संभाजी शहाजी भोसले - शिवरायांचे थोरले बंधू
१६५५ साली कनकगिरीचा पाळेगार सरदार आपाखान याने आदिलशाहीविरोधात बंडखोरी केली म्हणून आदिलशाही दरबारातून अफजलखान व संभाजीराजे यांना पाठविण्यात आले. यावेळी कनकगिरीवर हल्ला केला असता अफजलखानाने लबाडीने संभाजीराजे यांना पुढे पाठवून पाठपुरावा केला नाही त्यामुळे भर लढाईत तोफेचा गोळा लागून संभाजीराजे यांचा मृत्यू झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले यांच्याविषयी जाणून घेण्यास कुणास नाही आवडणार?
संभाजीराजे भोसले यांचा परिचय आणि प्रारंभिक जीवन
संभाजीराजेंनी आपल्या कर्तृत्वाने युवराजपद प्राप्त केले आहे असे स्वतः त्यांचे वडील शहाजी महाराज यांनी लहानग्या शिवाजी महाराजांना सांगून त्यांची पुणे प्रांती नेमणूक करून स्वराज्य विस्तार करण्याची प्रेरणा दिली होती. दुर्दैवाने संभाजीराजेंचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांचे कर्तृत्व फार कमी काळ इतिहासास पाहायला मिळाले. संभाजीराजेंचा जन्म सन १६२३ मध्ये वेरूळ येथे जिजाबाईंच्या उदरी झाला. त्याकाळी शहाजी महाराजांची निजामशाही दरबारात इतकी ज्येष्ठता होती की खुद्द मुर्तुजा निजामशाह संभाजीराजेंच्या बारशास तेथे हजर होता. १६३६ साली शहाजी महाराज जेव्हा पुणे प्रांत सोडून कर्नाटकास गेले तेव्हा संभाजीराजे, जिजाबाई व शिवाजी महाराज त्यांच्या सोबत होते. संभाजीराजे यांचे प्रारंभिक जीवन शहाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि निजामशाहीच्या प्रभावाखाली घडले, ज्याने त्यांच्या कर्तृत्वाला आणि शौर्याला आकार दिला. त्यांचे जीवन स्वराज्याच्या निर्मितीच्या आणि मराठा साम्राज्याच्या विस्ताराच्या प्रारंभिक टप्प्यांशी जोडलेले आहे.
संभाजीराजे यांचे वैवाहिक जीवन आणि जहागिरी
तत्पूर्वी शिवनेरीचे किल्लेदार विजयराज विश्वासराव यांची कन्या जयंती व संभाजीराजे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. जयंतीबाईंशिवाय आणखी दोन राण्या संभाजीराजे यांना होत्या ज्यांची नावे गौरीबाई व पार्वतीबाई अशी होती. शहाजी महाराजांनी आपली पुणे जहागीर शिवाजी महाराजांना दिली तर बंगळूर व कोलार ही कर्नाटकातील जहागीर संभाजीराजे यांना दिली त्यामुळे या ठिकाणीच त्यांचे वास्तव्य असे. कोलार या प्रांतावर पूर्वी चिक्क रायल तिम्मा गौडा याचे राज्य होते ते जिंकून शहाजी महाराजांनी संभाजीराजांना तेथे स्थापन केले. संभाजीराजे यांनी आपल्या नेतृत्वाखाली कोलार आणि बंगळूरच्या जहागिरींचे व्यवस्थापन केले आणि स्वराज्याच्या विस्तारात योगदान दिले. त्यांचा हा काळ मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता, ज्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले.
संभाजीराजे यांचे कुटुंब
संभाजीराजे यांच्या पुत्राचे नाव उमाजी असे होते व त्यांचा जन्म १६५४ साली झाला होता. याशिवाय मलकोजी व सुरतसिंग अशी इतर दोन मुलेही त्यांना होती. सुरतसिंग हा उमाजी यांचा सख्खा व थोरला बंधू होता. याशिवाय त्यांना कनकराय नावाचा पुत्रही असावा कारण कोंडीपल्ली येथील शिलालेखात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे: “शके कार्तिक वद्य ११ विजय संवत्सर या दिवशी राजाधिराज संभाजीराजा यांचा पुत्र कनकरायजी पंडित याने कोंडीगानहली विकत घेतले व ते गावं सावती यास बक्षीस दिले.” संभाजीराजे यांचे कुटुंब आणि त्यांचा वारसा मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबाने स्वराज्याच्या रक्षणात आणि विस्तारात आपले योगदान दिले, ज्यामुळे संभाजीराजे यांचे नाव मराठ्यांच्या शौर्यगाथेत कायमस्वरूपी नोंदले गेले.
संभाजीराजे यांचा अकाली मृत्यू
१६५५ साली कनकगिरीचा पाळेगार सरदार आपाखान याने आदिलशाहीविरोधात बंडखोरी केली म्हणून आदिलशाही दरबारातून अफजलखान व संभाजीराजे यांना पाठविण्यात आले. यावेळी कनकगिरीवर हल्ला केला असता अफजलखानाने लबाडीने संभाजीराजे यांना पुढे पाठवून पाठपुरावा केला नाही त्यामुळे भर लढाईत तोफेचा गोळा लागून संभाजीराजे यांचा मृत्यू झाला. शहाजी महाराजांसाठी संभाजीराजे यांचे निधन म्हणजे अतिशय मोठा आघात होता व या प्रकारानंतर अफजलखान विरोधात त्यांच्या मनात प्रचंड रोष उत्पन्न झाला होता. पुढे आपल्या थोरल्या बंधूंच्या मृत्यूचा वचपा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा फडशा पाडून घेतला. संभाजीराजे यांचा अकाली मृत्यू मराठा इतिहासातील एक शोकांतिका आहे, ज्याने शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यावर खोल परिणाम केला. त्यांच्या बलिदानाने स्वराज्याच्या निर्मितीला आणि मराठ्यांच्या संकल्पाला अधिक बळ मिळाले.