शिवकाळातील अपरिचित प्रसंग

शिवचरित्र म्हणजे ज्ञानाचा व प्रेरणेचा एक महासागर आहे ज्यात संपूर्ण जीवनाचे सार दडले आहे आणि प्रत्येक मनुष्याने जर शिवचरित्र वाचले आणि त्यातील एक टक्का जरी स्वतःच्या आयुष्यात अमलात आणले तरी त्याचे आयुष्य खऱ्या अथी सार्थक होईल.

शिवकाळातील अपरिचित प्रसंग
शिवकाळातील अपरिचित प्रसंग

भारतखंडाच्या इतिहासातील एक सुवर्णयुग म्हणजे शिवकाळ. इसवी सन १६३० ते इसवी सन १६८० असा हा पन्नास वर्षांचा काळ जणू एका युगासारखाच आहे व या युगाचे जनक म्हणजे स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज.

शिवाजी महाराजांचा उदय होण्यापूर्वी संपूर्ण भारत परकीय अमलाखालून जात होता आणि राष्ट्रीयत्वाची भावना लोप पावली होती तिला पुन्हा जागृत करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. आज आपण जो भारत पाहतो तो याच राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून निर्माण झाला आहे व या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा पाया खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी रचला.

जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडली आहे. शिवकाळाचे लिखित साधन म्हणजे शिवचरित्र व या चरित्रापासून प्रेरणा घेऊन कितीतरी महान लोक घडले व देशास घडवले. शिवरायांचे पहिले काव्यस्य चरित्र लिहिणाऱ्या कवींद्र परमानंद यांनी सुद्धा या चरित्रास श्री शिवभारत असे सार्थ नाव दिले कारण हे शिवभारतही महाभारतासारखेच भव्यस्वरूप आहे अशी त्यांची भावना होती.

अशा या शिवचरित्राचा अभ्यास करावयाचा म्हटला तर एक जन्मही पुरणे अशक्य आहे कारण या चरित्रास विविध पैलू आहेत आणि या चरित्रातील प्रत्यक्ष क्षण हा आपल्याला काही ना काही शिकवतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर भारतीय व विदेशी लेखकांनी विपुल लिखाण करण्याचा प्रयत्न केला तरीही आजही या चरित्रावर नव्याने लिखाण होतंच असते.

शिवाजी महाराजांचे चरित्र म्हटले की आपल्यापुढे प्रथम उभा राहतो तो त्यांचा पराक्रम मात्र हा त्यांच्या अंगी असलेल्या अनेक गुणांपैकी एक गुण होता कारण फक्त पराक्रमाच्या जोरावर जगात आदर्श ठरेल असे राज्य उभे करणे शक्य नाही त्यामुळे पराक्रमासहित इतर अनेक गुणांचा समुच्चय असणे गरजेचे असते व हे सर्व गुण महाराजांकडे होते.

शिवचरित्र म्हणजे ज्ञानाचा व प्रेरणेचा एक महासागर आहे ज्यात संपूर्ण जीवनाचे सार दडले आहे आणि प्रत्येक मनुष्याने जर शिवचरित्र वाचले आणि त्यातील एक टक्का जरी स्वतःच्या आयुष्यात अमलात आणले तरी त्याचे आयुष्य खऱ्या अथी सार्थक होईल.

शिवचरित्राच्या पन्नास वर्षांच्या काळात असंख्य प्रसंग घडले व अनेक प्रसंग अतिशय प्रसिद्ध झाले मात्र काही असे प्रसंग आहेत जे सामान्य वाचकांस वाचावयास मिळत नाहीत कारण मुळात शिवचरित्र हे ज्ञानाचा महासागर असल्याने या महासागरात जेवढे शोधावे तेवढे कमीच आहे.

या पुस्तकात शिवचरित्रातील परिचित व अपरिचित प्रसंगाचा वेध घेण्यात आला आहे जे इतिहास अभ्यासकांना पूर्णपणे अपरिचित नसले तरी इतिहासाची आवड असणाऱ्या वाचकांच्या वाचनात फारसे येत नाहीत.

शिवचरित्राचा अभ्यास हा इतिहासाच्या विविध साधनांतून केला जातो व या मध्ये प्राथमिक व दुय्यम असे प्रकार आहेत व या पुस्तकातही शिवचरित्राची अस्सल साधने, दुय्यम साधने व ज्येष्ट इतिहास संशोधकांनी केलेल्या लिखाणाचा अभ्यास करून प्रकरणांचा वेध घेण्यात आला आहे. या प्रकरणांतून वाचकांस ज्ञान व प्रेरणा मिळावी हाच उद्देश असून शिवचरित्राची ओढ असलेल्या वाचकांस हा प्रयत्न नक्की आवडेल अशी खात्री आहे.