छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रिटिशांमध्ये दरारा

सन १६७२ मध्ये घोडबंदरवर स्वारी करुन महाराजांनी पोर्तुगीजांची वसाहत काबीज करण्याचा प्रयत्न केल्याने मुंबईकर इंग्रज घाबरुन शिवाजी महाराजांची मर्जी मिळवण्याच्या उद्योगास लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रिटिशांमध्ये दरारा
छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रिटिशांमध्ये दरारा

यासाठी मिस्टर उस्टिक यास रायगडावर पाठवण्याचे कंपनीने ठरविले, त्यानुसार उस्टिक 15 एप्रिलनंतर रायगडास जाऊन पोहोचला व तहाची बोलणी केली. मात्र या बोलणीतून फार काही निष्पन्न झाले नाही तरी ब्रिाटीशांनी तहाचा हेतू सोडला नव्हता. 28 एप्रिल 1673 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईच्या अधिकार्‍यांनी ठरवले की, शिवाजी महाराजांच्या मुलुखात युरोपमधल्या कुठल्या मालास मागणी आहे व त्यांच्या मुलुखातला कुठला माल युरोपास धाडता येईल हे पाहण्यासाठी व त्यांच्या प्रदेशातल्या पेठा, शहरे व मुंबईपासून त्यांची अंतरे, मार्ग, दळणवळणाची साधने यांची माहिती मिळवण्याकरिता टॉमस निकल्स याला पाठविण्याचे निश्चित झाले.

यानुसार 1 मे 1673 रोजी टॉमस निकल्स याला सूचना देण्यात आल्या. या सदंर्भात कंपनीकडून निकल्सला असे सांगण्यात आले की, मुंबई बेटावर कंपनीची स्थापना झाल्यापासून शिवाजी महाराज व कंपनीमध्ये सलोखा नसल्याने शिवाजी महाराजांच्या व्यापारी मुलुखाची पाहणी करणे आपल्याला शक्य झाले नव्हते. तरी आता शिवाजी महाराजांच्या मुलुखाची व्यापारीदृष्ट्या पाहणी करणे, मुंबईहून गलबतामध्ये बसून नागोठण्यास उतरणे व नागोठण्याची भौगोलिक परिस्थिती, नदीच्या पात्राची रुंदी, तेथे जाणार्‍या होड्यांचा आकार, भरती ओहोटीची कमाल आणि किमान मर्यादा तसेच धक्क्याची सोय या गोष्टी पहाव्यात आणि नागोठण्याजवळच्या पेण तसेच अन्य गावांची माहिती मिळवून सर्व परिसरांचे नकाशे तयार करणे आणि परत नागोठण्यास उतरुन तिथल्या लोकांना समजून न देता तिथून तीन चार दिवसांच्या अंतरावर असलेल्या जुन्नर या शहरात जाऊन जास्तीत जास्त माहिती घ्यावी.  व या सर्व घटनांची नोंद त्याने एका रोजनिशीत करावी अशा सूचना त्याला देऊन नागोठण्यास पाठविण्यात आले.

कंपनीच्या आदेशानुसार शिवाजी महाराजांच्या मुलुखात असलेल्या नागोठण्यास आलेल्या टॉमस निकल्स याला मराठ्यांच्या या मुलुखात जबरदस्त अडचणी आल्या. त्यासंदर्भातले एक पत्र त्याने तातडीने मुंबईस लिहिले. त्यामध्ये त्याने असे सांगितले की, उभय सैन्ये अगदी जवळ आल्याने प्रत्ययी होणारा उपद्रव, निरनिराळ्या सुभेदारांच्या लपवाछपवीच्या कारवायांमुळे शहरोशहरी प्रवासात होणारी दगदग, आणि मी सिद्दीचा हेर असेन अशा समजुतीने माझी जागोजागी चौकशी होत आहे. याचवेळी त्याने असेही कंपनीस लिहिले की, सध्याची वेळ शिवाजी महाराजांशी तह करण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. निकल्सच्या पत्रानंतर त्याला परत आणण्यासाठी कंपनीने निकल्स याला परत मुंबईस आणण्यासाठी एक बोट नागोठण्यास पाठविली.

