हिंदी - भारतात सर्वाधिक समजली जाणारी भाषा

आपल्या भारतात एकूण २२ भाषांना अधिकृत दर्जा असून हिंदी ही भाषा सध्या उत्तर आणि मध्य भारतातील काही राज्यांची ती मातृभाषा सुद्धा आहे.

हिंदी - भारतात सर्वाधिक समजली जाणारी भाषा
हिंदी भाषा

भाषा म्हणजे संवादाचे प्रमुख माध्यम आणि ही भाषा मौखिक अथवा लिखित स्वरूपात वापरात आणली जाते. मनुष्याने आजवर भाषाशास्त्रात अनेक शोध लावले. या जगात जेवढे देश आहेत त्याहून कितीतरी अधिक भाषा आहेत. आपल्या भारतातच नानाविध भाषा पाहावयास मिळतात मात्र भारतात सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी भाषा म्हणजे हिंदी.

आपल्या भारतात हिंदी भाषिकांची लोकसंख्या ४३.६३ % एवढी आहे त्यावरून या भाषेची लोकप्रियता समजून येते. भारतातील बहुतांश बहुभाषी नागरिकांना सुद्धा हिंदी भाषेचे ज्ञान असते. तेव्हा हिंदी भाषा नक्की काय व तिचा उगम कधी व कसा झाला हे जाणून घेणे औत्सुक्यपूर्ण राहील.

इसवी सनाच्या तेराव्या शतकात भारतात परकीय देशांतील मुस्लिमधर्मीय सत्तांचा प्रवेश सुरु झाला त्यापूर्वी अनेक सत्तांकडून भारतावर आक्रमणे झाली होती मात्र ही तात्पुरत्या स्वरूपाची होती मात्र तेराव्या शतकात या सत्ता या ठिकाणी शासन करू लागल्या होत्या व पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर ही परंपरा अनेक काळ सुरु होती. 

भारतात आलेल्या इस्लामी सत्ता या वेगवेगळ्या प्रदेशांतील असल्याने त्यांच्या भाषा सुद्धा विविध होत्या व यामध्ये प्रामुख्याने अरबी, फारशी, तुर्की आदींचा समावेश होत असे. भारतातील एक मोठे राज्य म्हणून ओळखले जाणाऱ्या मोगल साम्राज्याची मूळ भाषा तुर्की होती कारण मोगल हे मुळात तुर्कस्तानचे होते.

मोगलांपुर्वी जे मुस्लिम राज्यकर्ते भारतात झाले त्यांची भाषा बहुतांशी फारशी होती व त्यामुळे मोगलांना भारतात स्थिरावण्यासाठी फारशी भाषेस महत्व देणे भाग पडले. 

फारशी भाषा ही मूलतः पर्शिया अर्थात इराण देशात जन्मास आली आणि तिचा प्रचार पुढील काळात विविध देशांत झाला. मोगलांनी जेव्हा फारशी भाषा हीच राजभाषा म्हणून कायम ठेवली त्यावेळी भारतातील हिंदू व मुस्लिम नागरिकांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या व त्यामुळे फारशी भाषा शिकणे आवश्यक असे. 

त्याकाळातही अनेक जण शिक्षित नसल्याने व फारशी भाषा शिकण्यासाठी शिक्षण आवश्यक असल्याने ही भाषा सर्वधर्मीय सामान्य नागरिकांना समजणे अवघड होऊ लागले आणि त्यामुळे सर्व लोकांना समजेल अशी भाषा तयार करण्याची गरज तत्कालीन शासकांना जाणवू लागली.

यानंतर सुरु झाले नव्या भाषेच्या निर्मितीचे कार्य आणि बऱ्याच संशोधनानंतर भारतातील सर्व लोकांना समजेल अशी एक भाषा तयार करण्यात आली आणि या भाषेत हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील भाषांचे मिश्रण होते व ती भाषा म्हणजे हिंदुस्थानी भाषा.

हिंदुस्तानी भाषेची वाक्यरचना आणि व्याकरण हे प्राकृत भाषेच्या धर्तीवर तयार करण्यात आले होते मात्र ही भाषा बोलताना हिंदू लोक संस्कृत शब्दांचा वापर अधिक करीत आणि मुस्लिम लोक फारशी आणि अरबी शब्दांचा वापर अधिक करीत त्यामुळे मूळ हिंदुस्तानी भाषेतून दोन उपभाषा तयार झाल्या आणि हिंदूं जी भाषा वापरात तिला हिंदी हे नाव मिळाले आणि मुस्लिम जी भाषा वापरात तिला उर्दू असे नाव मिळाले.

हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांमध्ये बरेच साम्य असले तरी या भाषांमधील अनेक शब्द वेगवेगळे आहेत आणि सध्या पूर्णपणे शुद्ध हिंदी आणि पूर्णपणे शुद्ध उर्दू बोलणारे लोक खूप कमी असल्याने आपण पुन्हा एकदा दोन्ही भाषांचे मिश्रण असलेली हिंदुस्तानी भाषा बोलायला लागलेलो आहोत.

हिंदी भाषा लिहिण्यासाठी जी लिपी वापरली जाते तिला देवनागरी लिपी असे नाव असल्याने ही भाषा शिकणे बरेच सोपे असते आणि त्यामुळे ही भारतात कामकाजासाठी वापरली जाणारी इंग्रजीसोबतची एक प्रमुख भाषा आहे आणि जगातील ५० कोटी लोकांना हिंदी समजते. आपल्या भारतात एकूण २२ भाषांना अधिकृत दर्जा असून हिंदी ही भाषा सध्या उत्तर आणि मध्य भारतातील काही राज्यांची ती मातृभाषा सुद्धा आहे.