छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम

इ.स. 1681 च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांची नागोठणे व आपटे ही गावे लुटली व जाळली. सिद्दीच्या या कृत्यामुळे संभाजी महाराजांना फार त्रास झाला आणि सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी त्यांनी जंजिराच हस्तगत करण्याचे ठरवले.

छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

शिवाजी महाराजानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाल्यावर त्याच वर्षी त्यांनी औरंगजेबास पहिला तडाखा दिला. सम्राट औरंगजेबाचा पुत्र अकबर हा राजपुतान्याच्या दुर्गादास राठोड याच्यासह दक्षिणेत संभाजी महाराजांकडे आश्रयास आला. त्याने संभाजी महाराजांस औरंगजेबास सम्राट पदावरून हटवण्याच्या कामात मदत करावी अशी दोन पत्रे सादर केली.

याच सुमारास औरंगजेबाच्या आदेशानुसार सिद्दी मराठ्यांच्या मुलुखातल्या नागोठणे, पेण या भागात लुटालूट करत होता, इंग्रजांनी सिद्दीला मुंबई बेटावर आश्रय दिल्याने सिद्दीला नागोठणे खाडीत शिरुन परिसरात लुटालूट करणे शक्य होते हे संभाजी महाराजांचे ध्यानात आल्याने त्यांनी इंग्रजांना अद्दल शिकविण्यासाठी इंग्रजांच्या राजापूरच्या वखारीवर हल्ला चढवला, हल्ल्यामुळे घाबरून गेलेले ब्रिटिश वखारीतच अडकून पडले.

यानंतर संभाजी महाराजांनी आपले वकील आवजी पंडित यांना इंग्रजांना तंबी देण्याकरिता मुंबईस पाठवले व निरोप दिला की, यापूर्वी शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त नाही केला तर संभाजी महाराज इंग्रजांबरोबर युद्ध पुकारतील, त्यामुळे इंग्रजांनी सिद्दीला देत असलेली मदत त्वरीत थांबवावी व त्याला त्याच्या आरमारासह मुंबईबाहेर हाकलून यावे अन्यथा संभाजी महाराजांनी मुंबईवर हल्ला करण्याचा निश्चय केला आहे. याचवेळी सिद्दी आपल्या आरमारासहित सुरतला गेल्याने ब्रिटिशांना थोडे हायसे वाटले व संभाजी महाराजांचा वकील मुंबईस काही काळ राहिला व मुंबईहून पुन्हा रायगडास जाताना ब्रिटिशांनी अनेक नजराणे संभाजी महाराजांना नजर करण्यासाठी दिले. यामुळे संभाजी महाराज खुश होऊन नागोठणे मुलुखातून आपली तांदळाची गरज भागेल असे ब्रिटिशांना वाटले परंतु सिद्दीने ब्रिटिशांच्या मनोदयास परत एकदा तडाखा दिला. सिद्दीन १६ मार्च १६८१ साली नागोठणे मार्गे मुंबईस जाणारी मराठ्यांची दोन गलबते व त्यातील चार माणसे धरली, त्यामुळे चौल येथे ३००० सैन्यासह मराठा सरदार मुंबईवर हल्ला करण्याच्या तयारीत बसला होता. त्याने गलबतांची मागणी केली तेव्हा ब्रिटिशांनी संभाजी महाराजांच्या भयास्तव ती गलबते सिद्दीकडून घेऊन मराठ्यांना परत केली.

१ जून १६८१ साली अकबर नागोठण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाला. संभाजी महाराजांनी त्याची राहण्याची व्यवस्था केली. पातशहा तेथे राहिल्यामुळे गावास पातशहापूर (पाच्छापूर) असे नाव पडले. या प्रकारामुळे औरंगजेब डिवचला गेला आणि त्याने ही युती मोडून काढण्याकरिता मराठ्यांच्या सैन्यापेक्षा दहा पटीने जास्त सैन्य महाराष्ट्रावर पाठविले व स्वतः बुऱ्हाणपूर येथे दाखल झाला. मोगलांच्या कारवायांना तोंड देण्याआधी संभाजी महाराजांना जंजिरेकर सिद्दीशी सामना कराया लागला.

सिद्दीने उंदेरीहून लहान लहान नौका मुंबईच्या दक्षिणेकडे नागोठणे आणि पेण खाड्यांमध्ये पाठवल्या. तेथील किनाऱ्यांवर छापा घालून रहिवाशांना गुलाम म्हणून मुंबईस पाठविले. सिद्दीचे वृत्त संभाजी महाराजांना समजताच त्यांनी दोनशे सशस्त्र सैनिक उंदेरीवर उतरवून सिद्दीच्या कृत्याचा वचपा काढला. याकाळात सिद्दी, इंग्रज व मराठे यांच्यामध्ये युद्ध झाल्याशिवाय एक वर्षही उलटत नसे.  जंजिऱ्याचा सिद्दी  मोगलांचा मांडलिक व मराठ्यांचा शत्रू असल्याने इंग्रजांकरवी मुंबई बेटाच्या परिसरात आश्रय घेऊन मराठी मुलखावर हल्ले करण्याचे त्याचे प्रयत्न सतत चालू असत. १६८१ साली त्याचा उपद्रव अधिक वाढू लागल्याने संभाजी महाराजांनी चार हजार सैन्य रायगडावर तयार केले आणि नागोठण्याच्या बंदरातल्या आरमारात त्यांनी आपली २२ गलबते सिद्दीवर स्वारीसाठी सिद्ध ठेवली.

१६८१ च्या सप्टेंबरमध्ये नागोठण्यातून बाहेर पडलेले संभाजी महाराजांचे आरमार व सैन्य उंदेरीजवळ जाऊन पाऊस कमी होण्याची वाट पाहात थांबले. या स्वारीचे प्रमुख महाडचे दादाजी देशपांडे होते. ही मोहीम यशस्वी झाली तर त्यांना अष्टप्रधानांमध्ये स्थान देण्याची हमी संभाजी महाराजांनी दिली होती. मात्र ही मोहीम ऐनवेळी फसली जाऊन सिद्दीने दादाजी देशपांडे यांचा महाङपर्यंत पाठलाग केला आणि दादाजी यांच्या घरावरच छापा टाकून त्यांच्या कुटुंबास कैदी बनवले. याच दरम्यान मोगलांच्या आदेशाने पोर्तुगीजांनी आणि सिद्दीने संभाजी महाराजांना युद्धात गुंतवून ठेवण्याचा कट केला, त्यामुळे संभाजी महाराज एकाच वेळी अनेक सत्तांबरोबर युद्धात गुंतल्यामुळे औरंगजेबाला दक्षिणेत भल्यामोठ्या सैन्यासह येण्यास चांगलीच संधी मिळाली.

इ.स. १६८१ च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांची नागोठणे य आपटे ही गावे लुटली व जाळली, सिद्दीच्या या कृत्यामुळे संभाजी महाराजांना फार त्रास झाला आणि सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी त्यांनी जंजिराच हस्तगत करण्याचे ठरवले. संभाजी महाराजांनी प्रथम कोंडाजी फर्जद यांस सिद्दीकडे पाठविले. संभाजी महाराजांवर नाराज होऊन मी आपणास सामील झालो आहे अशी खोटी माहिती देऊन कोंडाजी यांनी सिद्दीच्या गोटात प्रवेश मिळवला आणि कुटुंबासह जंजिरा किल्ल्यात राहू लागले. मात्र कालांतराने हा कट सिद्दीला कळला व त्याने कोंडाजी फर्जदसहित कुटुंबास आणि इतर माणसांस ठार केले.

कोंडाजी फर्जंद व त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी महाराजांनी संभाजी महाराजांनी जंजिऱ्यास वेढा घालण्याचा निश्चय केला आणि राजपुत्र अकबर आणि वीस हजार सैनिकांसह रायगडाहून जंजिऱ्यास पोहोचले, सतत १५ दिवस मराठ्यांनी जंजिऱ्यावर तोफा डागल्या. त्यामुळे जंजिरा किल्ल्याच्या भिंती तुटून पडायची पाळी आली. घाबरलेल्या सिद्दींनी आजूबाजूच्या टेकड्यांवर आश्रय घेतला. जंजिरा किल्ला जिंकण्यास काही काळाचाच अवधी असताना मोगल सरदार हसन अली खान मोठ्या सैन्यबळासह उत्तर कोकणातील कल्याण सुभ्यावर चाल करून आल्याने संभाजी महाराजांना ही मोहीम सोडून कल्याण सुभ्याकडे जावे लागले व जाताना त्यांनी कल्याण सुभ्याचे दक्षिणेकडील टोक असलेल्या नागोठणे पेण व आपटे परिसरात पंधरा हजार सैन्य तैनात ठेवले.

मोगलांच्या सांगण्यावरून सिद्दी व पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध युद्ध पुकारले त्या कटासंदर्भातील एक पत्र गोव्याच्या व्हॉईसरॉयने सिद्दी याकुब याला लिहिले. त्यात त्याने असे सांगितले की, आपली दोन पत्रे मिळाली. एक पत्र २६ ऑक्टोबरचे असून ते मुंबई येथून लिहिण्यात आले आहे. हे पत्र आपले प्रतिनिधी नूर महंमद याने आणले तर दुसरे पत्र वेंगुर्ल्याच्या बंदरातून लिहिले आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या आरमारासह आहात. ही दोन्ही पत्रे वाचून मला फार आनंद झाला. त्यात आमच्यावर आपला किती लोभ आहे हे दिसून येते. आपण चौलच्या छावणीत आमच्या ठाण्याच्या रक्षणासाठी सैन्य पाठविलेत व त्या सैन्याची आपल्या आरमारासाठी गरज असताना आपण ते सैन्य तिथून काढून घेतले नाहीत. कारण आमचे उत्तरेकडील सेनापती मॅन्युअल लोबुद सिल्व्हेरा यांना चौलच्या मदतीला पाठव म्हणून सांगितलेले सैन्य आले, करंजा नदीच्या पात्रात आपण काही गलबतांसह आपली नौका आमची वाट मोकळी करुन देण्यासाठी पाठवलीत, संभाजी राजे नागोठणे बंदरात शहात्तर गलबतांसह होते नागोठणे नदीच्या पात्रातील रस्ता रोखण्याचा त्यांचा हेतू होता. आपण ही उपाययोजना अनुभवी सेनापतीप्रमाणे केली, त्यातून आपली आमच्याकडील मैत्री प्रतित होते. पत्रात सांगितल्या प्रमाणे संभाजी महाराजांच्या आरमारावरील सरदार दौलतखान नागोठणे येथे लढाईच्या तयारीत असल्याचे उल्लेख आढळतात.