निकल्सने सध्याची वेळ तह करण्याच्या दृष्टीने अनुकुल असल्याचे सांगितल्याने प्रथम वाघजी नामक इसमास महाराजांकडे धाडण्याचे ठरले. मात्र 16 मे रोजी असे ठरले की तहाची बोलणी करायची असल्याने शिवाजी महाराजांना भेटायला जाणारा माणूस स्पष्टवक्ता असला पाहिजे. त्यामुळे कंपनीने निकल्सला असे सुचविले की,

"शिवाजी महाराजांशी तह करुन कित्येक महत्त्वाच्या मुद्द्यांची उत्तरे मिळवण्यासाठी आम्ही तुला धाडत आहोत"

शिवाजी महाराजांनी आपल्या व्यापाराची वेळोवेळी नुकसानी केली आहे; ती भरुन काढण्यासाठी आम्ही तुझी योजना केली आहे. शिवाजी महाराज, अण्णाजी पंडित व शिवाजी महाराजांचा वकील पिलाजी यास देण्यासाठी जी पत्रे आहेत; ती तुझ्या हवाली केली आहेत, ती त्यांस पोहोचती करावीत. शिवाजी महाराजांची भेट न झाल्यास त्यांचा मुलगा युवराज संभाजी अगर जो महत्त्वाचा अधिकारी भेटेल त्यास भेटून पावसाळ्या आधी परतावे अशा सूचनाही टॉमस निकल्सला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार टॉमस निकल्स 19 मे 1673 रोजी 37 लोकांसह मुंबईहून निघाला.

मध्यरात्री त्याचे गलबत नागोठण्यास पोहोचले. उशिर झाल्यामुळे त्याने रात्री नागोठण्यास वस्ती केली. नागोठणे हे शिवाजीच्या मुलुखातील एक सुंदर शहर असून शहराप्रमाणेच सुंदर असलेल्या एका नदीच्या (अंबा) किनारी वसले आहे व रायगड येथून तीस मैल असावा असे त्याने आपल्या रोजनिशीत लिहिले आहे. नागोठण्याहून कोलाड, पाटणूस, रायगडवाडी असा प्रवास करत 22 तारखेला तो रायगडावर दाखल झाला. शिवाजी महाराज रायगडावर नसल्याने त्याने संभाजी राजांच्या भेटीची परवानगी मागितली ती मिळाली पण त्यादिवशी बराच पाऊस झाल्यामुळे निकल्सला संभाजी राजांच्या भेटीसाठी गडावर जाता आले नाही.

निकल्सची युवराज संभाजी राजेंसोबत भेट

दुसर्‍या दिवशी सकाळी रायगडावर संभाजी राजांची भेट घेऊन निकल्सने त्यांच्या कानावर तहासंदर्भातल्या गोष्टी घातल्या मात्र मला या बाबतीत काही करता येणार नाही. महाराज आले की, तुमच्या आगमनाबद्दल त्यांना कळवतो म्हणजे ते लगेच येतील असे सांगितले. तसेच तुमच्या प्रकृतीला आमच्या रायगडावरील हवा मानवणार नाही; तेव्हा तुम्हा आता खाली जाऊन रहा असेही संभाजी राजांनी निकल्स याला सांगितले. 2 जूनला शिवाजी महाराज रायगडी परत आल्यावर टॉमस निकल्सने त्यांची भेट घेऊन तहासंदर्भात बोलणी केली व त्यांनतर निजामपूर, अष्टमी, चौल, भट्टी इत्यादी ठिकाणे करुन 17 जूनला परत मुंबईस गेला.