छत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा

निसर्गरम्य कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातल्या सागर या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ८ कि.मी. वर असलेले केळदी हे एक टुमदार गाव. विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आलेल्या नायक राजवंशाची ही राजधानी. तिथे असलेले रामेश्वर आणि वीरभद्र मंदिर ही सुंदर शिवालये आणि त्याच्याशी मराठी अस्मितेचा जोडलेला प्रसंग मोठा रोमांचक आहे.

छत्रपती राजाराम महाराज आणि केळदीची राणी चिन्नम्मा
केळदीची राणी चिन्नम्मा

होयसळ आणि द्राविड अशा मिश्र शैलीमधे बांधलेले हे मंदिर अत्यंत देखणे आहे. प्रदक्षिणापथ असलेले गर्भगृह, महामंडप आणि मुखमंडप अशी या मंदिराची रचना. महामंडपाच्या पूर्व आणि पश्चिम भिंती या सुंदर अशा शिल्पांनी सजवलेल्या आहेत. याला लागूनच असलेल्या वीरभद्र मंदिराच्या छतावर दुर्मिळ अशा गंडभेरुंडाचे अतिशय देखणे शिल्प कोरलेले आहे. गंडभेरुंड हा दोन तोंडे आणि एक धड असलेला एक काल्पनिक पक्षी.

त्याशिवाय या मंदिरात बोकडाचे तोंड असलेल्या दक्ष राजाची हात जोडून उभी असलेली सुरेख मूर्ती आणि नरसिंहाचीसुद्धा हात जोडून उभी असलेली मूर्ती इथे पाहायला मिळते. त्याशिवाय लक्ष्मी-विष्णू, सप्तमातृकांच्या देखण्या मूर्ती इथे आहेत. अतिशय शांत आणि रम्य असलेल्या या मंदिराच्या शेजारी भव्य लाकडी रथ ठेवलेला आहे. त्या रथावर अतिशय बारीक कलाकुसर केलेली दिसते. मंदिराच्या शेजारी राज्य पुरातत्व विभागाचे वस्तूसंग्रहालय असून, परिसरात मिळालेली विविध दुर्मिळ शिल्पे इथे जतन करून ठेवलेली दिसतात.

कुंदापूरचा व्यापारी सिद्दप्पा शेट्टी याची मुलगी चिन्नम्मा हिचा विवाह सन १६६७ मधे केळदीचा राजा सोमेश्वर नायकाशी झाला. सन १६७७ साली सोमेश्वर नायकाच्या मृत्यूनंतर अतिशय शूर असलेल्या या राणी चिन्नम्माने २६ वर्षे केळदीचा राज्यकारभार मोठ्या हिकमतीने चालवला. त्याकाळात तिने औरंगजेबाच्या मुघल सैन्याशी लढाया करून त्यांना पराभूत केले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेली. छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे निघून जाण्यात यशस्वी झाले. जिंजीला जाताना त्यांच्या पाठलागावर औरंगजेबाची फौज होतीच. त्यावेळी राजाराम महाराजांनी केळदीच्या राणीकडे आश्रय मागितला.

राणीचा मुख्य प्रधान हा विजयनगर साम्राज्याच्या सेनापतीचा वंशज असलेला तिम्मण्णा नायक हा होता. त्याच्याशी सल्लामसलत करून राणी चिन्नम्मा हिने मोठ्या धाडसाने राजाराम महाराजांना आश्रय दिला. लगोलग मुघलांची फौज केळदीवर चालून आलीच. परंतु राणी चिन्नम्माने चालून आलेल्या मुघल सैन्याशी लढाई करून त्यांचा पराभव तर केलाच पण मुघलांना तिच्याशी तह करायला भाग पाडले. केळदी चिन्नम्मामुळे पुढे राजाराम महाराजांचा जिंजीपर्यंतचा प्रवास निर्धोक झाला.

रामेश्वर मंदिराच्या समोर एका जोत्यावर एक दगडी स्तंभ उभा असून त्या स्तंभावर मोठ्या चौकटीत गणपती आणि त्याच्या खालच्या कोनाड्यात काही माणसांची शिल्पे दिसतात. त्यातली एक आहे राणी चिन्नम्मा आणि दुसरे आहेत राजाराम महाराज. खास मराठी पगडीमुळे राजराम महाराज ओळखता येतात. स्वराज्याच्या छत्रपतींच्या पाठीशी राणी चिन्नम्मा मोठ्या धाडसाने उभी राहिल्याचे ते एक प्रतिक आहे.

राणी चिन्नम्मा ही अतिशय धार्मिक आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध होती. राणी आब्बक्का, ओणके ओबव्वा आणि कित्तूरची राणी चिन्नम्मा या कर्नाटकातील धाडसी वीरांगानांच्या पंक्तीमध्ये केळदी चिन्नम्माचे स्थान खूप वरचे आहे. मिरजान इथला किल्ला देखील याच राणीने बांधला. कर्नाटकच्या भेटीत मराठी अस्मितेचे रक्षण करणाऱ्या केळदी या ठिकाणाला भेट देऊन तिथे असलेले देखणे मंदिर आणि राजाराम महाराजांचा प्रसंग सांगणारा स्तंभ आवर्जून पाहायला हवा.

- आशुतोष बापट