरातून जंजिरा किल्ला पाहण्याची सोय होती. येथून किल्ला पाहण्यास गेले तर अर्ध्याअधीक तासाची समुद्रसफर घडते.

कुडे लेणी: बौद्धकालीन वारसा

कुडे, मांदाड लेणी, खाजणी, भालगांव पुलामुळे मुरुड शहरापासून केवळ २५ कि.मी. दक्षिण दिशेस, मुंबई-गोवा महामार्गापासून २१ कि.मी. अंतरावर कुडे, मांदाड लेणी पाहण्यास पूर्वी मुरुड मधून खाजगी होडीने जावे लागत असे. आता भालगांव-खाजणी मांदाड पुलामुळे शहरापासून रस्तामार्गे केवळ २५ कि.मी. अंतरावर लेणी आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगांवपासून २१ कि.मी. असलेल्या या लेण्या पाहण्यास स्वतःचे वाहन असेल तर थेट लेण्यांपर्यंत पोहोचता येते.

कुडे लेणी बौद्धकालीन लेणी आहेत. माणगांव प्रांतावर महाभोज राजवंशाची सत्ता असताना या लेण्यांची निर्मिती झाली आहे. १८४८ साली डोंगरांच्या कपारीतील या लेण्यांचा शोध लागला. २६ लेण्या या ठिकाणी आहेत. सगळा परिसर पश्चिमाभिमुख आहे. समोर अथांग अरबी समुद्र, पूर्वेस तळा, उत्तरेस घोसाळा किल्ला दिसून येतो. दोन मजली लेण्यांमध्ये खालच्या लेण्यापैकी बहुतांशी प्रेक्षणीय आहेत. एकसंघ दगड कोरून निर्माण झालेल्या लेण्या पाहताना आश्चर्यमिश्रित भाव सहज उमटतात. तळ मजल्यावर पंधरा लेण्या व वरच्या बाजूस अकरा लेण्या आहेत. पावसाच्या तडाख्याने मुख्य लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळील अजस्त्र दगडी हत्ती ध्वस्त झाले आहेत. काही शिलालेख स्पष्ट आहेत. भिक्षुकांच्या ध्यानधारणा व निवासासाठी असणाऱ्या या लेण्यांखाली बारमाही स्वच्छ पाणी भरलेले असते.

प्रवास टिप्स

मुरुड-जंजिरा परिसर हा निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम आहे. येथील समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि लेणी प्रत्येक पर्यटकाला काहीतरी खास देतात. प्रवास टिप्स म्हणून खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • प्रवासाची सोय: मुंबईहून फेरी किंवा रस्त्याने मुरुड-जंजिरा सहज पोहोचता येते.

  • राहण्याची सोय: काशिद आणि मुरुड येथे हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत.

  • सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च हा मुरुड भेटीचा उत्तम काळ आहे.

  • स्थानिक खाद्यपदार्थ: कोकणी सी-फूड, मालवणी मासे आणि स्थानिक व्यंजनांचा आस्वाद घ्या.

मुरुड-जंजिरा परिसर हा निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि अध्यात्मिक शांती यांचा अनोखा संगम आहे. जंजिरा किल्ल्यापासून काशिद बीचपर्यंत, गारंबी धरणापासून कुडे लेण्यांपर्यंत, हा परिसर प्रत्येक पर्यटकाला अविस्मरणीय अनुभव देतो. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण विकेंड गेटवेसाठी आदर्श आहे. मग वाट कसली पाहता? सामान बांधा आणि मुरुड-जंजिरा परिसरातील या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांना भेट द्या!