हरिश्चंद्रीय राजवंश

ईसवीसनाच्या ७व्या-८व्या शतकात उत्तर कोकण हरिश्चंद्रवंशिय राजांच्या अखत्यारित होते हे राजे बदामीच्या चालुक्यांचे मांडलिक होते.

हरिश्चंद्रीय राजवंश
हरिश्चंद्रीय राजवंश

हरिश्चंद्रगड नावाचा किल्ला यांचे मुळस्थान असावे कारण या किल्ल्यावर आजही पुरातन लेण्यांचे व मंदिराचे अवशेष आढळून येतात. याच हरिश्चंद्रिय राजवंशात भोगशक्ती उर्फ पृथ्वीचंद्र नामक एक राजा आठव्या शतकात होऊन गेला व त्याजकडे उत्तर कोकणाचे अधिपत्य होते

त्याचे ताम्रपट नाशिक जिल्ह्यातील आंजणेरी येथे सापडले असून त्यामध्ये

“चतुर्दशग्रामसहस्त्रसंख्य सकलमपी पुरीकोंकण भक्तमासित”

अर्थात १४०० गावांचा समावेश असलेल्या पुरी कोकण प्रदेशाचा स्वामी असा उल्लेख आला आहे यावरुन भोगशक्तीच्या काळात उत्तर कोकणाची राजधानी पुरीच होती हे लक्षात येते. भोगशक्तीचेच दुसरे नाव पृथ्वीचंद्र असे असून तो राजा सिंहवर्म याचा पुत्र व राजा स्वामीचंद्र याचा नातु होता. राजा स्वामिचंद्रास पुलकेशीचा (द्वितिय) मुलगा विक्रमादित्य (प्रथम) आपल्या मुलाप्रमाणे वागवत असे.

यांच्यापुर्वी कोंकण मौर्यांना बदामीच्या चालुक्यांनी संपवले असून त्यानंतर पुरीकोकणचा अधिभार यांच्याकडे आला असतानाही पुरीचे महत्त्व कायमच असून संपुर्ण उत्तर कोकण हे पुरीच्याच अखत्यारित येत होते मात्र राज्य चालुक्यांचे असल्याने सत्तेचे केंद्रस्थान अशी ओळख नाहिशी होऊन फक्त एका प्रांताचे मुख्यालय एवढीच ओळख पुरीची राहिली असावी.

भोगशक्तीच्या नाशिक जिल्ह्यातील त्रिंबक जवळील अंजनेरी या खेड्यात मिळालेल्या या दोनही ताम्रपटात पुरीचा उल्लेख आहे. पहिल्या ताम्रपटात तो

“चतुर्दशग्रामसहस्त्रसंख्य सकलमपी पुरीकोंकण भक्तमासित”

असा असून दुसऱ्या ताम्रपटात

“विष्णोः पुरीकोंकणविषयस्यालंकारभूतः भारतपुराणरामायणद्य”

असा आला आहे. दोनही उल्लेखांवरुन असे लक्षात येते की या प्रांताचे मुख्यालय अर्थात विषय पुरी हेच होते. या ताम्रपटांत पुरीव्यतिरिक्त गोपराष्ट्र (इगतपुरीच्या भोवतालचा प्रदेश), त्रिकुट (माहुलीच्या आसपासचा प्रदेश), कल्लिवन (कलवण), कांसारपल्लिका (कसारा), मौरेय्यपल्लिका (?), चंद्रपुरी(?) इत्यादी स्थानांचा उल्लेख आहे त्यामुळे पुरी ही या स्थानांपासून फार लांब नसावी व या ताम्रपटातील पुरीकोंकण हा उल्लेख फक्त शहरापुरता नसून संपुर्ण जिल्ह्याकरिता आहे ज्यामध्ये त्याकाळी एकुण चौदाशे (चतुर्दशग्राम) गावांचा समावेश होत असे.