सिद्दीने पोर्तुगीजांशी केलेली ही छुपी युती कालांतराने दोघांच्याही अंगास आली, कारण १६८२ च्या जून-जुलैमध्ये संभाजीराजांनी रेवदंड्यास वेढा दिला , बरेच दिवस तो चालला. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी उत्तर कोकणातील दोन किल्ले जिंकले तसेच जुनी साष्टी ब बारदेस येथेही चढाई केली. संभाजी महाराजांनी रेवदंड्याचा वेढा उठवावा म्हणून पोर्तुगीजांनी फोंड्यास वेढा घातला.

१६८३ च्या डिसेंबरमध्ये मराठ्यांनी गोव्यातील अनेक गावे घेऊन फोंडा लढविला. फोंड्याच्या लढाईत येसाजी कंक व त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांनी मोठा पराक्रम गाजवला. सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याभोवती एक सेतूच उभारण्याचे काम सुरु केले. यासाठी पन्नास हजार माणसे कामाला लागली. आठशे वार रुंद आणि तीस वार खोल असणारा खंदक, दगड, कापूस, गाठोडी टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र हसन अलिखानने मराठ्यांच्या ताब्यातले कल्याण जिंकून घेतल्याने महाराजांना ही मोहीम दादाजी प्रभु देशपांडे यांच्याकडे सोपवून रायगडी यावे लागले, जंजिऱ्याला मराठा सैन्याचा वेढा असताना सिद्दीची काही जहाजे मुंबई बंदरात आली, तेव्हा महाराजांनी आपल्या खांदेरी येथील आरमाराला ती जहाजे लुटण्याचे आदेश दिले.

१६८२ ते ८५ च्या सुमारास पाच हजार सैन्य असणारी गलबते नागोठणे, आणि पेण बंदरांमध्ये सज्ज होती. संभाजी महाराजांचे आरमार १२० गलबते आणि १५ गुराबांनी सज्ज होते. मराठ्यांनी यावेळी सिद्दीची अनेक जहाजे उडवली व जबर नुकसान केले त्यामुळे याचा बदल घेण्यासाठी सिद्दीने नागोठणे व पेण या दोन खाड्यांमध्ये अचानक छापा घातला आणि अनेक रहिवाशांची नाके कापली. मुंबई बेटात सिद्दीला वारंवार आश्रय देऊन नागोठणे परिसराला धोका उत्पन्न कण्याचे काम इंग्रजांकडून संभाजी महाराजांच्या काळातही होत होते. एका बाजूला सिद्दीला आश्रय देऊन संभाजी महाराजांच्या प्रदेशावर हल्ले करण्यास प्रोत्साहन देणे व दुसऱ्या बाजूला संभाजी महाराजांसोबत तहाची मागणी करणे अशा ब्रिटिशांच्या दुतोंडी उद्योगांमुळे संभाजी महाराज ब्रिटिशांवर भडकले. एक ब्रिटीश वकील मुंबईहून रायगडला संभाजी महाराजांशी चर्चा करण्यास आला व तेथे तीन महिने राहिला. मात्र संभाजी महाराजांनी त्यास स्पष्ट शब्दात सुनावले की, तुम्ही आमचे शत्रू जंजिऱ्याचा हबशी याला मुंबईस आश्रय देता, त्याला आमच्याविरुद्ध दारुगोळा पुरविता. ही तुमची कृती शिवाजी महाराजांबरोबर अगोदर झालेल्या तहाच्या एकदम विरुद्ध आहे. तेव्हा सिद्दीला मुंबईबाहेर घालवून या व आमच्या परिसरात सैन्याची जमवाजमव करण्यास त्याला बंदी करा आणि मगच सलोख्याच्या गोष्टी करा.

अशा प्रकारे इंग्रजांची संभाजी महाराजांसोबत तहाची बोलणी चालू असताना १६८४ मध्ये मुंबई कौन्सिलचा एक वकील रायगडास येऊन गेला. त्याने संभाजी महाराजांबरोबर तहाचा दोन कलमी कार्यक्रम उरकला आणि परत जाताना नागोठण्यास येऊन मग तेथून मुंबईस परतला. या तहातील कलमांमध्ये इंग्रजांनी नागोठणे व पेण येथे वखारी उघडाव्यात आणि घाटावर माल आयात निर्यात करताना राजापूर प्रमाणे जकात कर यावा. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याशिवाय माझ्या प्रदेशातून कोणताही माणूस गुलाम म्हणून खरेदी करु नये अथवा त्याचे धर्मांतर करू नये अशा काही अटी होत्या.