अजातशत्रू छत्रपती शाहू महाराज
शाहू महाराजांची वयाच्या २५ व्या वर्षी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेतून सुटका होऊन २६ व्या वर्षी त्यांना आपल्या हक्कासाठी लढून राज्य मिळवावे लागले. शाहू महाराजांच्या कार्यकाळात अनेक मातब्बर घराणी उदयास आली व मराठ्यांचा झेंडा अटकेपार रोवण्यात आला.
छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र तसेच मराठा साम्राज्याने ज्यांच्या काळात समस्त हिंदुस्थानावर अमल केला ते म्हणजे छत्रपती थोरले शाहू महाराज.
शाहू महाराजांचे बालपण आणि मुघल कैद
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातल्या गांगवली या छोट्याशा गावात सन १६८२ साली जन्म झालेल्या शाहूंचे बालपण रायगडावर गेले पण संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर मुघलांच्या सैन्याने रायगडावर कब्जा केला व शाहूंना त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाईंसहित कैद केले. यानंतरची अनेक वर्षे औरंगजेबाच्या छावणीत ते नजरकैदेत होते. शाहू महाराजांचे पाळण्यातील नाव शिवाजी होते मात्र औरंगजेबाने कैदेत असताना त्यांचे शाहू असे नामकरण केले. शाहू शब्दाचा अर्थ शत्रूचा पुत्र असा होतो असे उल्लेख काही अभ्यासक करतात मात्र औरंगजेब हा शहाजी महाराजांनासुद्धा शाहू (शहाजी नावाचा लघूल्लेख) असेच म्हणत असे व तोच प्रकार त्याने शहाजी महाराजांचे पणतू शाहू महाराजांच्याबाबतीत केला असावा. यासंदर्भात एक उदाहरण म्हणून १६५७ सालचे एक पत्र आहे ज्यात औरंगजेब म्हणतो. "शाहूच्या मुलाने (शिवाजी महाराज) या दरबाराकडे एका वकिलामार्फत असे विनंतीपत्र पाठविले आहे की, 'विजापुरकरांच्या मुलूखापैकी जो प्रांत माझ्या ताब्यात आहे तो मजकडेच ठेवून मला जर मनसब देण्यात येईल विजापूरच्या विरोधात मी आपणास साहाय्य करून आदिलशाही प्रांत तुमच्या ताब्यात देईन.' या पत्रास मी जे उत्तर पाठविले आहे त्यात काही अटी लिहील्या आहेत व शाहूसही (शहाजी महाराज) याविषयी कळविले आहे. शिवाजीकडून उत्तर आले म्हणजे मी (औरंगजेब) तुम्हास कळविन, त्याने माझ्या हुकुमातील अटी मान्य केल्या तर ठीक आहे, नाहीतर आमची सैन्ये त्यास नष्ट करून टाकतील." शाहू महाराजांचे बालपण आणि तरुणपण मुघलांच्या कैदेत गेले, ज्यामुळे त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. तरीही, त्यांनी आपल्या धैर्याने आणि नेतृत्वाने मराठा साम्राज्याला नवे वैभव प्राप्त करून दिले.
शाहू महाराजांचे स्वराज्यासाठी संघर्ष
शाहू महाराजांची वयाच्या २५ व्या वर्षी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेतून सुटका होऊन २६ व्या वर्षी त्यांना आपल्या हक्कासाठी लढून राज्य मिळवावे लागले. शाहू महाराजांच्या कार्यकाळात अनेक मातब्बर घराणी उदयास आली व मराठ्यांचा झेंडा अटकेपार रोवण्यात आला. शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला आणि पेशव्यांसारख्या शक्तिशाली घराण्यांना प्रोत्साहन देऊन स्वराज्याला मजबूत केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी संपूर्ण भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शाहू महाराजांनी प्रशासकीय सुधारणा आणि सामाजिक एकता यावर विशेष लक्ष दिले, ज्यामुळे मराठा साम्राज्याने आपले वैभव गाठले.
शाहू महाराजांची मुद्रा आणि स्वभाव
शाहू महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती - । श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी । । शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।। ही मुद्रा त्यांच्या शौर्य आणि नेतृत्वाचे प्रतीक होती. चिटणीस बखरीत शाहू महाराजांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्या स्वभावाची थोडक्यात माहिती करून देतात. 'विस्कळीत प्रसंग जाहला, याजमुळे चांगली माणसे मातबर लोग मोगलाईत व हबसाणात गेले ते प्रयत्न करुन सेवेत आणवले. त्यांचे बंदोबस्त करुन त्यांस खास चौकीस ठेवले, गोरगरिब अथवा दाद फिर्याद आहे म्हणुन उभे राहिले असता, स्वारीत पालखी उभी करु अगर मजालसीत ऐकुन समक्ष आज्ञा सांगावयाची असेल ती लागलीच सांगावी.' शाहू महाराजांचा हा स्वभाव त्यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाचे आणि प्रशासकीय कुशलतेचे दर्शन घडवतो. त्यांनी सामान्य जनतेच्या समस्या ऐकून त्वरित निर्णय घेतले आणि स्वराज्याच्या प्रशासनाला बळकटी दिली.
शाहू महाराजांचा दुर्लक्षित वारसा
छत्रपती शिवरायांचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताचा वारसा लाभलेले पण आजोबा व वडिलांच्या पराक्रमापुढे काहीसे झाकोळले गेलेले, समस्त भारतावर यांच्या कारकिर्दीत कब्जा होऊनही त्याचे योग्य श्रेय न मिळू शकलेले स्वराज्याचे दुर्लक्षित छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्राविषयी अधिक जागरूकता होणे गरजेचे आहे. शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याला अभूतपूर्व उंचीवर नेले, तरी त्यांच्या योगदानाला इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही. त्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी अटकेपासून कन्याकुमारीपर्यंत आपले वर्चस्व प्रस्थापित केले, ज्यामुळे मराठा साम्राज्याचा स्वर्णकाळ निर्माण झाला.
शाहू महाराजांचा प्रेरणादायी वारसा
शाहू महाराजांचा वारसा मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे. शाहू महाराजांचा इतिहास मराठ्यांचे धैर्य, नेतृत्व, आणि स्वराज्याप्रती अटल निष्ठा दर्शवतो, जो पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील.