मुरारबाजी देशपांडे: पुरंदरच्या लढाईतील स्वामिनिष्ठतेचा अमर पराक्रमी योद्धा
मुरारबाजीने ससैन्य दिलेरखानाच्या बलाढ्य छावणीवरच हल्ला केला. लढताना मुरारबाजीचे लक्ष दिलेरखानाकडे गेले आणि हाती समशेर घेऊन ते दिलेरखानावरी जाऊ लागले. हे पाहून दिलेरखान थोडा बिथरला मात्र मुरारबाजींचा पराक्रम पाहून तो म्हणाला, “मुरार, तू मोगलांना सामील हो, तुला मोठी जहागिरी देऊन शौर्याचे आम्ही चीज करू.”
पुरंदरच्या लढाईत आपल्या पराक्रमाने मुघलांनाही भयभीत करून सोडणारे व्यक्तिमत्व म्हणजे मुरारबाजी देशपांडे.
मुरारबाजी यांचा परिचय आणि पार्श्वभूमी
मुरारबाजी यांचे मूळ गाव महाड तालुक्यातील किंजळोली. किंजळोली हे गाव महाड शहराच्या उत्तरेस आणि रायगड किल्ल्याच्या दक्षिणेस आहे. रायगड किल्ल्याच्या दक्षिणेस पोटल्याच्या डोंगरावरून उत्तरेकडे निघालेला सह्याद्रीचा एक फाटा महाडच्या दिशेने जातो. हा फाटा जेथे संपतो तेथेच किंजळोली हे गावं आहे. याच परिसरात सध्या किंजळोली खुर्द व किंजळोली बुद्रुक अशी दोन गावे आहेत. मुरारबाजी यांचे उपनाव देशपांडे असले तरी त्यांना महाडकर या आडनावाने ओळखले जात असे. त्यांच्या वडिलांचे नाव होते बाजी मुरार आणि ते १६३७ सालापासून जावळीचे राजे चंद्रराव मोरे यांच्याकडे सरदार म्हणून होते. मोरे हे आदिलशाहाचे मांडलिक होते व एकदा मोगलांविरुद्ध झालेल्या युद्धात बाजी मुरार यांनी विशेष पराक्रम दाखवल्याने आदिलशहाची नजर बाजींवर गेली आणि त्यांनी मोऱ्यांकडून बाजी यांना आपल्याकडे मागून घेतले. बाजी मुरार यांची जागा खाली झाली म्हणून मोऱ्यांनी त्यांचे पुत्र मुरार बाजी यांना त्यांच्या वडिलांच्या जागी नेमले. मुरारबाजी यांचा जन्म १६१६ साली झाला असल्याचा उल्लेख मिळतो. त्यांना एकूण चार भाऊ होते ज्यांची नावे त्रिंबकजी, शंकराजी, संभाजी व महादजी अशी होती. याच पाच भावांच्या गटाला पंचबाजी असे नाव होते. मुरारबाजी यांचा परिवार आणि त्यांचे कर्तृत्व मराठा इतिहासात विशेष स्थान ठेवते, आणि त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले.
जावळी स्वारी आणि स्वराज्यात सामील होणे
जावळीचे मुख्य चंद्रराव वारले तेव्हा त्यांना पुत्र नसल्याने त्यांच्या वारसाविषयी तंटा निर्माण झाला त्यावेळी चंद्रराव यांच्या पत्नीने शिवाजी महाराजांची मदत घेऊन शिवथरकर मोऱ्यांच्या घराण्यातील पुत्र दत्तक घेऊन त्याची स्थापना जावळीच्या राज्यावर केली. पुढे हेच चंद्रराव आदिलशाहसोबत संधान साधू लागले व स्वराज्याच्या शत्रुंना आसरा देऊन मदत करू लागले. त्यामुळे महाराजांना जावळीवर स्वारी काढावी लागली. या स्वारीत मुरारबाजी व त्यांचे भाऊ यांनी मोऱ्यांच्या बाजूने लढाई केली. मात्र महाराजांच्या सैन्यापुढे मोऱ्यांचा निभाव लागला नाही. शिवाजी महाराजांना या मोहिमेत मुरारबाजी या रत्नाची ओळख झाली व हे रत्न आपल्याकडे काही केल्या हवे असा विचार त्यांच्या मनात आला. मोऱ्यांचा पराभव झाल्यावर शिवाजी महाराजांनी मुरार बाजी याना स्वराज्यात दाखल होण्यास सांगितले या नुसार मुरार बाजी हे दखलही झाले. महाराजांनी त्यांना पुरंदरचे किल्लेदार पद बहाल केले. मुरारबाजी यांचे शौर्य आणि नेतृत्व पाहून शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली, आणि मुरारबाजी यांनी ही जबाबदारी आपल्या प्राणपणाला लावून पूर्ण केली.
पुरंदरच्या लढाईतील पराक्रम
१६६४ साली मुघल बादशाह औरंगजेबाने जयसिंग या आपल्या बलाढ्य राजपूत सरदारास शिवाजी महाराजांवर चाल करून जाण्यास धाडले. जयसिंगासोबत दिलेरखान हा आणखी एक बलाढ्य सरदार होता. इतकेच नव्हे तर आणखी सोळा सरदार व त्यांचे सैन्य जयसिंगाच्या कुमकेस पाठवण्यात आले. पराजय ठाऊक नसलेला अशी जयसिंगाची ख्याती होती त्यामुळे ही मोहीम विशेष धोक्याची झाली होती. मुळात दिलेरखान व जयसिंग हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते त्यामुळे या मोहिमेत दोघांत काही वाद निर्माण झाले. जयसिंगाच्या मते शिवाजी महाराजांचा मोकळा मुलुख प्रथम ताब्यात घेणे योग्य तर दिलेरखानाच्या मते महाराजांचा डोंगरी मुलुख ताब्यात घेणे जास्त योग्य कारण महाराजांची सर्व ताकद ही डोंगरी मुलुखातील किल्ल्यांतच आहे. जयसिंगाने दिलेरखानास संमती दिली आणि मुघलांची पहिली नजर पडली पुरंदर या किल्ल्यावर. ३१ मार्च १६६५ साली दिलेरखानाने पुरंदरच्या पायथ्याशी आपला तळ दिला. जयसिंगाने हे समजल्यावर मोगल सैन्याची कुमक दिलेरखानाकडे रवाना करून पुरंदर व वज्रगड या दोन किल्ल्यांना वेढा घालण्याचा हुकूम केला. पुरंदरच्या पायथ्याशी आल्यावर दिलेरखानाने त्वरित पुरंदर गडावर हल्ला केला. मोगल किल्ला चढून येत आहेत हे पाहून किल्लेदार मुरारबाजी यांच्या नेतृत्वाखाली गडावरील सैन्याने किल्ला जोमाने लढवण्याचा निश्चय केला. मुरारबाजी यांनी आपल्या सैन्यासह मुघलांच्या बलाढ्य सैन्याला तोंड दिले, आणि त्यांचा पराक्रम मराठा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
मुरारबाजी यांचा शौर्यपूर्ण लढा
पुरंदरदास खालचा व वरचा असे दोन कोट होते. आतली शिबंदी तोडण्यासाठी मोगलानी तोफांचा भडीमार सुरु केला व खालचा कोट पडला. दिलेरखानाने वज्रगड ताब्यात घेऊन गडावर तोफा चढवल्या त्यामुळे पुरंदर शत्रूच्या टप्प्यात आला. मराठ्यांनीहि पुरंदरावरून गोळ्या व तोफगोळे यांचा वर्षाव मोगलांवर सुरु केला. भयंकर युद्ध रंगू लागले. बालेकिल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करताना दिलेरखानाच्या सैन्यावर मुरारबाजीने सैन्यासह झडप घातली व त्यास परत छावणीचा आश्रय घेण्यास भाग पडले. मुरारबाजीने ससैन्य दिलेरखानाच्या बलाढ्य छावणीवरच हल्ला केला. लढताना मुरारबाजीचे लक्ष दिलेरखानाकडे गेले आणि हाती समशेर घेऊन ते दिलेरखानावरी जाऊ लागले. हे पाहून दिलेरखान थोडा बिथरला मात्र मुरारबाजींचा पराक्रम पाहून तो म्हणाला, “मुरार, तू मोगलांना सामील हो, तुला मोठी जहागिरी देऊन शौर्याचे आम्ही चीज करू.” हे ऐकून मुरारबाजी म्हणाले, “मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय?” असे बोलून मुरारबाजी दिलेरखानावर चालून गेले मात्र दिलेरखानाने सोडलेले बाण मुरारबाजींच्या वर्मी लागून ते जमिनीवर कोसळले. मराठ्यांना ही बातमी कळली मात्र ते खचले नाहीत त्यांनी लढाई सुरूच ठेवली आणि आपले किल्लेदार मुरारबाजी यांचे शरीर मुगलांच्या हाती लागू दिले नाही. ते शरीर त्यांनी राजगडास पाठवून दिले. मुरारबाजी यांचा हा पराक्रम स्वराज्याच्या निष्ठेचे आणि शौर्याचे प्रतीक आहे.
मुरारबाजी यांचा बलिदान आणि परिणाम
शिवाजी महाराजांना बातमी समजल्यावर त्यांना खूप दुःख झाले. मुरारबाजींसारखे वीर या युद्धात खर्ची पडणे महाराजांना योग्य वाटले नाही व आपली याहून अधिक जिवाभावाची माणसे गमावली जाऊ नये या साठी त्यांनी जयसिंगासोबत तहाची बोलणी सुरु केली. मुरारबाजी यांच्या बलिदानाने शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि भविष्यातील रणनीतीसाठी नवीन दृष्टिकोन दिला. त्यांच्या बलिदानाने मराठ्यांचा उत्साह कमी झाला नाही, उलट त्यांनी अधिक जोमाने लढण्याचा संकल्प केला. मुरारबाजी यांचे बलिदान मराठा इतिहासातील एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जे स्वराज्याप्रती अटल निष्ठा आणि शौर्य दर्शवते. मुरारबाजी देशपांडे यांचा वारसा मराठा इतिहासातील एक थोर अध्याय आहे.