जॉन फ्रायर - शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवणारा प्रवासी लेखक

अशाच एका प्रवासी लेखकांपैकी एक म्हणजे जॉन फ्रायर. जॉन फ्रायरचा जन्म १६५० साली इंग्लंड देशातील लंडन येथे झाला. १६६४ साली त्याने केम्ब्रिज विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळवली. 

जॉन फ्रायर - शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवणारा प्रवासी लेखक
जॉन फ्रायर

जागतिक इतिहासात महत्वाचे योगदान देणाऱ्यांमध्ये प्रवासी लेखकांना महत्वाचे स्थान आहे. वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांनी जगातील विविध देशांमध्ये प्रवास करून त्या काळातील नोंदी व लिखाण हे आजही इतिहासाचा अभ्यास करताना महत्वपूर्ण ठरते.

अशाच एका प्रवासी लेखकांपैकी एक म्हणजे जॉन फ्रायर. जॉन फ्रायरचा जन्म १६५० साली इंग्लंड देशातील लंडन येथे झाला. १६६४ साली त्याने केम्ब्रिज विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळवली. 

१६७३ साली जॉन फ्रायचा भारतात येण्याचा योग आला व यास कारण असे झाले की त्यावेळी इंग्रज व डच यांच्यात युद्ध सुरु होते. यावेळी इंग्रजांनी दहा जहाजांची कुमक भारतात चेन्नई येथे पाठवली त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचा डॉक्टर म्हणून जॉन फ्रायरला भारतात पाठवण्यात आले.

सुरुवातीस जॉन फ्रायरचे वास्तव्य मछलीपट्टण या ठिकाणी झाले. मछलीपट्टण येथे ब्रिटिशांच्या वखारी होत्या व हा परिसर गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाच्या अमलाखाली होता.

कुतुबशहाने परकीय लोकांना परिसरात वखारी घालण्यास अनुमती देण्याचे कारण देताना जॉन फ्रायर म्हणतो की, कुतुबशाहाकडे स्वतःचे आरमार नसल्याने किनारपट्टीचे संरक्षण होऊन इतर देशांशी व्यापार सुरळीत चालावा यासाठी कुतुबशहाने परकीय लोकांना वखारी घालण्यास अनुमती दिली होती.

जॉन फ्रायर हा पेशाने डॉक्टर असल्याने त्याला कामानिमित्त विविध भागात प्रवास करावा लागत असे मात्र हा प्रवास करताना त्याने आपल्या लिखाणाची आवड जोपासल्याने त्याच्या नोंदी या सतराव्या शतकातील इतिहासाचा अभ्यास करण्यास अतिशय उपयोगी ठरल्या.

मछली पट्टण येथून जॉन फ्रायर सुरत येथे गेला व तेथील वृत्तांत त्याने लिहून ठेवला. त्यानंतर मुंबई येथे त्याचे जाणे झाले तो काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा होता. राज्याभिषेकासाठी मुंबईहून ब्रिटिशांचे डिप्युटेशन गेले होते त्यामध्ये जॉन फ्रायर सुद्धा होता.

राज्याभिषेकाच्या महत्वपूर्ण नोंदी जॉन फ्रायरने करून ठेवल्या आहेत. रायगड किल्ल्यावर गेल्यावर तेथे असलेले दोन हत्ती पाहून त्यास अत्यंत आश्चर्य वाटले. रायगडासारख्या कठीण किल्ल्यावर दोन हत्ती आणले तरी कसे हा प्रश्न त्यास पडला व त्याने ही नोंद करून ठेवली.

राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर काही काळ मुंबई येथे वास्तव्य करून जॉन फ्रायर जुन्नर, कारवार, गोकर्ण मार्गे इराण येथे गेला. १६८१ साली जॉन फ्रायर युरोपला आपल्या मायदेशी गेला व १७३३ साली लंडन येथे त्याचा मृत्यू झाला.

जॉन फ्रायरने एक प्रवासी लेखक म्हणून सतराव्या शतकातील भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोंदी केल्या आहेतच मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णनही त्याने केले असल्याने जॉन फ्रायर एक इतिहासकार म्हणून महत्वपूर्ण ठरतो.